सोमवार, २१ नोव्हेंबर, २०११

'ये शहर अमन का'


कारंजालाड म्हटले की धार्मिक सहिष्णुता, सलोखा आणि शांत शहर अशीच प्रतिमा समोर येते. पण, 'सोशल नेटवर्र्किंग साईट' असलेल्या 'फेसबुक'वर एका धार्मिकस्थळाची विटंबना करणारे छायाचित्र प्रसारित झाले आणि शहराच्या उज्ज्वल प्रतिमेला तडा गेला. पण, लगेचच कारंजावासीयांनी आपल्या भावनेला आवर घालत धार्मिक सलोखा आणि निकोप समाजव्यस्थेसाठी परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याअगोदरच शांतता प्रस्थापित केली. त्यामुळे 'ये शहर  अमन का' या उक्तीची पुन्हा एकदा प्रचिती आली. मात्र, या अनुषंगाने सोशल नेटवर्र्किंग साईटचा होत असलेला गैरवापर समोर आला आहे.
विज्ञानाचा विकास झाल्यामुळे जग चिमटीत आले. माणसाने विकासाची आकाशामागून आकाशे काबीज केली. त्यातूनच फेसबुक, ऑकरुट, गुगल प्लस आदींसह इतर काही सोशल नेटवर्किंग साईट अस्तित्वात आल्या. टीव्ही, वर्तमानपत्र यांना पर्यायी मीडिया म्हणून या साईटचा वापर केला जातो. यावर्षी जानेवारी महिन्यात इजिप्तमध्ये वेल घोनीम या युवकाने 'वुई आर ऑल खालीद सैद' या फेसबुक पेजद्वारे शांततेच्या मार्गाने क्रांती घडवून आणली. परिणामी, इजिप्तमधील हुकूमशाही राजवट नष्ट होऊन लोकशाही आली. तथापि, आपल्या येथे या साईटचा 'सोशल नेटवर्र्किंग' ऐवजी असामाजिक कामासाठीच अधिक वापर केला जात आहे. त्यामुळे मनाचा तोल ढळत आहे. संवेदनशीलता वाढत आहे. अशाच प्रकारे संवेदनशीलतेची जागा धार्मिक असुरक्षिततेने घेतली आहे. तसे पाहता विज्ञानाचा वापर मानवी उत्थानासाठी व्हायला हवा. पण, वैज्ञानिक सुविधांचा वापर आता धर्मा-धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याकरिता होत आहे, हा आत्मपरीक्षणाचा विषय आहे. फेसबुकवरील एका चित्रामुळे दंगलीसदृश स्थितीचे वातावरण निर्माण झाले. परिणामी, सामाजिक सलोख्याच्या परंपरेला गालबोट लागले. तूर्तास शांतता आहे. पण, धार्मिकस्थळाची विटंबना करून सामाजिक वातावरण दूषित करणे, ही बाब अत्यंत निंदनीय आहे. असा प्रकार करण्याविरुद्ध कारवाई व्हायलाच हवी. पण, याविरुद्ध असंवैधानिक मार्गाने भावना व्यक्त करून सर्वसामान्य व्यक्ती आणि घटनेशी काहीही संबंध नसलेल्या निर्दोष नागरिकांना वेठीस धरणे याचेही सर्मथन करणे उचित नाही. या घटनेमुळे संतप्त झालेल्या काहींनी युवकांनी रस्त्यावर दगडफेक केली. रस्त्यावरील गाड्यांची नासधूस केली. एका दुचाकीला पेटवून दिले. काही दुकानातील सामान रस्त्यावर फेकले, हे योग्य नाही. हा प्रकार शांततेचे शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या कारंजाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला. त्यामुळे शहराची प्रतिमा मलीन झाली.
दरम्यान, फेसबुकचा होत असलेला गैरवापरही अधोरेखित झाला आहे. एक सशक्त मीडिया, सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ, विचारपीठ असा फेसबुकचा वापर करता येतो. पण, काहींना याचा विसर पडला आहे.
त्यामुळे आता या साईटवर प्रसारित होणारे चित्र, चलचित्र व्यक्त केले जाणारे विचार यांचेही संपादन आवश्यक बनले आहे; अन्यथा समाजामध्ये दुही निर्माण करण्याचा फार मोठा स्रोत फेसबुक बनेल, यात शंका नाही.
Vikas Deshmukh
at karda, tq Risod, dist Washim

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा