शुक्रवार, १७ मे, २०१३

डाव



विकास वि. देशमुख,   
करडा, ता. रिसोड, जि. वाशिम
(Vikas Deshmukh
Karda, tq, Risod, dist. Washim)

शुक्रवार, ३ मे, २०१३

मोहरलेला चंद्रच !


 
पल्या माय मराठीला ज्ञानोबा-तुकोबांपासून अनेक साहित्यिकांनी समृद्ध केले. त्यांच्याच परंपरेतील महात्मा फुले दीन-दलितांसाठी अखंडमधून भांडले. अण्णाभाऊंनी समतेचे विचार मांडले. एकूणच काय तर भंगलेल्यासाठी साहित्यच एकीची कळ झाले. खचलेल्यांसाठी यशाचे
बळ झाले; पण दुर्दैवाने आताच्या काळात स्वजातीतील अनुभव सोडून इतर जातीतील शोषित, पीडितांच्या व्यथेला वाचा फोडणारे साहित्यिक दुर्मीळ झालेत. बाबाराव मुसळे (  Babarao Musale ) हे त्यातीलच एक. आडवळणातील ब्रह्मा (ता. वाशीम) हे छोटेसे गाव ते पुणे विद्यापीठातील बीए, एमएच्या अभ्यासक्रमात समावेश असा त्यांचा प्रवास स्वप्नावतच आहे.
बाबारावांचा जन्म १० जून १९४९ ला वाशीम जिल्ह्यातील मैराळडोह (ता. मालेगाव) या त्यांच्या आजोळी झाला. वडिलांचे गाव ब्रह्मा. त्यामुळे ब्रह्म्यातच त्यांचे बालपण गेले. त्यांची आई कलावती अंगठाबहाद्दर. वडील गंगाराम यांना सही पुरतीच अक्षर ओळख. एकूणच काय तर दोघांनाही शिक्षणाचा गंध नव्हता आणि गावात कुणी फार शिकलेलेही नव्हते. त्यांचे वडील गुरुदेव सेवा मंडळाच्या तालमीत तयार झालेले. वारकरी संप्रदायात रमणारे. विठ्ठलासारखेच भोळे. त्यांचा हाच भोळेपणा बाबाराव यांच्या अंगी भिनला. त्यांची आई मात्र कणखर. व्यवहारी; परंतु आईचा व्यवहारीपणा त्यांना घेताच आला नाही. स्वाभाविकच चार दशकं ते साहित्यिकांच्या गटा-तटाच्या राजकारणापासून दूरच आहेत. इयत्ता पाचवीपर्यंत ते गावातीलच जिल्हा परिषदेत शाळेत शिकले. पुढे जवळच्याच अन
सिंग येथे दहावीपर्यंत शिक्षण घेतले. कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच. निसर्गाची कृपा झाली तर घरात धान्यांची -हासच -हास असायची नाहीतर उभ्या पिकाचा रास व्हायचा. असे असताना त्यांच्या आईवडिलांनी मुसळे यांना बाहेरच्या उन्हाची झळ बसू दिली नाही. आता शांत, संयमी वाटणारे बाबाराव हे लहानपणी फार खोडकर होते. स्वभावात मुजोरी होती. मोठ्या मुलांशी पंगा घेत; पण शिक्षणातही हुशार होते. दहावीपर्यंत त्यांचा पहिला किंवा दुसरा नंबर कायम असायचा. याच काळात त्यांना कवितेची आवड निर्माण झाली. मो. अं. मुळावकर, बी. जे. वाळली हे त्यांचे शिक्षक वर्गात कविता म्हणून दाखवत. मग मुसळ्यांनाही कविता लिहावशी वाटे. त्यातूनच त्यांनी वाचन वाढविले. पुढे दहावीनंतरच्या शिक्षणासाठी ते परभणी जिल्ह्यात नोकरीवर असलेल्या त्यांच्या थोरल्या भावाकडे गेले. परभणीच्या शिवाजी कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित झाला. पहिल्यांदाच त्यांनी मोठे शहर पाहिले. त्यामुळे स्वभावात थोडा बुजरेपणा आला. नव्या शहरी वातावरणामुळे एकलकोंडेपणा वाढला; मात्र कवितेवर जडलेले प्रेम कायमच होते. आपल्याला कवी व्हायचेच याचे जणू त्यांनी व्रतच घेतले होते. त्यांच्या भावाची बदली चुडावा (ता. वसमत) येथील शाळेत झाली. या शाळेत खूप मोठे ग्रंथालय होते. भुकेल्या पाखरांना दाणे दिसावे आणि त्यांनी त्यावर ताव मारावा असेच बाबारावांच्या बाबतीत झाले. त्यांनी या ग्रंथालयातील सर्वच पुस्तके झापाटल्यासारखी वाचून काढली. विविध लेखन प्रकार अभ्यासले. त्या काळी अनेक लेखकांच्या नाखाखाली बीए ही पदवी असायची. ती वाचून बीए होणाराच साहित्यिक होऊ शकतो, असे काहीसे त्यांचे ठाम मत झाले. तर जो कोणावर तरी प्रेम करू शकतो तोच कविता लिहू शकतो, असे गंमतीशीर ठोकताळेही त्यांनी निश्चित केले; पण बाबाराव यांच्यावर कुणी प्रेम करावे, असे त्यांच्यात काहीच नव्हते. त्यांचे हडकुळलं शरीर. साडेचार फूट उंची. त्यामुळे कुठली मुलगी त्यांच्याकडे आकर्षित होणार? मात्र मुसळे यांनी कवी होण्याचे ध्येयच बाळगले होते आणि त्यासाठी प्रेमात पडावे लागेल हा समजही दृढ करून घेतला. तसे ते प्रेमात पडलेही; परंतु वर्गातील वा शेजारच्या मुलीवर नव्हे तर चक्क ड्रिम गर्ल हेमा मालिनीच्या. तिलाच प्रेयसी माणून एकलव्यासारखे त्यांनी आपला काव्यप्रवास सुरूच ठेवला. या काळात अकोल्याच्या ‘स्वराज्य' पाक्षिकात पहिली कविता तर नाशिकच्या ‘कृषीसाधना' या मासिकात पहिली कथा छापून आली. पुढे कथांमागून कथा छापून येऊ लागल्या. त्यावेळी परभणीच्या शिवाजी महाविद्यालयात कार्यरत असलेले डॉ. प्रभाकर मांडे यांनी त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्याकडून अनियतकालिकांच्या चळवळीबद्दल कळाले. त्यानंतर नावाजलेले नियतकालिके, अनियतकालिके यात त्यांच्या कथा येऊ लागल्या.
१९८३ मध्ये पुण्याच्या मेहता पब्लिशिंग हाऊसने तिस-या पिढीची ग्रामीण कादंबरी या स्पर्धेचे आयोजन केले. त्यासाठी बाबाराव यांनी ‘हाल्या हाल्या दुधू दे' ही कादंबरी पाठविली आणि नवल ! महाराष्ट्रातील ४१ हस्तलिखितांमधून ही तिस-या पिढीची एकमेव कादंबरी ठरली. त्यामुळेच मराठी साहित्य क्षेत्रात बाबाराव मुसळे हे नाव एकाएकी चर्चेत आले; मात्र या कादंबरीमुळे त्यांना अचानक प्रसिद्धी मिळाली असे नाही. त्यांच्या आयुष्यात सहजासहजी यशाचे माप सांडले असेही नाही. त्यामागे कठोर मेहनत आणि दांडगा अभ्यास हेच कारण आहे. दरम्यानच्या काळात मुसळे बीएससी, एमएससी बीएड झाले. वाशीम तालुक्यातील पार्डी टकमोर येथील पारेश्वर विद्यालयात शिक्षक म्हणून रुजू झाले आणि त्याच शाळेतून सेवानिवृत्त झाले. त्यांची साहित्य लतिका उत्तोरत्तर बहरतच गेली. १९८५ साली त्यांची ‘हाल्या हाल्या दुधू दे' ही कादंबरी आली. त्यानंतर तब्बल दहा वर्षांनंतर म्हणजेच १९९५ ला त्यांची ‘पखाल' ही दुसरी कादंबरी आली. पु. ल. देशपांडे यांनी ‘पखाल'चे विशेष कौतुक केले. पुढे बाबाराव मुसळे यांची ‘झुंगु लुखू लुखू', ‘मोहोरलेला चंद्र', ‘नगरभोजन' हे कथासंग्रह आणि ‘पाटीलकी', ‘दंश', ‘स्मशानभोग' या कादंब-या प्रकाशित होत राहिल्या तर ‘वारूळ' या कादंबरीने पुन्हा एकदा मराठी साहित्यात खळबळ निर्माण केली. ‘इथे पेटली माणूस गात्रे' हा त्यांचा ‘काव्याग्र'ने प्रकाशित केलेला एकमेव कविता संग्रह आहे. त्यांच्यावर अनेक मानांच्या पुरस्कारांचा वर्षाव होतच आहे. यात दोन वेळा राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कारांचाही समावेश आहे; पण साहित्यिक म्हणून नाव होत असताना त्यांनी आपल्या शिक्षिकीधर्माकडे कधी दुर्लक्ष केले नाही. आज त्यांचे असंख्य विद्यार्थी अनेक उच्चपदांवर कार्यरत आहेत. त्यामुळेच राज्यशासनाने त्यांचा आदर्श शिक्षक म्हणूनही गौरव केलेला आहे.
मितभाषी.. आभाळाएवढं कर्तृत्व तरीही मातीतील माणसांविषयी तळमळ, वागण्यातील नम्रपणा, मोठेपणा कुठेच बडेजाव नाही, खूप साधेपणा, भेटणा-या प्रत्येकाला आपुलकीने बोलणे, नवोदितांना तन्मतेने मार्गदर्शन करणे ही त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये आहेत. वाशीम जिल्ह्यात नव्याने लिखाण करणा-यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी त्यांनी २०१०-११ मध्ये स्वखर्चाने कवितेचा महासंग्राम ही अभिनव काव्यस्पर्धा राबविली. त्यातून एका कवितेला पुरस्कार देऊन उल्लेखनीय कवींच्या कवितांचा विष्णू जोशींच्या मदतीने ‘हंबर' हा प्रातिनिधिक कवितासंग्रह प्रकाशित केला.
मुसळे यांचा ग्रामीण व्यवस्थेचा दांडगा अभ्यास आहे. दलित, आदिवासी, श्रमिक व बारा बलुतेदारांना त्यांनी आपल्या कथेत सामावले. ‘पखाल'मध्ये कोळी बांधवांचे संघर्षशील जीवन रेखाटले. ‘पाटीलकीमध्ये आदिवासींची होणारी पिळवणूक अधोरेखित केली. ‘वारूळ'मध्ये मातंग समाजाची व्यथा कथा मांडली. ‘स्मशानभोग'मध्ये स्मशानजोगी समाजातील व्यक्ती कशा जगातात हे समाजासमोर आणले. त्यांनी साहित्य क्षेत्राच्या कुठल्याच वादाशी संबंध ठेवला नाही. आदिवासी, दलित-श्रमिकांविषयी त्यांना तळमळ आहे. म्हणून त्यांच्या नायक-नायिका त्याच समाजातील आहेत. ते कधी रंजनवादी साहित्य लिहित नाहीत. समाजाची समीक्षा करणारे त्यांचे साहित्य आहे. म्हणूनच ते साहित्य क्षेत्रातच नव्हे तर समाजिकक्षेत्रातही अंधारलेल्यांसाठी ‘मोहरलेला चंद्रचङ्क आहेत.
- विकास देशमुख

करडा, ता. रिसोड, जि. वाशिम

मोबा. ९८५०६०२२७५
 
Vikas V. Deshumkh
Karda, Risod, Washim

मंगळवार, २३ एप्रिल, २०१३

प्रेरणावाटच !

 
एक छोटं तळं होतं. तळ्यात बगळ्यांची इटुकली पिटुकली पिल्लं जलविहार करीत. त्यात एक हडकुळलं, सगळ्यांपेक्षा वेगळं दिसणार पिल्लू होतं. कुरूप-कुरूप म्हणून त्याला सगळेच चिडवत असत. ते पिल्लूही हिरमुसून जायचे.पाण्यात एकटक पाहून आपल्या वेगळ्या दिसण्यावर विचार करायचे. दिवसामागून दिवस गेले. पिल्लं मोठी झाली नि ज्या पिल्लाला सगळे करूप म्हणून हिणवत असतं ते पिल्लू सर्वांपेक्षा वेगळ का, याचा उलगडा झाला. ते पिल्लू बगळ्याचं नव्हतचं मुळी. तर तो एक राजहंस होता. ऐटदार, नितांत सुंदर पण पाहणा-यांच्या नजरेतच सौंदर्य नसल्याने त्याला हिणवले जायचे. शेवटी त्याचं सौंदर्य इतर सर्व पिल्लांनीही मान्य केले. असंच काहीस सिद्धार्थ जाधव या गुणी कलाकरासोबत झालं.
मराठीतील सुपरस्टार अशी सिद्धार्थची आज सबंध महाराष्ट्रात ओळख आहे. हिंदी चित्रपटांतही त्याने आपला ठसा उमटविला आहे; परंतु त्याच्या या यशामागं कठोर परिश्रम आहेत. हेटळणी करणा-या नजरा आहेत. तो कुरूप दिसतोय म्हणून खिल्ली उठविणा-यांचे बोचरे शब्द आहेत तशी पोटाला चिमटा घेऊन आपल्या पोरांनी शिकावं, मोठं व्हावं यासाठी दिवसरात्र काटकसर करणा-या मध्यवर्गीय बापाची मेहनतही आहे. शाळेत असताना सिद्धार्थ नाटकात भाग घ्यायचा. पण त्याच्या सोबत जे असायचे ते त्याच्या दिसण्याहून त्याची टिंगल उडवायचे. पुढे कॉलेजला गेल्यावरही काहीसे हेच अनुभव आले. नाटकांत, चित्रपटांत काम करायचे तर देखणा चेहरा लागतो, असे बरेच जण त्याला म्हणत. पण सिद्धार्थ खचला नाही. ध्येयापासून ढळला नाही. कारण तो आहेच या सगळ्यांपेक्षा वेगळा. कलेतला राजहंसच. कलेसाठी जगणारा. त्यामुळेच त्याने कलेच्या क्षेत्रात धुव्र्र ता-याप्रमाणे आपले स्थान पक्के केले.
२३ ऑक्टोबर १९८१ ला रत्नागिरी जिल्ह्यातील केळवली (ता. राजापूर) या खेड्यात सिद्धार्थचा जन्म झाला. त्याला एक मोठा भाऊ तो डॉक्टर आहे तर त्याची बहीण एनजीओत काम करते. तो सर्वांत लहान आहे. त्यामुळे शेंडेफळ म्हणून या दोघांपेक्षाही त्याचे अधिक लाड झाले. वडील मुंबईत बीएमसी लॅबमध्ये टेक्निकल म्हणून काम करीत असतात. ते मुंबईत एकटेच राहात. बाकी सगळं कुटुंब गावाकडे. वडील दर महिन्याला घरी पगार पाठवत. त्यांच्या पगारातच सगळं भागवावं लागे. नियोजन करताना आईची खूप ओढातान होई. कोकणातल्या समुद्राप्रमाणे या कुटुंबाच्या नशिबीही सुखदुःखाची भरती-ओहटी येई. पुढे १९८८ मध्ये वडिलांनी सगळ्यांनाच मुंबईत नेले. खेड्यातला मोकळेपणा चाळीत बंदिस्त झाला. घरभाड, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, घरखर्च आणि जॉबच्या ठिकाणी जाण्यायेण्याचे प्रवासभाडे या सगळ्यांची जुळवाजुळव करताना वडिलांची फार दमछाक होत होती. पण त्याची झळ त्यांनी आपल्या मुलांना कधी लागू दिली नाही. सिद्धार्थ शाळेतील नाटकात भाग घेऊ लागला. कधी बक्षीसही मिळे. त्याचे खूप कौतुक वाटे. आईवडील आणि त्याच्या भाऊबहिणीने त्याला सतत पाठबळ दिले. आपण नाटकाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घ्यावे असे सिद्धार्थला नेहमी वाटायचे त्यासाठी त्याने मुंबई विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाची प्रवेश परीक्षा दिली. तो पास झाला. प्रवेशही निश्चित झाला. सगळ्या गोष्टींची जुळवाजुळव करणे सोपे आहे. पण पैशांची जुळवाजुळव करणे खूप अवघड आहे, याचा प्रत्यय त्याला आला. अ‍ॅडमिशन फी साठी त्याच्याकडे पैसे नव्हते. वडिलांकडे मागावे तर त्यांची अडचण तो ओळखून होता. स्वाभाविकच तो या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकला नाही. आज त्याच सिद्धार्थला या नाट्यशास्त्र विभागात गेस्ट लेक्चरर म्हणून आंमत्रित केलं जातं. हे पाहून त्याच्या आईवडिलांची छाती आनंदाने फुगून जाते.
आजवर सिद्धार्थने अनेक नाटकांत, चित्रपटांत काम केले. सध्या तो ‘धमाल मस्ती’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. इतर चित्रपटांप्रमाणेच या चित्रपटांतही तो मनापासून अभिनय करीत आहे. आपल्या कामाशी प्रामणिक राहणे हा त्याचा स्वभाव धर्म आहे. आयुष्यात कधी आत्मविश्वास गमाविला नाही आणि आईवडिलांवरील श्रद्धा कमी होऊ दिली नाही, यामुळेच इथेपर्यंत पोहोचू शकलो, असे तो अत्यंत नम्रपणे सांगतो. निश्चित त्याचा प्रवास म्हणजे प्रेरणा वाटच आहे.
                                                                                                          - विकास वि. देशमुख

                                                                                                             Vikas Deshmukh
                                                                                                             Karda, Risod, Washim

सोमवार, ८ एप्रिल, २०१३

क्रेझीमुआऽऽऽ

‘अरे ! क्रेझीमुआ म्हणजे काय रे? जरा तुझ्या इंग्रजींच्या सरांना विचारतोस का? मी सगळ्या डिक्शन-या चाळल्या; पण अर्थ सापडला नाही. सध्या असे संवाद मराठी चित्रपटातील बडे निर्माते, स्टार कलाकार यांच्या घरात ऐकायला मिळत आहेत. कुणी तर लाडात येऊन त्याच्या बायकोलाही म्हणत आहे, ‘अगं, तुला क्रेझीमुआऽऽऽ माहितीये का?’ त्यावर त्याची बायको त्याचा हात सोडवत ‘आता लाडात येऊ नका जा शूटिंगवर’ म्हणत आहे. थोडक्यात सध्या मराठी कलाकारांत ‘क्रेझीमुआ’ चा अर्थ शोधण्याची क्रेझ आलीय. त्याला कारणही तसंच आहे. क्रेजिमोआ प्रोडक्शनच्या ‘झोलझाल प्रेमाचा’ या मराठी चित्रपटाचे काम सुरू आहे. या प्रोडक्शनचा हा पहिला चित्रपट आहे. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाची खूप चर्चा होत आहे. त्यामुळे अचानक ‘क्रेझीमुआ’ हे नाव चर्चेत आलंय. तसा या शब्दाचा मराठीत काय अर्थ होतो याचा शोध घेण्याचा आम्हीही प्रयत्न केला. अनेक प्राध्यापकांना भेटलो, भाषातज्ज्ञांना भेटलो; पण यश आलं नाही राव ! मग ठरवलं थेट क्रेझीमुआ प्रोडक्शनच्या संस्थापक सीमा उपाध्ये यांनाच भेटून आपली झोलझाल थांबवायची. मग ‘झोलझाल प्रेमाचा’ चा सेट गाठला. शूटिंग रंगात आलं होतं. तिथे आपला सिद्धू अर्थातच सिद्धार्थ जाधव, विजय पाटकर, प्रिया बेर्डे, तेजस्विनी पाटील, स्मिता गोंडकर होते; पण खूप वर्षांनंतर नवीन प्रभाकरही दिसला. मीच मला ‘पहेच्चान कोण?’ म्हणत त्याला ओळखलं. एकदाचे चित्रीकरण थांबले. सगळे एकत्र आले. मग आमच्या गप्पाही रंगल्या. आपलं अज्ञान व्यक्त होऊ नये म्हणून मी दबक्या आवाजात सीमातार्इंना विचारलं, ‘ताई, के्रझी म्हणजे माहितीये; पण मुआ काय भानगड आहे? मी इंग्रजीच्या ब-याच तज्ज्ञांना विचारलं; पण कुणालाच सांगता आलं नाही.’ सीमाताई हसल्या. म्हणाल्या, ‘तू ना क्रेझीच आहेस ! अरे, कसं सांगणार ते. ‘मुआ’ हा शब्द इंग्रजी नाहीच आहे. तो फे्रंच आहे आणि मुआ म्हणजे मी. मग क्रेझीमुआ म्हणजे काय?’ मी लगेच उत्तरलो, ‘वेडा मी !’ त्यावर ताई म्हणाल्या ‘हंऽऽ आणि अजून होणार आहे.’ मी म्हटलं ‘कसं बुआ?’ . मध्येच विजय पाटकर बोलले, ‘काहीच दिवसांत ‘झोलझाल प्रेमाचा’ प्रदर्शित होणार आहे. आतापर्यंतच्या मराठी चित्रपटांतील हा सर्वाधिक दर्जेदार विनोद असलेला चित्रपट आहे. सलग दोन तास आम्ही तुला हसवणार आहोत. मग हसून-हसून तू वेडा होणार ना!’ हे ऐकूनच माझ्या चेह-यावरही हसू उमटलं. सिद्धार्थ जाधवसुद्धा बोलता झाला. तो म्हणाला, ‘मी मराठी आणि हिंदीत अनेक चित्रपट केलेत. ब-याच चित्रपटांच्या कथेत तोच तो पणा होता; पण ‘झोलझाल प्रेमाचा’ ची कथा खूप वेगळी आहे. ती जशी विनोदी आहे तशी प्रेक्षकांची उत्कंठा वाढविणारी आहे’ , असे सांगत त्याने हा चित्रपट कसा दर्जेदार आणि मराठीत माईलस्टोन होणार हे पटवून दिले. नवीन प्रभाकरलाही मराठी चित्रपटाचा अनुभव नवीनच होता. तो म्हणाला, ‘माझी मातृभाषा मराठी आहे. दुर्दैवाने मला मराठीत काम करण्याची फारशी संधी मिळाली नाही; पण आता सीमातार्इंनी ती संधी दिली. त्यामुळे आपल्या घरी आईच्या कुशीत आल्यासारखे वाटत आहे’ , हे सांगताना तो थोडासा भावनिक झाला. आपल्या अनुभवाने प्रसंग ओळखून विजय पाटकर यांनी त्याचा कान पकडला नि म्हणाले, ‘आता आईच्या कुशीत झोपू नको ! आजचं काम बाकी आहे,’ त्यावर एकच हशा पिकला. विजयभाऊंनी चित्रपटाचे संगीत आणि गीतरचना कशा लोकप्रिय होणार ते सांगितले. ‘आतापर्यंतच्या भूमिकांपैकी या चित्रपटातील भूमिका मला पूर्ण समाधान आणि न्याय देणारी आहे’ , अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या चित्रपटाची कथा आणि पटकथा हेमंत एदलाबादकर यांनी लिहिली आहे. अमित राज यांचे संगीत आहे. कला दिग्दर्शक सुनील व-हाडकर, रंगभूषा मनोज वडके, संकलन सर्वेश परब, वेशभूषा आशिष डॅव्हर, ध्वनी अनिल निकम आणि कार्यकारी निर्माता म्हणून प्रमोद मोहिते ही मंडळी काम पाहात आहेत. 
या सगळ्या चर्चेमुळे आता ‘झोलझाल प्रेमाचा’ पाहण्याची माझी उत्सुकता वाढली. त्याचे चित्रीकरण कधी पूर्ण होईल याचीच मी वाट पाहात आहे. एकूणच काय तर ‘क्रेझीमुआ’ झालोय. तुम्हीही व्हा ! पण ‘झोलझाल प्रेमाचा’ पाहूनच! 

- विकास वि. देशमुख  
करडा, रिसोड, वाशीम.


Vikas V. Deshmukh 
Karda, tq- Risod, dist- Washim

गुलाम नाही योद्धे पैदा होताहेत !


 

ध्या सबंध महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीतील कार्यकत्र्यांना लक्ष्मण मानेंच्या क्रुरकृत्यामुळे शरमेने मान खाली घालावी लागत आहे. शासनासोबत राहून आणि व्यवस्थेशी जुळवून घेतल्यामुळे माने यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. शिवाय दोन वेळा विधान परिषदेतही पाठविण्यात आले. असे असताना त्यांनी स्त्रीदास्य मुक्ती म्हणत स्वतःच महिलांचे शोषण केले, असा आरोप होत आहे. दरम्यान, त्यांनी आश्रम शाळांच्या अनुदानातून आपले बँक बॅलन्स वाढविले. आता त्यांच्यावरील आरोपामुळे ते कुठे लपले आहेत याचा कुणालाच थांगपत्ता नाही. या उलट सातत्याने सरकारच्या विरोधात बोलणा-या आणि हजारो वर्षांपासून दलित, आदिवासी, श्रमिक यांच्या मेंदूला लावलेले टाळे आपल्या कलेच्या माध्यमातून खोलणा-या कबीर कला मंचच्या शाहीर शीतल साठे आणि शाहीर सचिन माळी या गुणी आणि ‘विद्रोही' कलाकारांवर ते नक्षलवादी असल्याचा संशय घेतला जात आहे. यामुळेच व्यथित होऊन या दोन्ही कलाकारांनी मंगळवारी (दि.२ एप्रिल) स्वतःला अटक करून घेतली. त्यांच्या या निर्णयामुळे निश्चितच डाव्या चळवळीत काम करताना ते ‘उजवे' ठरले आहेत. गुलामाला गुलामीची जाणीव करून देणारे हे योद्धे आहेत. त्यांचा लाल सलामचा सूर्य आता अजून प्रखरतेने तळपळणार आहे. विशेष म्हणजे शाहीर शीतल साठे ही सहा महिन्यांच्या गरोदर आहे.
सचिन आणि शीतलचा खरोखरच नक्षलवादी चळवळीला पाठिंबा आहे की नाही, हे पोलिस तपासात उघड होईलच; पण या पोरांनी कधी हातात बंदूक घेतली नाही. घेतली ती लेखणी आणि ढोलकी. ढोलकीवर थाप देऊन ते पाड्या-पाड्यावर, बेड्या-बेड्यावर बाबासाहेबांचे, भगतसिंगाचे, महात्मा फुल्यांचे आणि माक्र्सचे विचार पोहोचविण्याचे काम करीत आहेत. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी ‘घुंगराची काठी रं दादा सावकाराच्या माथी हानङ्क म्हणत स्वाभिमान पेरत आहेत. ‘ये भगतसिंग तू जिंदा है' असे सांगत देशप्रेम जागं करीत आहेत.
‘रामाच्या राज्यात ह्या रोज शंभूक मरतो । शूद्र एकलव्याचा कुणी अंगठा खुडतो कुणी अंगठा खुडतो बळी पाताळी गाडतो । डोळे शुद्रांचे फोडतो। तुका वैकुंठी धाडतो।' हा इतिहास डफावर थाप मारून जागवणारा सचिन माळी नक्षलवादी ठरतो. त्याच्या खांद्याला खांदा भिडवून शीतल साठे ‘या रे खुळ्या जमिनीत क्रुर व्यवस्था नांदतेङ्क असे सांगत त्याला सोबत करते आणि ही क्रांतिकारी जोडी आज गुन्हेगार ठरते डोके सुन्न झालेय. त्यामुळेच काही प्रश्न उपस्थित झालेत. आपल्या हक्काबद्दल लोकशाही मार्गाने गाणे म्हणणे, कविता-लेख लिहिणे, पथनाट्यातून जागल करणे आणि बाबासाहेब, फुले, भगतqसग यांचे तत्त्वज्ञान कवनांच्या माध्यमातून सांगणे म्हणजे नक्षलवाद का? आणि दुसरीकडे इतर धर्मवादी खुलेआम हातात नंग्या तलवारी नाचवून माणसांच्या कत्तली करू, असे बोलतात. भडकाऊ भाषणे देऊन शहरा-शहरांत दंगली माजवतात, जातीय-धर्मीय वक्तव्ये करून आणि लोकांना भडकावून एकमेकांचे गळे सरेआम कापू शकतात; पण क्रांतिगीते/विद्रोही गीते गाऊन, इथल्या समाजव्यवस्थेवर आसूड ओढले की तुम्ही चक्क नक्षलवादी ठरता ? अजब आहे हे सरकार ? पुरोगामी महाराष्ट्रातील हा कुठला न्याय?
मुळात कबीर कला मंच ही संघटना कलाप्रेमींची आहे. झोपलेल्यांना जागे करणे हे कलाकारांचे प्रमुख काम आहे याची जाण या कलाकारांना आहे. ते मनोरंजन करीत नाहीत तर झापड असलेल्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालतात. खैरलांजी हत्याकांडानंतर कबीर कला मंचने राज्यात सर्वत्र सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून दलित, शोषित, असंघटित कामगारांना एकत्र आणण्याच्या दृष्टिकोनातून जनजागृती केली.त्यात शाहीर शीतल साठे व माळी यांचा सहभाग होता. त्याचवेळी एटीएसने मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर येथून नक्षलवादी विचारांचा, साहित्याचा प्रचार व प्रसार करणाèया कार्यकत्र्यांची, शाहीर, कलाकारांची धरपकड सुरू केली.
यात केवळ शीतल आणि सचिन हे दोघेच काम करीत नाहीत तर शोषित, पीडित कुटुंबामध्ये जन्माला आलेले अनेक तरुण-तरुणी यात आहेत. ही सगळी मंडळी पुणे-मुंबई परिसरातील आहे. यापैकी शीतल ही २००२ मध्ये कबीर कला मंचमध्ये सहभागी झाली. ती उत्तम गायिका आणि कवयित्री आहे तर सचिन हासुद्धा लेखक, कवी आहे. ‘गुलाम नाही योद्धे पैदा होताहेत' हा त्याचा वास्तवादी विचार मांडणारा आणि शोषण करणा-या व्यवस्थेवर कडाडून हल्ला करणारा काव्यसंग्रह २००८ मध्ये प्रकाशित झाला आहे. या संग्रहाच्या मनोगतातच त्याने म्हटले आहे, ‘ यातील कविता मूळ कवीची (म्हणजेच सचिन माळी) परवानगी न घेता छापण्यास मुभा आहे. त्याखाली कवीचे नाव छापावेच असे बंधनकारक नाही.', यातूनच आपल्या कार्याशी आणि विचारांशी तो किती प्रामाणिक आहे, याची पावती मिळते. अशांनाच ही व्यवस्था तुकारामाप्रमाणे वैकुंठी पाठविण्याचे नियोजन करीत आली आहे. झालेच कधी तर आश्रम शाळा, शिक्षण संस्था, महामंडळ, आमदारचा तुकडा देऊन त्याला लाचार केले जाते. याला इतिहास साक्षी आहे. हेच होऊ नये यासाठी अमरनाथ चंदेलिया यांच्या पुढाकाराने कबीर कला मंचची स्थापना झाली. या चळवळीत अनेक जण पूर्ण वेळ आहेत. ही मंडळी आपल्या जवळ कधी बंदुक वा स्फोटके ठेवत नाहीत. त्यांच्याजवळ आहेत अन्याय निवारण्याचे विचार. या विचारांमुळे यापुढे गुलाम नाही तर शिवबासारखे योद्धेच पैदा होतील. त्यामुळे शोषण व्यवस्था हादरून जात आहे. हेच या व्यवस्थेला नको आहे. त्यामुळेच ही पोरं नक्षलवादी असल्याचा आरोप केला जात आहे. (तिकडे ख-या नक्षलवाद्यांसमोर हेच सरकार हतबल झाले)
यांच्यापैकीच एक असलेला मुंबईच्या भायखळ्यातील साहित्यिक सुधीर ढवळे याच्यावरही २०१० मध्ये नक्षलवादी असल्याचा आरोप ठेवला गेला. चंद्रपूर येथे त्याला एका साहित्य संमेलानातून अटकही केली गेली. आजही त्याच्यावरील आरोप निश्चित नाही; पण केवळ संशयाच्या आधारावर तो कारागृहात खीतपत पडून आहे. असेच शंतनू कांबळे याच्याही बाबतीत झाले होते. या दोघांप्रममाणेच शीतल आणि सचिन यांच्यावर ही वेळ आली आहे. या शिवाय थोर सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्यासह नागेश चौधरी, यशवंत मनोहर यांच्यावर अशाच प्रकारचा आरोप आपल्या पोलिसांनी केला होता. त्यावेळी खुद्द आर. आर. पाटील यांना माफी मागावी लागली होती. तिच चूक पुन्हा केली जात आहे. शासनाची दडपशाही अशीच सुरू राहिल्यास खरोखर महानगरातील दलित आदिवासी नलक्षवादी होतील; पण असे होऊ नये हे टाळणे शासनाच्याच हाती आहे. तूर्त या दोन कॉम्रेडला जय भीम !


- विकास वि. देशमुख 

 करडा, रिसोड, वाशीम.

Vikas Deshmukh
Karda, Risod, Washim

मंगळवार, २ एप्रिल, २०१३

कॉम्रेड जय भीम !


सध्या सबंध महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीतील कार्यकत्र्यांना लक्ष्मण मानेंच्या क्रुरकृत्यामुळे शरमने मान खाली घालावी लागत आहे. शासनासोबत राहून आणि व्यवस्थेशी जुळवून घेतल्यामुळे या मानेला पद्मश्री पुरस्कार मिळाला. शिवाय दोन वेळा विधान परिषदेतही पाठविण्यात आले. असे असताना या मानेने स्त्रीदास्य मुक्ती म्हणत स्वतःच महिलांचे शोषण केले. आश्रम शाळांच्या अनुदानातून आपले बँक बॅलन्स वाढविले. आता त्याच्यावरील आरोपामुळे तो कुठे लपला याचा कुणालाच थांगपत्ता नाही. या उलट सातत्याने सरकारच्या विरोधात बोलणा-या आणि हजारो वर्षांपासून दलित, आदिवासी, श्रमिक यांच्या मेंदूला लावलेले टाळे आपल्या कलेच्या माध्यमातून खोलणा-या कबीर कला मंचच्या शीलत साठे आणि सचिन माळी या गुणी आणि ‘विद्रोेहीङ्क कलाकारांवर ते नक्षलवादी असल्याचा संशय घेतला जातो. यामुळेच व्यथित होऊन या दोन्ही कलाकारांनी मंगळवारी (दि.२ एप्रिल) स्वतःला अटक करून घेतली. त्यांच्या या निर्णयामुळे निश्चितच डाव्या चळवळीत काम करताना ही दोघे ‘उजवे' ठरली आहेत. त्यांच्या या बेधडक निर्णयामुळे दोघा कॉम्रेडला जय भीम !त्यांचा खरोखरच नक्षलवादी चळवळीला पाठिंबा आहे की नाही, हे पोलिस तपासात उघड होईलच; पण या पोरांनी कधी हातात बंदूक घेतली नाही. घेतली ती लेखणी आणि ढोलकी. ढोलकीवर थाप देऊन ते पाड्या-पाड्यावर बेड्या-बेड्यावर बाबासाहेबांचे, भगतqसगाचे आणि महात्मा फुल्यांचे विचार पोहोचविण्याचे काम करीत आहेत. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी ‘घुंगराची काठी रं दादा सावकाराच्या माथी हान' म्हणत स्वाभिमान पेरत आहेत. ‘ये भगतसिंग तू जिंदा है' असे सांगत देशप्रेम जागं करीत आहेत.मग आपल्या हक्काबद्दल लोकशाही मार्गाने गाणे, कविता, लेख यांच्या माध्यमातून बोलणे म्हणजे नक्षलवादी का? बाबासाहेब, फुले, भगतसिंग यांचे तत्त्वज्ञान कवणांच्या माध्यमातून सांगणे म्हणजे नक्षलवादी काय? आणि दुसरीकडे सत्ताधा-यांची हुजेरिगिरी करणे. त्यांना दलित-आदिवासींचे गठ्ठा मतदान मिळून देणे अशी कामे करून थुंकी चाटणा-या मानेला मानाचा पद्मश्री व आमदारकी तर या उलट दलित, श्रमिक यांच्या उद्धारासाठी आपलं अख्खं आयुष्य वाहून घेणा-यांना या उच्चशिक्षित तरुणांच्या माथी नक्षलवादी असल्याचा आरोप. शिवाय त्यांच्या विद्रोही ‘मासिका'वर बंदीचीही मागणी. पुरोगामी महाराष्ट्रातील का कुठला न्याय?मुळात कबीर कला मंच ही संघटना कलाप्रेमींची आहे. झोपलेल्यांना जागी करणे हे कलाकारांचे प्रमुख काम आहे याची जाण या कलाकारांना आहे. ते मनोरंजन करीत नाहीत तर झापड असलेल्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालतात. यात केवळ शीतल आणि सचिन हे दोघेच काम करीत नाहीत तर शोषित, पीडित कुटुंबामध्ये जन्माला आलेले अनेक तरुण-तरुणी यात आहेत. ही सगळी मंडळी पुणे-मुंबई परिसरातील आहे. यापैकी शीतल ही २००२ मध्ये कबीर कला मंचमध्ये सामील झाली. ती उत्तम गायिका आणि कवयित्री आहे तर सचिन हासुद्धा लेखक, कवी आहे. ‘गुलाम नाही योद्धे पैदा होताहेत' हा त्याचा वास्तवादी विचार मांडणारा आणि शोषण करणा-या व्यवस्थेवर कडाडून हल्ला करणारा काव्यसंग्रह २००८ मध्ये प्रकाशित झाला आहे. कबीर कला मंचची स्थापना अमरनाथ चंदेलिया यांच्या पुढाकाराने झाली. यांच्यापैकीच एक असलेला मुंबईच्या भायखळ्यातील साहित्यिक सुधीर ढवळे याच्यावरही २०१० मध्ये नक्षलवादी असल्याचा आरोप ठेवून चंद्रपूर येथे त्याला अटक केले. आजही त्याच्यावरील आरोप निश्चित नाही; पण केवळ संशयाच्या आधारावर तो कारागृहात खीतपत पडून आहे. त्याच्या प्रमाणेच या दोन पोरांवर आता असेच खीतपत पडून राहण्याची वेळ येईल का? या शिवाय थोर सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्यावर अशाच प्रकारचा आरोप आपल्या पोलिसांनी केला होता. त्यावेळी खुद्द आर. आर. पाटील यांना माफी मागावी लागली होती. तिच चूक पुन्हा केली आहे. शासनाची दडपशाही अशीच सुरू राहिल्यास खरोखर महानगरातील दलित आदिवासी नलक्षवादी होतील; पण असे होऊ नये हे टाळणे शासनाच्या हाती आहे.


- विकास वि. देशमुख 


करडा, रिसोड, वाशीम.

Vikas Deshmukh
Karda, Risod, Washim

बुधवार, २० मार्च, २०१३

अभंग

विकास वि. देशमुख यांच्या अभंग वृत्तातील चार-चार ओळीच्या कविता.
 (Vikas V. Deshmukh Karda, Tq- Risod, Dist- Washim) 

रविवार, १७ मार्च, २०१३

ये ‘आसुमल थाऊमल सिरुमलानी' रंगिला है !


 महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्ये सध्या भीषण दुष्काळाच्या दाहकतेने भाजून निघाले आहेत. हा दुष्काळ अन्न-धान्याचा नाही. तो पाण्याचा आहे. कधी नव्हे ते यंदा ऐन हिवाळ्यातच जलसाठे कोरडे पडले. त्यामुळे पेयजलाचा प्रश्न ऐरणीवर आला. माणसं गाव सोडून गुराढोरांसह भटकंती करीत आहेत. वन्यप्राणी तडफडून मरत आहेत. असे असताना  अंधळ्या भाविकांचे श्रद्धास्थान असलेले असाराम बापू आणि त्यांच्या असंख्य भाविकांनी महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये कस्तुरचंद पार्कवर धूळवड खेळली. त्यासाठी लाखो लीटर पाण्याची नासाडी केली. विशेष म्हणजे नागपुरातही पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. आपल्या तहानलेल्या नागरिकांना पाणीपुरवठा करण्याचे सोडून नागपूर  महानगरपालिकेने  या धूळवडीसाठी टँकरने पाणी पुरवविले. आसाराम बापूंनी भक्त आणि भक्तीनींच्या अंगावर पाण्याचे फवारे उडविले. भक्तांनीसुद्धा मोठ्या रंगात येऊन आपल्या सोबतच्या भक्तीनींना बापूंच्या साक्षीने रंगविले. त्यामुळे आसाराम बापूंचा रंगिला स्वभाव पुन्हा एकदा दिसून आला. आसारामबापू हे वातानुकूलित गाडीतून फिरतात. कडेकोट संरक्षणात वावरतात. रोज मिष्टान्न खातात. भक्तीचा व्यवसाय करतात. चित्रविचित्र पोषाख घालतात. कधी मुड झालाच तर गुरूचा बुरखा उतरवून नाचा होत नाचतात. स्वतःला देव म्हणतात. यामुळेच ते असामान्य वाटतात. म्हणूनच की काय, सामान्य दुष्काळग्रस्तांचे   पाण्यासाठी होत असलेले हाल त्यांच्या ‘दिव्य दृष्टी'ला दिसत नाहीत.  मुळात या बापूंचे नाव आसुमल थाऊमल सिरुमलानी आहे. १७ एप्रिल १९४१ रोजी पाकिस्तानातील  बेरानी (नवाबशहा)  या गावी त्यांचा जन्म झाला.  फाळणीनंतर त्यांचं कुटुंब भारतात अहमदाबाद आले. ते लहान असतानाच त्यांचे वडील मरण पावले. त्यामुळे लिहिता-वाचता येईल एवढंच शिक्षण ते घेऊ शकले. व्यवसाय म्हणून त्यांनी एका छोट्या मंदिरात पूजारी म्हणून काम सुरू केले. धंदा ब-यापैकी चालत होता. त्यामुळे आसुमल यांच्यासाठी चांगली स्थळे येऊ लागली. त्यांच्या आईने एक चांगल स्थळ निवडून लक्ष्मीदेवी यांच्याशी त्यांचे लग्न ठरविले; पंचाग पाहून मुर्हुत शोधला; मात्र इथेच माशी शिंकली अन्  लग्नापूर्वी आसुमल घरातून पळून गेले. सासरकडच्या मंडळींनी त्यांचा शोध घेतला. त्यांना धकमावले. त्यामुळे घाबरून जावून त्यांनी अखेर त्यांनी नव्या मुर्हुतावर लग्न केले. पुढे काही काळ  संसार करून आसुमल हे उत्तर प्रदेशातील वृंदावन येथे गेले. तेथून संपूर्ण देशात आपला धंदा वाढविला. अजूनही वाढवित आहेत. या अल्पशिक्षित बापूंना अनेक उच्चशिक्षित शिष्य मिळाले. ज्यांनी कोणी गैरमार्गाने, गरिबांचे शोषण करून, देशाची लुबाडणूक करून पैसा कमाविला असे नवश्रीमंत भक्त या लबाड बापूंना दान देऊन त्यांचे घबाड भरत आहेत. पैशामुळे या बापूंना माज चढत आहे. परिणामी, दिल्ली बलात्कार असो वा राहुल गांधी अशा कुठल्याही विषयावर ते बेतालपणे भाष्य करतात. हे करीत असताना त्यांनी आयुर्वेदिक औषधी विकण्याचा धंदाही वाढविला. गावोगावी आपल्या भक्तांना आपल्या उत्पादनाची दुकान थाटायला भाग पाडले. या धंद्यांसोबतच कायदे, नियम गुंडाळून ठेवण्याची त्यांची वृत्तीसुद्धा विकसित झाली. गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातील भैरवी या गावी राज्य सरकारकडून दहा एकर जमीन घेतली आणि तेथे अलिशान आश्रम बांधला. हळूहळू या आश्रमाच्या बाजूची जमीनही ताब्यात घेतली. ज्यांच्या जमिनी बळकावल्या त्यांनाच धमकावले. मग या पीडितांनी पोलिसांकडे तक्रार केली. अखेर राज्य सरकारने सहा एकर अनधिकृत जागेवरील आश्रमाचे बांधकामवर बुलडोजर चालविला. त्यांच्या आयुष्यात असे अनेक वादग्रस्त बेकायदा घटना आहेत. त्या कुठल्याही सज्जन माणसाचे गुंड व्यक्तीत रुपांतर करायला पुरेशा आहेत. बापूंचाच शिष्य असलेला राजू चांडक याने एकदा या बापूंना एका भक्त स्त्रीसोबत अश्लिल चाळे करतात पाहिले. जे पाहिले ते त्याने  डिसेंबर २००९ मध्ये न्यायलयात एका प्रतिज्ञापत्र लिहून दिले. त्यामुळे साबरमती येथील रामनगरात राजूवर दोन अज्ञात इसमांनी हल्ला केला. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदला आणि राजू चांडक याच्यावरील खुनीहल्ल्याचा प्रयत्न केल्याबद्दल आसारामबापू यांच्यावर गुन्हा नोंदण्यात आला. त्यापूर्वी आणखी एका प्रकरणात आसारामबापूंच्या आश्रमातील गुरुकुल शाळेत शिकणा-या दीपेश वाघेला आणि अभिलाष वाघेला या १० व ११ वर्षांच्या मुलांचे मृतदेह साबरमती नदीच्या पात्रात आढळून आले. त्याविरुद्ध अनेक पालकांनी संतप्त तक्रारी पोलिसांकडे केल्या. या प्रकरणाची सीआयडी चौकशी गुजरात सरकारने घोषित केली. सात साधकांना पोलिसांनी अटक केली. आसारामबापू यांच्या आश्रमात काळीजादू, मंत्रतंत्र याचे अघोरी प्रयोग केले जातात, त्यासाठी बहुधा या मुलांच्या हत्या झाल्या असाव्यात असे पोलिसी तपासात म्हटले होते. या गूढ मृत्यूचे रहस्य आता आणखी गहिरे झाले आहे.बापूंचेच गुण वारसा हक्काने त्यांच्या चिंरजिवांच्या स्वाभावात उतरले. त्यामुळेच त्याच्याही प्रेमलीलाही बाहेर आल्या आहेत.  त्यांचा मुलगासुद्धा स्त्री लंपट निघाला. हेच यांचे संस्कार आहेत. कारण जे पेरले तेच उगवणार हा नियम आहे.  

- विकास वि. देशमुख  
करडा, रिसोड, वाशीम.

Vikas V. Deshmukh 
Karda, tq- Risod, dist- Washim


धर्मनिरपेक्ष शिवाजी महाराज


त्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या आदराचे आणि भक्तीचे उत्तुंग असे स्थान आहे. प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात शिवछत्रपतींबद्दल अतीव अभिमान भरलेला आहे. खरे तर शिवछत्रपती हे सा-या भारताचे अस्मिता स्थान आहे. त्यामुळे केवळ महाराष्ट्राने शिवाजी महाराजांच्या अभिमानावर  मालकी सांगू नये. शिवछत्रपती हे देशातील कोट्यवधी लोकांना आदर्श वाटतात, कारण त्यांच्याबद्दल जसा त्यांना अभिमान वाटतो तसाच आपलेपणाही वाटतो. शिवाजी राजांच्या युद्धनीतीमुळे त्यांना जागतिक पातळीवरही मान्यता मिळाली. जेव्हा शत्रू बलाढ्य असतो आणि तो त्याला फारशी माहिती नसलेल्या क्षेत्रात युद्धासाठी उतरतो तेव्हा त्याला नामोहरम करण्यासाठी गनिमी कावा कसा वापरावा याचा आदर्श छत्रपती शिवाजी  राजांनी आपल्या युद्धतंत्रामुळे निर्माण केला. म्हणूनच व्हिएतनाममध्ये अमेरिकेची बलाढ्य सेना उतरल्यावर तेथील जनतेचे लोकनेते हो चि मिन्ह यांनी शिवाजी राजांचे ‘गोरिला वॉरफेअरङ्क तंत्र वापरले. विश्वविजयी अमेरिकी सेनेला अखेर व्हिएतनाममधून नामुष्कीची माघार घ्यावी लागली. अनेक इंग्रज इतिहासकारांनी शिवछत्रपतींच्या युद्धतंत्राची तुलना  हानिबल, ज्युलियस सिझर, नेपोलियन यांच्याशी केली आहे. भारतात सागरी बळ वाढविण्याची दृष्टी शिवछत्रपतींकडे होती. त्यामुळेच त्यांनी कोकण किना-यावर सिंधुदूर्गसारखे सागरदुर्ग बांधले आणि पहिल्या भारतीय आरमाराची उभारणी केली होती. तत्कालीन ब्रिटिश राज्यकत्र्यांनी शिवछत्रपतींच्या या दूरदृष्टीची नोंद घेतल्याचे ठिकठिकाणच्या कागदपत्रांवरून दिसते. एक आदर्श प्रजाहितदक्ष राजा, उत्कृष्ट प्रशासक, राजकारणापासून धर्माला सुरक्षित अंतरावर ठेवणारा विचारी नेता असे अनेक गुण शिवछत्रपतींच्या व्यक्तिमत्त्वात दिसतात. त्यांच्या चरित्रात आणि चारित्र्यामध्ये शाश्वत जीवनमूल्ये आणि पुरोगामी आशय दिसतो. त्यामुळेच चारशे वर्षांनंतरही शिवछत्रपतींची सर्वसामान्य लोकमनावरील
जादू कधी कमी होणार नाही.अशी सर्वांना भावणारी व्यक्तिमत्त्वे अनेकदा समाजातील वरिष्ठ वर्गाला, राजकीय नेत्यांना सोयीची वाटतात आणि आपल्या विचाराप्रमाणे त्या लोकोत्तर पुरुषावर रंग चढविण्याचा प्रयत्न होतो. अनेकदा जनमानसातील शिवछत्रपतींचे स्थान आपल्या राजकीय किंवा सामाजिक, धार्मिक स्वार्थासाठी वापरण्याचा मोह अनेकांना होतो. त्यामध्ये निखळ आदरभाव, भक्ती किती आणि विविध प्रकारचे लाभ मिळविण्याचे प्रयत्न किती हे समजणेही अनेकदा खूप अवघड होते. आज राजकीय व सामाजिक क्षेत्रात गावोगावी उगवणा-या अनेक संस्था शिवछत्रपतींचे नाव वापरतात. बहुधा त्यांचे वर्तन मात्र शिवछत्रपतींच्या आदर्शांविरुद्धच असते. महाराष्ट्रात ठिकठिकाणी उभा राहिलेली शिवस्मारके ही अशा संमिश्र गोष्टींचे फलित आहे. काही लोकांना शिवाजीराजे ही आपल्या जातीची, समाजाची मिरासदारी वाटते. काही राजकारण्यांना शिवाजीराजांचा भगवा ध्वज सोयीचा वाटतो. काहींना राजांनी आदिलशहा  qकवा औरंगजेब यांच्याशी दिलेला ऐतिहासिक लढा हा धर्मगौरव वाटतो. पण राजांचा लढा हा धार्मिक कधीच नव्हता. तसे असते तर त्यांनी आपल्या सैन्यातील महत्त्वाची पदे मुस्लिम योद्धे किंवा सेनानी यांना बहाल केली नसती. केवळ हिंदवी स्वराज्य ही कल्पना त्यांनी आपली मानली नाही तर प्रजेचा न्यायप्रिय राजा होण्यात मोठेपणा मानला.

शुक्रवार, १५ मार्च, २०१३

बेंच


कॉलेज सुटतं. आयुष्यात स्थिरावण्याचा प्रयत्न सुरू होतो. तरीही कॉलजेच्या मोरपंखी आठवणी मनात रुंजी घालतात. आठवतो तो मित्रांसोबत शेअर केलेला बेंच. बोअर झालेल्या पिरिअडमध्ये उगाचच त्या बेंचवर गिरवलेल्या चारोळ्या. तिथेच मांडलेला फुल्ली-गोळ्य़ाचा डाव तर कधी आपल्याला आवडणा-या तिचं किंवा त्याचं नाव तर उगाचच खोडी म्हणून दिलच्या चिन्हात लिहिलंल त्या दोघांचं नाव. त्यावर प्राचार्यांकडे झालेली तक्रार अन् कानाचे पडदे फाटेस्तोर ऐकून घ्यावं लागलेलं लेक्चर. परीक्षेच्या काळात कोणत्या बेंचवर आपला नंबर येणार ते आदल्याच दिवशी हुडकून शिपायाला फूस लावून त्या बेंचवर लिहिलेले उत्तराचे मुद्दे असं बरंच काही.. काही.
कॉलेजच्या आयुष्यात प्रत्येकाचाच सख्खा मित्र असतो बेंच. कुणाचा अगदी पहिल्या रांगेत सर्वात पुढचा, कुणाचा मधल्या रांगेतला तर कुणाचा अगदी शेवटचा. कोण कुठल्या बेंचवर बसतं यावरून त्यांचा स्वभावसुद्धा लक्षात येतोे. अगदी पुढे बसणारे नम्र असतात. नाकाच्या दिशेनं चालणारे. दिलेलं होमवर्क करणारे. केवळ आपणच कसं टॉप राहू असाच विचार करणारे. स्वतःला जपणारे. या उलट शेवटच्या बेंचवर बसणा-यांच असतं. ‘अपनी तो पाठशाला मस्ती की पाठशाला’ म्हणत ते टरेलक्या करतात. कुणाचे केस ओढतात... कुणाला दगड-खडू मारतात... सरांची खिल्ली उडवतात... जणू हे सगळं करण्यासाठीच ते या जागेवर बसतात की काय असं वाटतं; पण वरकरणी ते जरी खोडकर असले तरी ते इतरांच्या मदतीला धावून जातात. आपण केलेल्या खोड्यातून आपल्या इतर मित्रांचं मनोरंजन कसं होईल, हे ते पाहत असतात. मधल्या रांगेत बसणारे बिच्चारे खरोखरच अधले- मधलेच असतात. कधी ते अभ्यास करतात तर कधी खोड्या. काही ठस्सही याच रांगेत असतात. एकूणच काय तर थोडेसे टवाळखोर, थोडेसे हुशार आणि काहिसे गाढव असं मिश्रण असणारी रांग म्हणजे मधली रांग. एकूणच काय तर बेंचचं अन् आपलं नातं अतुट असतं. दिवसा मागून दिवस जातात. कॉलेज तिथंच असतं. त्याच्या रस्त्यावरील गुलमोहराला दरवर्षी नवा बहर येतो. कॉजेलपूर्वीसारखंच फुलतं फक्त दरवर्षी त्या बेंचवर दुसरं कुणी तरी बसतं.

 
- विकास वि. देशमुख
 करडा, ता. रिसोड, जि. वाशीम.

‘हत्ती’ ला ‘गरूड’ गती मिळेल ?


राज्यातील फुले-आंबेडकरी चळवळ खिळखिळी झाली. प्रकाश आंबेडकर केवळ अकोला जिल्ह्यापुरतेच मर्यादित झाले. प्रा. जोगेंद्र कवाडे हे वादळही थंडावले. रामदास आठवले यांनी तर शिवसेना-भाजपच्या गोटात सामील होऊन स्वतःच आंबेडकरी चळवळीचा खून केला. रा. सु. गवई सध्या काय करीत आहेत हा संशोधनाचा विषय आहे. नामदेव ढसाळांचेही विचार, निष्ठा शिवसेनेच्या उपकाराखाली पूर्णतः ढासळली आहे. याचाच फायदा काँग्रेस, राकाँ, भाजप, शिवसेना या पक्षांना होत आहे. परिणामी सत्ताधारी जमात होण्याचे बाबासाहेबांचे स्वप्न धुळीस मिसळले आहे. अशा स्थितीत चळवळीत नव्याने आलेली पिढी सैरभैर झाली. राज्याच्या याच वर्तमान स्थितीचा अभ्यास करून बसपच्या सुप्रिमो मायवती यांनी गेल्या १७ फेब्रुवारीला उपराजधानी नागपूरच्या कस्तुरीचंद पार्कवर मेळावा घेतला. ‘न भूतो न भविष्यति’ असा प्रचंड जनसमुदाय राज्याच्या कानाकोप-यातून एकत्रित आला होता. एक प्रकारे आंबेडकरी चळवळ आता हत्तीवर स्वार होते की, काय असे चित्र या मेळाव्यामुळे निर्माण झाले आहे.बसपाने मधल्या काळात अनेक चढउतार पाहिले. गतवर्षी आपला बालेकिल्ला असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये त्यांचा सपाने सपाटून पराभव केला. पण राजकारणात असे चढउतार येत असतात, याच विचारातून पुन्हा नवी उभारी घेत दिल्ली काबीज करण्याची मोहीम आखली आहे. फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारधारेचे सरकार देशात सत्ता काबीज करू शकते, या मतावर ठाम असलेल्या कांशिराम यांनी बामसेफ, डी.एस.फोर असा प्रवास करीत १४ एप्रिल १९८४ ला पक्षाची स्थापना केली. पण दुर्दैवाने या पक्षाला महाराष्ट्रात यश प्राप्त झाले नाही. त्या तुलनेत उत्तर प्रदेशमध्ये या पक्षाने चारवेळा सरकारही स्थापन केले. त्यापाठोपाठ बिहार, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड, पंजाब, मध्य प्रदेश, छत्तीसगड आदी राज्यांमध्ये या पक्षाचे आमदार आणि खासदार जिंकून आल्याचा इतिहास आहे. कांशिराम यांनी त्यांच्या सामाजिक आणि राजकीय जीवनाची सुरुवात महाराष्ट्रातून केली. पण त्यांना त्यांच्या हयातीमध्ये राज्यात पक्षाचा निकाल आणता आला नाही. त्यांच्यानंतर पक्षाची सूत्रे मायावती यांच्या हाती आली. त्यांनी कांशिराम यांच्या तालमीत तयार झालेले विलास गरूड यांच्याकडे राज्यप्रमुखाची सूत्रे दिली. २००८ पासून त्यांनी राज्याचे नेतृत्व लिलया पेलले. नवतरुणांना साद घातली. राज्याच्या कानाकोप-यामध्ये फिरत एक नवी फळी राजकारणाच्या पटलावर निर्माण केली. कार्यकत्र्यांमध्ये आत्मविश्वास पेरून राज्यात सत्ता स्थापनेचा नवीन अजेंडा बहुजन समाजापर्यंत पोहोचविला. त्यांना संदीप ताजणेसारखे तरुण, तडफदार, आत्मविश्वासू आणि अभ्यास असलेले अनेक उच्चशिक्षित कार्यकर्ते भेटले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील पक्षाच्या जनाधाराचा आलेख बघता इतर बहुजन संघटनांपेक्षा बसपा अगदी सरस ठरल्याचे दिसते. राज्याच्या उपराजधानीमध्ये १२ नगरसेवक जिंकून आणण्याची भीम पराक्रमही त्यांनी साधला आहे. अमरावती, ठाणे, नगर, सोलापूर, मुंबई, उल्हासनगर आदी महापालिका आणि अनेक नगरपालिकांत सदस्य आहेत. शिवाय जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये पक्षाने खाते उघडून इतर राजकीय पक्षांना त्यांच्या उपस्थितींची दखल घेण्यास भाग पाडले. २००९ ला लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात बसपाला उतरतीकळा लागली होती. मात्र गरूडांच्या चिवटपणाने पक्षाला पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणामध्ये सक्रिय केल्याचे नागपुरातील मायावती यांच्या विशाल जनसभेवरून सिद्ध होते. त्यामुळे नक्कीच रिपाइं पक्षाच्या काळजात धस्स झाले. इतर रिपाइं पक्षाकडे भविष्याचे नियोजन नाही, ठोस कार्यक्रम नाही. प्रकाश आंबेडकर त्यादृष्टीने विचार करतात, बोलतात. मात्र त्यांनाही अकोल्याच्या बाहेर पडता येईनासे झाले. अशा स्थितीत बसप सशक्त पर्याय ठरू शकतो. तूर्तास इतकेच म्हणता येईल की, मायावती यांच्या सभेला जी लाखोची गर्दी जमली होती. त्यापैकी किती जण आपले मत हत्तीला देतील यावरून महाराष्ट्रात बहुजन समाज पक्षाचे स्थान ठरणार आहे.
- विकास वि. देशमुख
करडा, ता. रिसोड, जि. वाशीम.

सोमवार, २५ फेब्रुवारी, २०१३

ग्रामसभा नव्हे जादूची कांडी


हाराष्ट्राच्या टोकाला असलेला गडचिरोली जिल्हा. या जिल्ह्यातील आदिवासी बहूल असलेलं लेखामेंढा गाव. गावाच्या भोवती बांबूचं घनदाट जंगल. गावात पोहोचायला धड रस्ताही नाही. जेमतेम प्राथमिक शिक्षणच घेता येईल, अशी जिल्हा परिषदेची एकमेव शाळा; पण नक्षलवाद्यांच्या भीतीनं या शाळेत कुणी शिक्षक येत  नव्हता. आला तर टिकत नव्हता.  परिणामी, येथे शिक्षणाच्या नावानं कायम बोंब होती. बाहेर जावून ज्यांनी शिक्षण घेतलं ते बोटावर बोजण्याएवढेच; मात्र त्यांच्यापैकीही काहींनी आपलं बस्तान शहरात मांडलं.  वीज नाही, पाण्याचा अभाव. नक्षलवाद्यांमुळे शासनाच्या योजना गावापर्यंत पोहोचण्यास अडचणी येत होत्या. अशातच निसर्गाची अपकृपा कायम होती. पाऊसही दगाबाज. कधी धो-धो पडून सगळं पीक वाहून नेत होता तर कधी न पडून पिकाला करपून टाकत होता. चुकून त्याची कृपा झाली अन् भरभरून पीक आलं तर जंगली जनावर त्यावर पडशा पाडायची. एकूणच या गावातील ग्रामस्थांच्या भोवती कायम संकटं सकटंच होती. नाही म्हणायला गावात ग्रामपंचायत होती; परंतु नक्षवाद्यांच्या भीतीनं कुणी सरपंच व्हायला तयार नसे. झाला तरी त्याला अन् सदस्यांनाही आपल्या हक्काबाबत काही माहीत नसे; पण अलीकडच्या काळात सरकारनं काही निर्णय घेतले, तेराव्या वित्त आयोगातून गावांना काही अधिकार मिळाले. त्यामुळं या गावानेही  मरगळ झटकली. आत्तापर्यंत त्यांना वनविभाग सांगत  होता. गावाच्या भोवती असलेल्या जंगलातील बांबूवर आमचा अधिकार आहे. आम्हीच त्याचं उत्पन्न घेणार. ते तसं करीतसुद्धा होतं. एव्हाणा गावालाग्रामसभेचे अधिकार कळले होते. ग्रामस्थांनी ठराव घेतला नि शासनाला ठणकावून सांगितलं, जंगल आम्ही जगवलं, वाढवलं, उत्पन्नही आम्हीच घेणार. सुरुवातील वनविभागानं याला विरोध केला. गावानं याविरुद्ध संघर्ष केला. शासन नमलं. ग्रामसभेनं बांबू वाहतुकीचा परवाना मिळवला. आत्ता जंगलातील बांबूचा नफा ग्रामस्थ सामूहिकरीत्या वाटून घेतात. त्यातून त्यांची गरिबी दूर झालीच; परंतु त्यातील काही रक्कम गावाच्या विकासासाठी वापरली जाते. या गावातील ग्रामस्थांच्या एकजुटीमुळं त्यांना कळलेल्या ग्रामसभेच्या महत्त्वमुळं दारिद्य्रात खितपत पडलेल्या या ग्रामस्थांचे आयुष्यच बदलंलं. हे गाव महाराष्ट्रात सगळ्यांना माहिती आहे; परंतु या गावाप्रमाणेही अनेक गावं महाराष्ट्रात आहेत. त्यांच्यापर्यंत माध्यमं पोहोचली नसल्यानं ती समोर आलीच नाहीत.  ना वीज ना पाणी. ..ना रस्ता ना शिक्षण...ना आरोग्य सेवा ना दवाखाना... अशा परिस्थितीत  या गावातील शहाण्या व्यक्तींनी पुढे येत बाबा आमटे, प्रकाश आमटे, अण्णा हजारे, पोपटराव पवार यांच्याप्रमाणेच आपल्या गाव विकासाला गती दिली.
शेरपे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणकवली तालुक्यातील गाव. या गावाच्या परिसरातील qसचनाचे क्षेत्र वाढावं म्हणून शासनानं गावातील नदीची पाहणी करून नदीवर धरण बांधण्याची योजना आखली. यात अनेक ग्रामस्थांना भूमिहीन व्हावं लागणार होतं. त्यामुळं धरण न बांधण्याचा ग्रामसभेनं निर्णय घेतला. शासनाला सवाल केला, धरणामुळे जेवढं क्षेत्र ओलिताखाली येणार आहे तेवढी जमीन तर आत्ताच उत्तमरीत्या पिकते. मग या धरणाचा फायदा काय? त्याऐवजी दुस-या ठिकाणी धरण बांधा. त्यासाठी ग्रामस्थांनी दुसरी जागा दाखविलीसुद्धा. गावानं ग्रामसभेत तसा ठरावही केला. इथंही सरकारनं त्यांना विरोध केला. ग्रामस्थांनी आंदोलन केलं. सरकारच्या तज्ज्ञांना पटवून दिलं की, या ठिकाणी धरण बांधणं कसं चुकीचं आहे. सरकार ग्रामसभेपुढे नमलं. आता दुस-या ठिकाणी धरणाचं काम सुरू आहे. परिणामी, या गावातील अनेक कुटुंब भूमिहीन होण्यापासून वाचले आहेत. बचत गट, तंटामुक्ती या माध्यमातून गाव विकासाला गती दिली जात आहे.
जैन्याळ (ता. कागल, जि. कोल्हापूर) हे छोटंस गाव. महात्मा गांधीजींच्या जयंती पर्वावर गावात ग्रामसभा भरली. निर्मल ग्राम अभियान राबविण्याचं एकमतानं ठरलं; पण गावातील काही स्वाभिमानी महिलांनी आपलं मत मांडलं. त्या म्हणाल्या, स्वच्छता करायची ती महिलांनी; मात्र नाव होणार ते पुरुषांचं. हे चालणार नाही. महिलांच्या बरोबरीनं पुरुषांनीही झाडू मारायला हवा. शिवाय पत्नी ही पतीच्या बरोबरीनं कुटुंबासाठी झटते. त्यामुळं शासनाच्या नियमाप्रमाणे घरावर पती-पत्नी दोघांचंही नाव असावं. महिलांचे हे दोन्ही मुद्दे पुरुष मंडळींना पटले. ग्रामसभेत निर्णय झाला. महिलांच्या बरोबरीनं पुरुषही स्वच्छतेची सारी कामं करीत आहेत. घरावरही पती-पत्नी असे दोघांचीही नावं आहेत.  एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातील ६८ गावं अशी आहेत, जिथलं प्रत्येक घर महिलेच्या मालकीचं आहे. महाराष्ट्रात इतर ठिकाणीही हा कित्ता आता गिरवला जातोय.
असंच कोल्हापूर जिल्ह्यातील देवरडे हे टुमदार गाव. गावाच्या परिसरात भरपूर गायरान जमीन. या जमिनीत मोठ्या प्रमाणात निलगिरीची झाडं. या झाडांच वैशिष्ट्य म्हणजे त्यांना भरपूर प्रमाणात पाणी लागतं. ही झाडं जमिनीतील, परिसरातील जलसाठ्यातील पाणी प्रचंड प्रमाणात शोषून घेतात. परिणामी, या गावाच्या जंगलातील तलाव, जलसाठे लवकर आटून जात होते. पाण्याच्या शोधात जंगातील प्राणी गावात येत असतं. त्यात जंगली हत्तीसुद्धा असतं. त्यामुळे गावाला धोका निर्माण झाला. यावर उपाय करण्यासाठी ग्रामसभा बसली. गावानं ठाराव पारित केला. त्यानुसार जंगालात आणि मोठ्या प्रमाणात नीलगिरी असलेल्या ठिकाणी आंबे आणि काजूची लावगड केली. पाणी आटण्याचा प्रश्न मिटला. जंगली प्राणीसुद्धा गावात येईनासे झाले. शिवाय  काजू आणि आंब्याच्या झाडांपासून दरवर्षी लाखो रुपयांचं उत्पन्न मिळत आहे. ते गाव विकासासाठी वापरून उर्वरित रक्कम समप्रमाणात गावकरी वाटून घेत आहेत. या गावालासुद्धा वनविभागानं विरोध केला; पण येथील ग्रामस्थांनीसुद्धा त्यांना ठणकावून सांगितलं. गाव आमचं आहे. झाडंही आम्ही लावली. नफासुद्धा आम्हीच घेणार. आज या गावातील समस्या तर मिटली. शिवाय उत्पन्नाचं साधनही ग्रामस्थांना मिळालं. ते केवळ ग्रामसभा आणि गावाच्या एकजुटीमुळेच. स्वाभाविकच गाव विकासासाठी ग्रामसभा ही जादूची कांडीच असल्याचे सिद्ध झाले आहे.

- विकास देशमुख
मोबा. ९८५०६०२२७५
००००००

बुधवार, २० फेब्रुवारी, २०१३

श्रमिकांचा क्षीण आवाज


संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला देशभरातील कामगार संघटनांनी बुधवार आणि गुरुवारी देशव्यापी संप पुकारला आहे. सरकारी कर्मचा-यांचा संप रद्द करण्यासाठी सरकार आणि ट्रेड यूनियन्समधील चर्चा निष्फळ ठरली आहे. त्यानंतर यूनियनचे अध्यक्ष जी. संजीव रेड्डी यांनी नियोजित संप २० आणि २१ फेबु्रवारी २०१३ रोजी सुरू राहणारच, अशी घोषणा केली. त्यामुळे देशभरातील जनजीवनावर  या संपाचा परिणाम होणार आहे. बँक कर्मचारी, वाहतूक संघटनाही या संपात सहभागी असल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडणार आहे. त्या अनुषंगाने...


मंगळवार, १९ फेब्रुवारी, २०१३

अभंग


ग दाटून आले होते. तो एकटाच गच्चीवर बसला होता. स्वतःच स्वतःच्या तंद्रीत. कितीतरी वेळापासून. एवढ्यात मोबाईल वाजला. नंबर अनोळखी. कुणाचा कॉल असावा, असे प्रश्नार्थक भाव त्याच्या चेह-यावर आले. त्याने कॉल घेतला. पलिकडून थोडासा कातर पण गोड आवाज आला. ‘‘कसा आहेस?'' क्षणभर तो गोंधळून गेला. कोण आहे ही? अन् एवढ्या जिव्हाळ्याने का विचारतेय? एका क्षणात सारे सारे प्रश्नच प्रश्न. वेगानं तो फ्लॅशबॅमध्ये गेला. अचानक त्याला क्लिक झालं. अन् तोही ओल्या आवाजात म्हणाला, ‘‘तू सोडून गेली तेव्हा होतो तसाच!'' क्षणभर दोघंही निशब्द झाले. कुणीच बोललं नाही. दोन वर्षांनंतर हो दोनच वर्षांनंतर पहिल्यांदा त्यांचं बोलणं होत होतं. कोण आनंद झाला त्याला. तीच पुन्हा बोलती झाली. ‘‘ मला वाटलं होतं तू नंबर बदलला असशील''. तो - ‘‘कसा बदलणार? बदलला असता तर माझा नवीन नंबर तुला कोण देणार होतं?''ती - हूँऽतो- ‘‘मला खात्री होतीच की तू कधी ना कधी कॉल करशील. तुझ्यासाठीच हा नंबर सुरू ठेवलाय मी.'' दोघांनाही हे अजिबात अनपेक्षित नव्हतं. ती म्हणाली, ‘‘मला तुझी खूप आठवण येतेय; पण काय करणार? आता भेटणं शक्य नाही.''तो - ‘‘हूँऽ कशी आहेस? नवीन काही''ती - जगतेय चार भिंतीच्या जगातच. अस्तित्व हरवून. तो- ....ती - ''मला मुलगा झालाय. काय नाव ठेऊ?''त्याचा आवाज अजून खोल गेला. तो म्हणाला, ‘अभंग' ठेव. एवढ्यात कुणाचा तरी आवाज आला, ‘‘अगं बाळ रडतंय. त्याला पाजायचं सोडून तिकडच्या खोलीत का करतेस?'' घाईघाईत तिने कॉल कट केला. तो मात्र विचारात गडून गेला. ‘अभंग' स्मृतींना उजाळा देत... आता आभाळ अधिकच आंधारलं होतं. क्षणात धो-धो कोसळेल असं.

- विकास वि. देशमुख 

करडा, ता. रिसोड, जि. वाशीम.

Vikas V. Deshmukh
Karda, Risod, washim.

सोमवार, १८ फेब्रुवारी, २०१३

कुस्ती व्हेंटिलेटरवर

हिल्या ऑलिम्पिक (१८९६) स्पर्धेपासून एक प्रमुख क्रीडाप्रकार म्हणून ओळखल्या गेलेल्या कुस्ती खेळाला २०२० च्या ऑलिम्पिकमधून बाहेर करण्याचा धक्कादायक निर्णय इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीने (आयओसी) घेतला आणि विश्वभरातून या निर्णयाच्या विरोधात तीव्र नाराजीचे सूर उमटले. १८० देशांत हा खेळ खेळला जातो. या देशांतून आता आव्हान-प्रतिआव्हानाचे शड्डू ठोकले जाणार नाहीत. बलवान कुस्तीपटू होण्यासाठी खेळाडूंना अपार मेहनत घ्यावी लागते. त्यांचा आहार आणि खुराक भक्कम स्वरूपाचा असतो. त्यांच्यासाठी हा निर्णय पाठीत खंजीर खुपसण्यासारखा होता. अलिकडे तर काही महिला कुस्तीपटूही या खेळात प्रावीण्य मिळवण्याच्या प्रयत्नात होत्या. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविण्यासाठी किमान आठ वर्षे तयारी करावी लागते; परंतु आयओसीने एका फटक्यात तयारीचा किल्ला उद्ध्वस्त केला आहे. कुस्ती हा मर्दानगीचा खेळ आहे. शारीरिक बल आणि रग याच्या जोडीला त्याच्याकडे चपळाईही असली पाहिजे. भारतात हा खेळ शतकानुशतके खेळला जातो. त्याला ‘लाईक’ करणा-यांचा तोटा नाही. मातीतून घडणारे बलप्रदर्शन आज मातीमोल ठरण्याची वेळ आली आहे. पूर्वी गावागावांतून हा खेळ खेळला जायचा. भल्या पहाटेपासून तालमी-तालमीतून किंवा आखाड्यांतून शड्डू ठोकल्याचे आवाज घुमायचे. आशियाई कुस्तीपटूंचे या खेळातील कौशल्य यूरोपीय देशांना खुपत असावे म्हणूनच त्यांनी या खेळाचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न पद्धतशीरपणे सुरू केला आहे. प्रथम त्यांनी मातीतील कुस्ती मॅटवर आणली. विविध डावांऐवजी ‘पॉर्इंटस्’ ला अधिक महत्त्व दिले. आशियाई कुस्तीपटूंना मॅटशी जुळवून घेण्यास प्रथम अवघड गेले. परंतु नंतर त्यावरही वर्चस्व संपादन केले. भारतीय मल्लांनी ऑलिम्पिक, राष्ट्रकुल, आशियाई, जागतिक स्पर्धांवर आपली मोहर उठवली. १९५२ मध्ये भारताच्या खाशाबा जाधव यांनी हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये पहिले कांस्यपदक मिळवले. त्यानंतर सुशीलकुमारने बीजिंगमध्ये (२००८) कांस्य तर लंडनमध्ये (२०१२) रौप्य पदकाची कमाई केली. लंडनमध्येच (२०१२) योगेश्वर दत्तने कांस्य मिळवले. ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यामागचा मुख्य उद्देश विविध देशांतील खेळाडूंनी जात, धर्म, वर्णभेद बाजूला ठेवून आपले कौशल्य दाखवावे हा आहे. परंतु हाताच्या बोटावर मोजण्याइतके संघटक आर्थिक सत्तेच्या जोरावर हुकूमशाही गाजवू पाहात असतील तर त्याला कसून विरोध केला पाहिजे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्ती फ्री-स्टाईल आणि ग्रीको-रोमन पद्धतीने खेळवली जाते. लंडन ऑलिम्पिकमध्ये ११ फ्री-स्टाईल आणि ७ ग्रीको-रोमनची पदके ठेवण्यात आली होती आणि ते मिळवण्यासाठी एकूण ३४४ मल्ल झुंजले होते. म्हणजेच या स्पर्धेला स्पर्धकांचा तोटा नाही अन् प्रेक्षकांचाही नाही. तरीही कुस्तीला ‘घुटना’ मारण्याचा प्रयत्न कशासाठी? ऑलिम्पिकमधून एखादा क्रीडाप्रकार हटवायचा झाल्यास आयओसी टेलीव्हिजन रेटिंग, तिकिटविक्री, डोप टेस्ट समितीची शिफारस, खेळाची लोकप्रियता आदी ३६ हून अधिक निकषांचा आधार घेते. एखादा खेळ वगळताना त्या खेळात ‘डोपिंग’ ची प्रकरणे किती झाली तेही पाहिले जाते. कुस्तीला ‘डोपिंग’ च्या निकषाचा आधार लावला गेला असेल तर त्याच्या तुलनेत वेटलिफ्टिंग व सायकलिंगमध्ये ही प्रकरणे अधिक आहेत. मग या खेळांचे स्थान अबाधित कसे? कुस्तीपेक्षा अधिक धोकादायक असणा-या मॉडर्न पेन्टॅथलॉनला मानाचे पान कसे काय मिळते? कुस्तीमध्ये आतापर्यंत सर्वाधिक ११६ पदके रशियाने पटकावली आहेत. भारत या क्रीडा प्रकारात डोईजड होण्याची लक्षणे दिसू लागली की यूरोपीय देशांच्या पोटात दुखू लागते हा अनुभव जुनाच आहे. हॉकीमध्ये भारताची एकाधिकारशाही नष्ट करण्यासाठी हॉकीच्या नियमावलीतच आमूलाग्र बदल करण्यात आले. मैदानाच्या स्वरूपातही बदल करण्यात आला. असाच प्रकार आता कुस्तीमध्येही सुरू आहे. कुस्तीतील भारताची समृद्धशाली परंपरा नष्ट करण्यासाठी अत्यंत धूर्तपणे कट रचण्यात आला आहे. कुस्ती केवळ भारतातच लोकप्रिय आहे असे नाही. पाकिस्तान, तुर्कस्तान, जपान, मंगोलिया, इराण, रशिया या देशांतही तितकीच लोकप्रिय आहे. भारतात कुस्ती लोकप्रिय करण्यासाठी मारुती माने, श्रीपती खंचनाळे, गणपतराव आंदळकर, दीनानाथसिंह, मास्टर चंदगीराम, सतपाल, हरिश्चंद्र बिराजदार, काका पवार यांनी जिवाचे रान केले होते. त्यांचे प्रयत्न वाया जाणार काय? सर्वसामान्यांची ही अस्वस्थता शक्य तितक्या लवकर दूर झाली पाहिजे. कुस्तीला आखाड्याबाहेर करण्याचा प्रयत्न करणा-यांनाच ‘धोबीपछाड’ मारला पाहिजे. मेमध्ये सेंट पीटस्बर्ग येथे होणा-या आयओसी कार्यकारिणीच्या बैठकीत कुस्तीचा पट काढला जाणार नाही यासाठी चिकाटी दाखवली पाहिजे. या बैठकीत बेसबॉल, सॉफ्टबॉल, कराटे, रोलर स्पोर्टस्, स्पोर्ट क्लायंबिंग, सक्वॅश, वेकबोर्डिंग, वुशू आदी खेळांसाठी सादरीकरण होणार आहे. त्यात कुस्तीला धक्का लागणार नाही यावरही चर्चा झाली पाहिजे. त्यासाठी कुस्तीवर प्रेम करणा-या देशांनी दबावगट निर्माण केला पाहिजे. सध्या तरी कुस्ती व्हेंटिलेटरवर आहे. ती पुन्हा नैसर्गिक श्वासोच्छवास घेऊ शकेल अशी उपाययोजना करावी लागेल.

रविवार, १७ फेब्रुवारी, २०१३

मोरांगी



सा तो अभ्यासात जेमतेमच. खूप अभ्यास केल्यानंतर कसातरी काठावर पास व्हायचा. त्याची बारावी झाली. आता यापुढे आपण जोमानं अभ्यास करू. चांगले माक्र्स् घेऊ असं ठरवूनच एक स्टोव, सतरंजी, उशी, स्वयंपाकासाठी लागणारी भांडी आणि जुनी सायकल घेऊन तो बीएसाठी शहरात आला. पावसाळाही लागला होता. सारं कसं टवटवित. आल्हाददायक. नजर जाईल तिकडं हिरवंकंच्च दिसत होतं. गार-गार. कॉलेजच्या रस्त्यावर गुलमोहराची फुलं कुणी सडा टाकावा तशी पडलेली असायची. त्यामुळं याचंही मनही अधिकच प्रफुल्लीत झालं. कोवळ्या गवताप्रमाणे याच्या मनात अनेक स्वप्न अंकुरले. तो त्याचा कॉलेजचा पहिला दिवस होता. पाऊस धो-धो कोसळत होता. त्या दिवशी हा छत्री घेऊन पायीच कॉलेजला गेला. गेटवर त्याला ती दिसली. नाजूक सायकलच्या नाजूक पायडलवर नाजूक पाय फिरवत असलेली. तिनं शेवाळलेल्या रंगाचा रेनकोट घातला होता. तिच्या गालावरून पावसाचे ओथंबे ओघळत होते. कोण असावी बरं ही? आपल्याला बोलेल का? असा विचार करीत यानं वर्गाच्या पाय-या चढल्या. छत्री मिटवली नि आपल्या बाकड्यावर जाऊन बसला. इतर मुलं-मुलींपैकी ज्यांच्या पूर्वीच्या ओळखी होत्या त्यांचा चिवचिवाट सुरू झाला. तो त्या गावात नवीनच होता. त्यामुळं एका कोप-यात जावून बसला. त्याच्या मनात मात्र तीच रेंगाळत होती. अरेच्चा! ती पण त्याच वर्गात येऊन बसली की. मग काय, वर्ग खोलीच्या टिनावर पडणा-या टपोर थेंबाचा आवाज याच्या काळजात यायला लागला. आता याच्या मनात विचारानं अधिक गती पकडली. काय नाव असावं बरं हिचं, असा विचार तो करू लागला. एवढ्यात मॅडम आल्या. सगळे उठून उभे राहिले. पहिला दिवस असल्यानं केवळ परिचय करून घेऊ, हेच ते काय त्याला ऐकू आलं. बाकी सगळं लक्ष तिच्याकडंच तर होतं. तिचा नंबर आला. ती म्हणाली, ‘‘मी मोरांगी. मला चित्र काढायला आवडतात. इतिहास संशोधक व्हायचंय.'' हा मनातल्या मनात पुटपुटला, ‘मोरंगी. व्वा! काय सुंदर नाव आहे. अगदी मोराच्या अंगासारखंच'. तीसुद्धा खरोखरच मोरांगीच होतीच.
दिवसामागून दिवस जात होते. याचेही आता कॉलेजमध्ये मित्र झाले. कधी-कधी उगाचच काही तरी कारण काढून तो तिला बोलायचा; पण याच्यापेक्षा ती इतर मुलांनाच जास्त बोलयची. हीच त्याची व्यथा होती. आपली ही व्यथा तिची कथा बनेल का, असं याला सारखं वाटायचं. तिला नेहमीच कॉलेजमध्ये यायला उशीर व्हायचा आणि पहिला प्रिरिअड तिच्या आवडीच्या इतिहासाचाच असायचा. या प्रिरिअड च्या मॅडम नोट्स लिहून द्यायच्या; मात्र मोरंगीला उशीर झाल्यानं तिला लिहून घेता येत नव्हतं. हेच यानं हेरलं. तो नियमित नोट्स लिहून घ्यायला लागला. या प्रेडसाठी याच्याएवढं नियमित कुणी नाही हे मोरांगीच्याही लक्षात आलं. मग तिनंही याच्याशी सलगी वाढविली. ती रोज याची इतिहासाची वही घेऊन जाऊ लागली. यालाही तेच हवं होतं. आता ती आपल्याला रोज बोलते याचं समाधान त्याच्या चेह-यावर असत होतं; पण तू मला आवडतेस! हे तिला कसं सांगावं, हा प्रश्न याला काही स्वस्थ बसू देत नव्हता. एक दिवस त्यानं वर्गातीलच त्याच्या एका मित्राला हे बोलून दाखवलं. मग काय.. त्या भाऊंनी सल्ला दिला, ‘‘ अरे, ती चित्र खूप छान काढते तर रांगोळ किती सुंदर काढत असेल''?
तो : ‘‘ते तर काढतच असेल ना! त्याचा इथं काय संबंध?''
मित्र : ‘‘तेच तर.. तुला कळत नाही. ती तिच्या अंगणात रोज सकाळी छान रांगोळ काढत असेल. त्यावेळी तू तिच्या घराकडं जात जा ना! हळूहळू तिच्याही लक्षात येईल, की तू कशासाठी येत आहेस ते''. मित्राचं हे बोलणे ऐकून यानं ठरवलं आता रोज पहाटे तिच्या घराकडं मार्निंग वॉकचं निमित्त करून जायचं. ती कुठं राहते याचा त्यानं पत्ता काढला. तिचं घर भर वस्तीत असतानाही तो तिकडं सकाळी पाच ते सात वाजतापर्यंत इकडून-तिकडं अन् तिकडून इकडं धावत असे. सकाळी आठ वाजता कॉलेजचा वेळ असे. त्यामुळं सातच्या नंतर हा खूप थकून रुमवर येई. असं पाच-सहा दिवस केलं; पण ती दिसलीच नाही. दरम्यान, एकानं त्याला हटकलंही, ‘तू मोकळा रस्ता सोडून या गल्लीत धावण्यासाठी का येतो ते?' त्याच्या बोलण्यावर हा निरुत्तर झाला; पण यानं आपलं धावणं सोडलं नाही. ती दिसत नसल्यानं याच्या मनाची घालमेल होत होती. आठवडा गेल्यानंतर एक दिवस तिच्याकडून वही परत घेत असताना त्यानं विचारलंच : ‘‘ मोरांगी तुझ्या अंगणात तू सुरेख रांगोळी काढत असशील ?'' ती हसली अन् म्हणाली : ‘‘अरे, मला सकाळी आठ वाजतापर्यंत जागच येत नाही! म्हणून तर कॉलेजला उशीर होतो. मग रांगोळीला वेळच मिळत नाही.'' असं म्हणून तिनं सायकलवर टांग मारली. हा मात्र आपण उगाचच मित्राचं ऐकल नि इतके दिवस साखर झोपेचं खोबरं केलं म्हणून स्वतःवरच चिडत होता. एकदाची परीक्षा झाली. सुट्या लागल्या. पुढे निकालही लागला. याचा नेमका इतिहासच लटकला. ती फस्ट क्लासमध्ये पास झाली. याच्याच वहीतून अभ्यास करून इतिहासात तिला सर्वाधिक माक्र्स मिळाले. नापास झाला म्हणून तिनंही आता याची वही नेणं बंद केलं. कालांतरानं कॉलेज संपलं. तिनं पुरातत्त्व खात्याच्या परीक्षा देणं सुरू केलं. दरम्यान, गलेलठ्ठ पगारावर नोकरी असलेल्या एका मुलासोबत तिचं लग्नही झालं. त्यावेळी याचं काळीज किल्लारीसारखं उद्ध्वस्त झालं. हा अजूनही तसाच आहे. ती गेलेल्या हिरव्या वाटेकडं डोळे लावून. कुपोषित, करपलेल्या मेळघाटासारखा. कुठे आणि कशी असेल मोरांगी? झाली असेल का इतिहास संशोधक? असा विचार करीत पुन्हा-पुन्हा जीर्ण झालेली इतिहासाची वही काढून आठवणींचं उत्खनन करीत बसणारा.

                                   - विकास वि. देशमुख
                                     करडा, ता. रिसोड, जि.वाशीम 

                                      
                                      Vikas V. Deshmukh
                                      at. Karda tq. Risod, dist. Washim

शनिवार, ९ फेब्रुवारी, २०१३

झारखंडपासून विदर्भवादी धडा घेतील काय?


स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्यानंतर मध्य प्रदेश आणि विदर्भ मिळून ‘सी.पी. अ‍ॅण्ड बेरार' हे राज्य होते. त्याची राजधानी नागपूर होती. कालांतराने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमुळे अकोला आणि नागपूर करारानुसार १ मे १९६० रोजी या राज्यातील मराठी भाषिकांचा प्रांत महाराष्ट्रात सामील झाला. तेव्हापासून या प्रदेशाची हेळसांडच सुरू आहे. नागपूरचा राजधानीचा दर्जा गेला आणि उपराजधानी म्हणून शिक्का बसला. आज महाराष्ट्रात येऊन विदर्भाला ५० वर्षे झालीत. दरम्यान विकासाचा असमतोल निर्माण झाला. त्यामुळेच वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी होऊ लागली. विदर्भाचा इतिहास, वन आणि खनिज संपत्ती पाहता ती काही प्रमाणात योग्यही आहे. शिवाय लहान राज्य लवकर विकसित करता येते, हा या मागणीमागे विचार आहे. पण लहान राज्य स्थिर सरकार देऊ शकेल काय आणि सरकारच जर स्थिर नसेल तर विकास कामांना वेळ मिळेल काय? हा प्रश्न झारखंडच्या राजकीय स्थितीवरून निर्माण झाला आहे. परिणामी, विदर्भवाद्यांनी यावर विचार करण्याची वेळ आली आहे.१२ वर्षांपूर्वी झारखंड राज्याची निर्मिती झाली. या काळात कुठलाच पक्ष किंवा आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. स्वाभाविकच या राज्याने आठ मुख्यमंत्री आणि दोनदा राष्ट्रपती राजवट पाहिली. आता पुन्हा तिसèयांदा हे राज्य राष्ट्रपती राजवटीच्या उंबरठ्यावर उभे आहे. यात जनता भरडली जात आहे. विकास रखडलेलाच आहे. झारखंड राज्य झाल्यानंतर विकास होईल, असे वाटत होते; परंतु तसे झाले नाही. मुख्यमंत्री बदलले, सरकारे बदलली, भ्रष्टाचार कायम राहिला. येथील सगळेच पक्ष आणि प्रमुख नेते भ्रष्टाचारी
आहेत, हे उघड झाले. याचा फटका राज्याला सहन करावा लागत आहे. झारखंडमध्ये खनिज संपत्ती भरपूर आहे; परंतु खाणीतून बाहेर येणाèया
लोह संपत्तीच्या विकासाची दृष्टी असलेल्या कारभाराचा परिसस्पर्श होत नसल्याने ती वाया जात आहे, खेडी उजाड होत आहेत. शहरांकडे लोंढा वाढतो आहे. दुसरीकडे नक्षलवादी प्रस्थ वाढवीत आहेत. २४ जिल्ह्यांपैकी २२ जिल्ह्यांत त्यांचे वर्चस्व आहे. स्वाभाविकच विकास काय आहे, हे अजूनही येथील जनतेला कळलेला नाही. असेच काहीसे वेगळ्या विदर्भाचेही होऊ शकते. पूर्वी मध्य प्रदेश आणि विदर्भ मिळून राज्य होते. परिणामी त्याकाळी सरकारही स्थिर होते. विदर्भात सध्या ११ जिल्हे आहेत. वणी आणि खामगाव हे दोन जिल्हे करावे, अशी मागणी आहे. विदर्भ राज्य झाल्यास या दोन शहरांना जिल्ह्याचा दर्जा मिळेलही. पण केवळ १३ जिल्ह्यांवर राज्य सरकार स्थिर होईल का? हा प्रश्न आहे. राज्य म्हणून विदर्भाकडे भौगोलिकदृष्ट्या पूर्वीपासूनच सगळे काही आहे. नागपूरला विधानभवन, उच्च न्यायालय या इमारतीसुद्धा आहेत. झारखंडप्रमाणे विपूल खनिज संपत्ती आहे. तसेच पूर्वविदर्भात नक्षलवादी आहेत. त्यांचा बिमोड करणे महाराष्ट्रासारख्या बलाढ्य राज्याला शक्य झाले नाही, ते लहान विदर्भाला शक्य होईल का? महत्त्वाचे म्हणजे विदर्भातसुद्धा प्रांतवाद आहे. वèहाड (पश्चिम विदर्भ) आणि पूर्वविदर्भ म्हणजेच झाडीपट्टी असे त्याचे दोन प्रांत आहेत. दोन्ही भागांतील संस्कृती, भाषा भिन्न आहे. पूर्वविदर्भात qहदीचा अधिक प्रभाव आहे. गोंदिया जिल्ह्यात १०० टक्के हिंदीच बोलली जाते. तेथील नगरपालिका, ग्रामपंचायत यांचा कारभारही हिंदीतूनच चालतो. याशिवाय भंडारा, गडचिरोली, नागपूर या जिल्ह्यांतीलसुद्धा बरेच तालुके पूर्णतः हिंदी भाषिक आहेत. परिणामी, विदर्भ राज्य वेगळे झाले तरी भाषिकदृष्टी ते एक होणार नाही. दुसरे म्हणजे हे लहान राज्य स्थिर सरकार देऊ शकेल काय? या सगळ्यांचा विचार विदर्भवाद्यांनी करणे गरजेचे आहे.
विकास वि. देशमुख
करडा, रिसोड, वाशीम.
Vikas V. Deshmukh
Karda, tq. Risod, Dist Washim

बालक पालक आणि सेक्स

सकाळची वेळ. आई घर काम करण्यात व्यस्त. बाबा अंघोळ करून पेपर वाचत होते. दादा गच्चीवर सूर्यनमस्कार काढत होता. एवढ्यात तिसरीत असलेला चिंटू धावत आला नि आईचा पदर ओढत म्हणाला, ‘‘आईऽऽऽ आईऽऽऽ आपल्या शेजारची पिंकी मुलगी अन् मी मुलगा असं कसं? कसं ठरवायचं हा मुलगा अन् ही मुलगीच म्हणून...'' या प्रश्नामुळे आई थोडी गोंधळली अन् चिडलेल्या स्वरात म्हणाली, ‘‘ जा तुझ्या बाबाला विचार! नस्ते प्रश्न करत राहतोस!!'' हिरमुसला होऊन चिंटू हॉलमध्ये आला. इकडे आई-मुलाचा संवाद बाबाच्या कानावर पडलाच होता. बाबा त्याला जवळ घेत म्हणाले, ‘‘अरे वेड्या पिंकी कपडे कसे घालते?''
चिंटू : ‘‘ती फ्रॉक घालते.''
बाबा : ‘‘अन् तू?''
चिंटू : ‘‘मी चड्डी अन् शर्ट घालतो''
बाबा : ‘‘म्हणूनच पिंकी मुलगी आहे अन् तू मुलगा! काय समजलं का? जा आता खेळ बाहेर जाऊन'' असं म्हणत बाबांनी आपल्या चष्म्यातून चिंटूकडे कटाक्ष टाकत पेपरमध्ये डोळे खुपसले; परंतु इकडे चिंटूच्या मनात असलेल्या प्रश्नांचं उत्तर मिळण्याऐवजी बाबांनी दिलेल्या उत्तरामुळे त्याच्या मनात पुन्हा उपप्रश्न निर्माण झाला, ‘मी जर फ्रॉक घातला तर मीसुद्धा मुलगी होईल का?' त्याने त्याचीच जीभ चावली अन् मित्रकंपनीकडे धूम ठोकली.
असे आईबाबा आणि चिंटू जवळपास प्रत्येक घरातच असतात. 
चिंटूच्या मनात आला तसेच अनेक प्रश्न घराघरांतल्या चिंटू अन् पिंकीच्यासुद्धा मनात येतात; मात्र शास्त्रीय आणि खरे उत्तर देण्याचे बहुतांश पालक टाळातात. ‘नस्ते' प्रश्न म्हणत काहीतरीच उत्तरं देत वेळ मारून नेतात; पण यामुळे चिंटू अन् पिंकीची उत्सुकता कमी थोडीच होते? उलट त्यांना अजून प्रश्न पडतात. मग जमेल त्या मार्गाने, कधी मित्र-मित्रिणीशी चर्चा करून तर कधी टीव्ही, चित्रपट, पुस्तके यातून ते उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे मित्र-मैत्रिणीही त्यांच्याच वयाचे. त्यामुळे ते तरी कसे योग्य उत्तर देणार? स्वाभाविकच एका मनाची उत्सुकता दुस-या मनात प्रवेश करते नि या चिमुकल्यांकडून चुकीचे अर्थ लावले जातात. ओघानेच त्यांच्यापैकी काहींकडून चुकाही होतात. ते जेव्हा त्यांच्या लक्षात येतं तेव्हा अपराधीपणाची भावना त्यांच्या कोवळ्या मनाला कुरडते अन् उनाडक्या करणारे एकाएकी एकलकोंडे होतात. अभ्यासात मन लागत नाही. जर आईबाबांनी वा इतर कुणी जबाबदार व्यक्तींनी त्यांना समजून घेऊन त्यांच्या प्रश्नांची योग्य उत्तरं दिली तर त्यांच्या हातून चुका होणार नाहीत. या चुका टाळण्यासाठी ‘बालक-पालक' यांच्यात या विषयावर संवाद होणे गरजेचे आहे. खेदाची बाब म्हणजे आपल्याकडे तसे होत नाही. हीच कोंडी फोडण्याचे काम ‘बीपी (बालक-पालक)' या मराठी चित्रपटाने केले. 
लैंगिक शिक्षण कसे आवश्यक आहे हे हा चित्रपट पटवून देतोच; परंतु त्याही पेक्षा बालक-पालकांत संवाद किती महत्त्वाचा आहे, हे सांगतो. चित्रपटाची कथा अंबर हडप यांच्या ‘बीपी(बालक-पालक)' या नाटकावर आहे. पटकथा आणि संवाद त्यांचेच आहेत. ही कथा पौंगाडवस्थेतील भिन्न स्वभावधर्माच्या पाच मुलांभोवती गुंफलेली आहे. त्यामध्ये दोन मुली आहेत. ते सगळे संस्कारात वाढलेले, विचारांवर पालकांचाच प्रभाव असणारे आहेत. यापैकी डॉली, चिऊ, अव्या आणि त्यांचा आणखी मित्र एकाच चाळीत राहतात. एकाच शाळेत आणि एकाच वर्गात शिकतात. स्वाभाविकच त्यांच्यात कमालीच सख्य असते. एक दिवस ते शाळेतून घरी येतात. सबंध चाळीत सुतकी वातावरण असते. चाळीतीलच मेघाताई ही चाळ सोडून ऑटोतून जाताना दिसते. ती का आणि कुठे जात आहे? असे प्रश्न या चौकडीच्या मनात येतात. नेमकं काय झालं हे त्यांना कुणीच सांगत नाही; मात्र ‘मेघानं शेण खाल्लं; असं एक ना एक दिवस होणारच होतं' हे चाळीतल्या बायकांचं बोलणं त्यांच्या कानावर पडतं. ‘शेणं खाणं म्हणजे नेमकं काय खाणं आणि शेण काय खाण्याची वस्तू आहे का?' हा प्रश्न त्यांना पडतो. डिक्सनरीत ते त्याचा अर्थ शोधतात; पण व्यर्थ. मग त्यांच्यापैकीच असलेली भोळी चिऊ एक दिवस पूजा करीत असलेल्या आईला विचारते, ‘‘आई गोमुत्र प्याल्याने काय होतं?'' आई म्हणते : ‘‘ ते शरिरासाठी चांगलं असतं, आजार होत नाहीत'' चिऊ पुन्हा विचारते : ‘‘मग शेण खाल्यानं काय होतं?'' त्यावर आई भयंकर चिडते आणि आरतीची टाळी तिच्या श्रीमुखात भडकावते. दुसरीकडे अव्या त्याच्या नाट्यदिग्दर्शक असलेल्या बाबाला म्हणतो ‘‘बाबा तुम्ही कधी शेण खाल्लं का?'' त्याचेही चिऊ प्रमाणेच होते. बाहेर फुटणाèया फटाक्यांचा आवाज याच्या कानाखाली येतो. पुढे ही चौकडी एकत्र बसते आणि ‘शेण खाणे' याचा नेमका अर्थ कसा शोधायचा याचा विचार करते. त्यावर त्यांना त्यांच्या शाळेतील विष्णू हा टपोरी मुलगा आठवतो आणि ते त्याच्याकडे जातात. इथून कथेला रंगत येते. विष्णू एखाद्या शिक्षकाप्रमाणे त्याला जे माहित आहे ते सांगतो. या चौघांना पिवळी पुस्तकं वाचायला देतो; परंतु या पुस्तकात जे लिहिलंय ते खरं आहे का? असा प्रश्न पुन्हा त्यांना पडतो. त्याचे उत्तर शोधण्यासाठी ते रात्री चाळीतल्या खिडक्यातून डोकावतात; मात्र नशिबी निराशाच येते; पण स्वस्थ बसू देईल ती उत्सुकता कसली? विष्णूच सांगतो की, आपण ‘ब्ल्यू फिल्म (बीपी)' पाहायची. एक दिवस ते भाड्याने व्हिसीआर आणि व्हिडिओ कॅसेट आणून सामूहिक बीपी पाहातात. पुढे त्यांच्यातील कोवळ्या मुलांत पुरुषत्व जागं होतं. त्यातीलच एक चिऊकडे प्रेयसी म्हणून पाहू लागतो तर अव्या त्याच्या पेक्षा मोठ्या असलेला नेहाताईला चक्क ‘आय लव यू' म्हणतो. हे मुलींना आवडत नाही. त्यांचं मैत्रीची नातं दुभंगू लागतं. खेळणं तर ते हरवूनच बसतात. चाळीतील ज्येष्ठ नागरिक असलेले कदम काका (किशोर कदम) यांच्या हे सगळं लक्षात येतं. ते सगळ्यांना नेहाताईच्या मदतीने एकत्र आणतात आणि त्यांच्या सगळ्या प्रश्नांची, शरिराच्या बदलाची माहिती देतात.
यातील कथा दोन पिढ्यांची आहे. पहिली पिढी ८० च्या दशकातील तर दुसरी आताच्या. दोघांमध्ये २५ ते ३० वर्षांच अंतर आहे; पण त्यांना पडणारी प्रश्न, त्यावर पालकांनी दिलेली उडावा-उडवीची उत्तरं qकवा पोरगा कोनावर जातोय म्हणून बाबांनी आडव्या हाताने कानपट्टीचे घेतलेले माप, त्यानंतर मुलांनी पिवळी पुस्तक, कॅसेट, सीडी, मित्र यांच्यामार्फत स्वतः शोधलेली उत्तर हे दोन्ही पिढ्यात सारखंच आहे. मुलांनी वाममार्गाने जाऊ नये, यासाठी या विषयावर ‘बालक आणि पालकङ्क यांचा संवाद कसा आवश्यक आहे हा संदेश हा चित्रपट देतो. हा अत्यंत नाजूक विषय हळुवारपणे आणि अश्लिलतेचा कुठलाच स्पर्श होऊ न देता हातळण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आला आहे. 
‘काय मस्त अ‍ॅटम आहे'  ‘तो आपला माल है' असे नेहमीच्या बोलण्यातील संवाद पात्रांच्या तोंडी आहेत. त्यामुळे चित्रपट पाहाताना यात पालक आपले बालपण शोधतो नि म्हणतो, ‘आयला आम्ही बी असंच करत व्हत्तू की...'अन् बालक प्रेक्षक म्हणतात ‘सॉलिड आमचंही असंच आहे' त्यामुळेच हा चित्रपट बालक आणि पालक या दोघांसाठी आवश्यक आहे. सध्या समाजाला चूक काय आहे हे सांगणा-या पालकाची नव्हे तर काय बरोबर आहे हे सांगणाèया पालक रुपातील मित्राची गरज आहे, हा अत्यंत वास्तववादी आणि मार्मिक विचार यातून दिला आहे. चित्रपटाची निर्मिती ख्यातकीर्त अभिनेता रितेश देशमुख, उत्तुंग हितेंद्र ठाकूर आणि मेघना जाधव यांची आहे. दिग्दर्शन रवि जाधव यांनी केले आहे. विशाल-शेखर आणि चिनार-महेश यांचं संगीत आहे. हल्लीच दिवंगत झालेले सुप्रसिद्ध अभिनेते आनंद अभ्यंकर यांचा काहीच मिनिटांचा पडद्यावरील वावर सुखावून जातो अन् अभ्यंकर यांनी शेवटी भूमिका एका ‘माईल स्टोनङ्क अशा चित्रपटात केली या विचारानं मन भरून येतं. किशोर कदम यांनी साकारलेला ‘काका' सगळ्याच पालकांना विचार अन् जबाबदारीची जाणीव देतो. कथेत हलक्या-फुलक्या विनोदांची पेरणी केली आहे. त्यामुळे चित्रपट आणखीच मनाला भिडतो. सगळ्याच कलाकारांनी ताकदीचा आणि नैसर्गिक अभिनय केला आहे. जो विषय समाजात बोलण्यास कुणी पुढाकार घेत नाही तो पहिल्यांदाच मराठीतून पडद्यावर दाखविण्याचं धाडस निर्मात्यांनी केलं आहे. त्यांमुळं त्यांचं कौतुक होणं गरजेचं आहे. हा चित्रपट जरी लैंगिक शिक्षणावर आधारित असला तरी यात अश्लिलता कुठेच नाही. सहकुटुंब पाहता येईल आणि पाहावाच असा हा चित्रपट आहे. असे असताना किती पालक हा चित्रपट आपल्या बालकांसोबत पाहतील? पालकांनी चित्रपट पाहिल्यानंतर ते मुलांना समजून घेऊन त्यांच्या प्रश्नांची योग्य उत्तरं देतील का, की केवळ मनोरंजन म्हणून चित्रपट पाहायला येतील आणि घरी गेल्यानंतर विसरून जातील, असे एक ना अनेक प्रश्न सुज्ञ प्रेक्षकांना पडले नाही तर नवलच. 
-  विकास वि. देशमुख
करडा, रिसोड, वाशीम.

९८५०६०२२७५
०००००

Vikas Deshmukh
Karda, Risod, Washim

रामदास स्वामी

लग्नाची सारी तयारी झाली होती, मंगलाष्टका म्हटल्या जात होत्या. ‘शुभमंगल सावधान’ चा घोष झाला आणि हातात वरमाला घेऊन उभा असलेला नवरदेव मांडवातून धूम ठोकून पळाला. खूप शोधाशोध झाली; पण तो काही सापडला नाही. पुढे हाच युवक रामदास स्वामी, या नावाने प्रसिद्ध झाला. ‘दासबोध’सारखा ग्रंथ त्यांनी लिहिला, ‘मनाचे श्लोक’ ही त्यांची कालातीत अशी व्यवहारज्ञानाची देणगी आहे. आजही समर्थ रामदासांचे व्यक्तिमत्त्व अनेक कारणांनी चर्चेत
असते; पण त्यांनी लग्न मंडपातून पलायन केल्यामुळे त्यांच्या वाग्दत्त वधूचे पुढे काय झाले, हे कधीच वाचनात आले नाही. प्रभू रामचंद्राबरोबर वनवासामध्ये सीतामाई होत्या; पण बंधू लक्ष्मणाबरोबर त्यांची पत्नी नव्हती. तिने पतीचा विरह बारा वर्षे सहन केला. कवी मैथिलीशरण गुप्त यांनी त्या ऊर्मिलेच्या मानसिक आंदोलनावर ‘साकेत’ हे महाकाव्य लिहिले; पण रामदासांची न झालेल्या पत्नी मात्र उपेक्षितच राहिली. रामदासांच्या होऊ घातलेल्या या दुर्दैवी वधूचे पुन्हा लग्न ठरले काय? त्या काळात प्रबळ असलेल्या पुरुषसत्ताक व्यवस्थेत तिला कशी वागणूक मिळाली की तिने आत्महत्या केली? नेमकी काय झालं असेल त्या युवतीचं...
 
- विकास वि. देशमुख
करडा, रिसोड, वाशीम


Vikas V. Deshmukh
Karda, Risod, washim

जातीव्यवस्थेमुळे आईला विकावा लागला काळजाचा तुकडा

राजस्थानातील झालावाड गाव. या गावात काही भटकी कुटुंबं पालं टाकून राहतात. यातील एका कुटुंबात एक चुणचुणीत मुलगी. तिचं वय झोपाळ्यावाचून झुलण्याचं. मंदिरांतील घंट्या अन् मैत्रिणीसोबत खेळण्या-कुदळण्याचं; पण तिचं कुटुंब अठराविश्व दारिद्य्रात खितपत पडलेलं. दिवस उजाडला की दोन वेळच्या जेवणाची भ्रांत या कुटुंबाला पडते. दारिद्य्रीकाठच्या यातना भोगणा-या या कुटुंबातील तिच्या आईला जात पंचायतीने एका प्रकरणात ४ लाख ५० हजार रुपयांचा दंड भरण्याचं फर्मानं सोडलं. ही रक्कम भरली नाही तर जातीतून बाहेर काढण्याची धमकीही दिली. तिचं आणि तिच्या कुटुंबाचं पोटं तळहातावर. त्यामुळे ऐवढी मोठी रक्कम ती कुठून आणणार... आणि ही रक्कम भरली नाहीच तर? पंचायत जाती बाहेर काढेलच शिवाय अजून दुसरी शिक्षासुद्धा देईल, या भीतीनेच आणि जातीच्या खोट्या अभिमानेही एखाद्या पाळीव जनावराप्रमाणे आपल्या कोवळ्या मुलीचा तिने जाहीर लिलाव केला. यात या मुलीला साडे सहा लाख रुपये बोली मिळाली. खरिदार मुलीला घेऊन जात असताना तिने त्यांच्या हाताला झटका देऊन धूम ठोकली. ती एका हॉटेलमधील टेबलामागे लपली. हुमसूहमसू रडू लागली. हॉटेल मालकाला सशंय आला. त्याने या बाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिस आले. मुलीने सारा प्रकार सांगितला. खरिदार तिला मुंबईला घेऊन जाणार होते, अशी कैफियत या चिमुकलीने पोलिसांना सांगितली. त्यावरून पोलिसांनी तिची आई आणि खरिदारांना अटक केली आहे.
एकीकडे सारा देश ६४ व्या प्रजासत्ताक दिनाची तयारी करत असताना काळजाची चाळणी करणारा हा प्रकार राजस्थानातील भटक्यांच्या पालावर घडला. येथील व्यवस्थेने त्यांच्यावर पिढ्यान्पिढ्यानपासून लादलेली लाचारी, जातीचा खोटा अभिमान, स्वतःला समांतर न्यायव्यवस्थाच समजणारी क्रूर जात पंचायत आणि गरिबी यामुळेच हे घडलं. यात या मातेचा दोष आहे असे मी म्हणत नाही. तर तिच्यावर अन्याय केला तो येथील मूळ व्यवस्थेनं. या व्यवस्थेमुळे तिच्या आईला तिची विक्री करावी लागली. व्यवस्थेमुळेच त्यांच्यावर भटके म्हणून जगण्याची वेळ आली. त्यामुळेच त्यांना सामाजिक प्रतिष्ठा नाही. सामाजिक प्रतिष्ठा नसल्याने पैसा नाही. परिणामी शिक्षण, आरोग्य अन् घरसुद्धा नाही. या दलदलित हे भटके फसले आहेत. आज आपली लोकशाही ६४ वर्षें झाली तरीही दलित, भटके, आदिवासी यांचं जीवन आपण अजूनही सुधारू शकलो नाही, हेच यातून दिसून आले आहे. हजारो वर्षांपूर्वी मेंदूत पेरलेलं शोषणाचं तणकट अजूनही दणकट अवस्थेत आहे, हीच शोकांतिका आहे.

 - विकास वि. देशमुख

   करडा, रिसोड, वाशीम.
                                                                                                                       

                                                                                                                           Vikas Deshmukh 

                                                                                                                        Karda, Risod, Washim