बुधवार, २० मार्च, २०१३

अभंग

विकास वि. देशमुख यांच्या अभंग वृत्तातील चार-चार ओळीच्या कविता.
 (Vikas V. Deshmukh Karda, Tq- Risod, Dist- Washim) 

रविवार, १७ मार्च, २०१३

ये ‘आसुमल थाऊमल सिरुमलानी' रंगिला है !


 महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्ये सध्या भीषण दुष्काळाच्या दाहकतेने भाजून निघाले आहेत. हा दुष्काळ अन्न-धान्याचा नाही. तो पाण्याचा आहे. कधी नव्हे ते यंदा ऐन हिवाळ्यातच जलसाठे कोरडे पडले. त्यामुळे पेयजलाचा प्रश्न ऐरणीवर आला. माणसं गाव सोडून गुराढोरांसह भटकंती करीत आहेत. वन्यप्राणी तडफडून मरत आहेत. असे असताना  अंधळ्या भाविकांचे श्रद्धास्थान असलेले असाराम बापू आणि त्यांच्या असंख्य भाविकांनी महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये कस्तुरचंद पार्कवर धूळवड खेळली. त्यासाठी लाखो लीटर पाण्याची नासाडी केली. विशेष म्हणजे नागपुरातही पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. आपल्या तहानलेल्या नागरिकांना पाणीपुरवठा करण्याचे सोडून नागपूर  महानगरपालिकेने  या धूळवडीसाठी टँकरने पाणी पुरवविले. आसाराम बापूंनी भक्त आणि भक्तीनींच्या अंगावर पाण्याचे फवारे उडविले. भक्तांनीसुद्धा मोठ्या रंगात येऊन आपल्या सोबतच्या भक्तीनींना बापूंच्या साक्षीने रंगविले. त्यामुळे आसाराम बापूंचा रंगिला स्वभाव पुन्हा एकदा दिसून आला. आसारामबापू हे वातानुकूलित गाडीतून फिरतात. कडेकोट संरक्षणात वावरतात. रोज मिष्टान्न खातात. भक्तीचा व्यवसाय करतात. चित्रविचित्र पोषाख घालतात. कधी मुड झालाच तर गुरूचा बुरखा उतरवून नाचा होत नाचतात. स्वतःला देव म्हणतात. यामुळेच ते असामान्य वाटतात. म्हणूनच की काय, सामान्य दुष्काळग्रस्तांचे   पाण्यासाठी होत असलेले हाल त्यांच्या ‘दिव्य दृष्टी'ला दिसत नाहीत.  मुळात या बापूंचे नाव आसुमल थाऊमल सिरुमलानी आहे. १७ एप्रिल १९४१ रोजी पाकिस्तानातील  बेरानी (नवाबशहा)  या गावी त्यांचा जन्म झाला.  फाळणीनंतर त्यांचं कुटुंब भारतात अहमदाबाद आले. ते लहान असतानाच त्यांचे वडील मरण पावले. त्यामुळे लिहिता-वाचता येईल एवढंच शिक्षण ते घेऊ शकले. व्यवसाय म्हणून त्यांनी एका छोट्या मंदिरात पूजारी म्हणून काम सुरू केले. धंदा ब-यापैकी चालत होता. त्यामुळे आसुमल यांच्यासाठी चांगली स्थळे येऊ लागली. त्यांच्या आईने एक चांगल स्थळ निवडून लक्ष्मीदेवी यांच्याशी त्यांचे लग्न ठरविले; पंचाग पाहून मुर्हुत शोधला; मात्र इथेच माशी शिंकली अन्  लग्नापूर्वी आसुमल घरातून पळून गेले. सासरकडच्या मंडळींनी त्यांचा शोध घेतला. त्यांना धकमावले. त्यामुळे घाबरून जावून त्यांनी अखेर त्यांनी नव्या मुर्हुतावर लग्न केले. पुढे काही काळ  संसार करून आसुमल हे उत्तर प्रदेशातील वृंदावन येथे गेले. तेथून संपूर्ण देशात आपला धंदा वाढविला. अजूनही वाढवित आहेत. या अल्पशिक्षित बापूंना अनेक उच्चशिक्षित शिष्य मिळाले. ज्यांनी कोणी गैरमार्गाने, गरिबांचे शोषण करून, देशाची लुबाडणूक करून पैसा कमाविला असे नवश्रीमंत भक्त या लबाड बापूंना दान देऊन त्यांचे घबाड भरत आहेत. पैशामुळे या बापूंना माज चढत आहे. परिणामी, दिल्ली बलात्कार असो वा राहुल गांधी अशा कुठल्याही विषयावर ते बेतालपणे भाष्य करतात. हे करीत असताना त्यांनी आयुर्वेदिक औषधी विकण्याचा धंदाही वाढविला. गावोगावी आपल्या भक्तांना आपल्या उत्पादनाची दुकान थाटायला भाग पाडले. या धंद्यांसोबतच कायदे, नियम गुंडाळून ठेवण्याची त्यांची वृत्तीसुद्धा विकसित झाली. गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातील भैरवी या गावी राज्य सरकारकडून दहा एकर जमीन घेतली आणि तेथे अलिशान आश्रम बांधला. हळूहळू या आश्रमाच्या बाजूची जमीनही ताब्यात घेतली. ज्यांच्या जमिनी बळकावल्या त्यांनाच धमकावले. मग या पीडितांनी पोलिसांकडे तक्रार केली. अखेर राज्य सरकारने सहा एकर अनधिकृत जागेवरील आश्रमाचे बांधकामवर बुलडोजर चालविला. त्यांच्या आयुष्यात असे अनेक वादग्रस्त बेकायदा घटना आहेत. त्या कुठल्याही सज्जन माणसाचे गुंड व्यक्तीत रुपांतर करायला पुरेशा आहेत. बापूंचाच शिष्य असलेला राजू चांडक याने एकदा या बापूंना एका भक्त स्त्रीसोबत अश्लिल चाळे करतात पाहिले. जे पाहिले ते त्याने  डिसेंबर २००९ मध्ये न्यायलयात एका प्रतिज्ञापत्र लिहून दिले. त्यामुळे साबरमती येथील रामनगरात राजूवर दोन अज्ञात इसमांनी हल्ला केला. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदला आणि राजू चांडक याच्यावरील खुनीहल्ल्याचा प्रयत्न केल्याबद्दल आसारामबापू यांच्यावर गुन्हा नोंदण्यात आला. त्यापूर्वी आणखी एका प्रकरणात आसारामबापूंच्या आश्रमातील गुरुकुल शाळेत शिकणा-या दीपेश वाघेला आणि अभिलाष वाघेला या १० व ११ वर्षांच्या मुलांचे मृतदेह साबरमती नदीच्या पात्रात आढळून आले. त्याविरुद्ध अनेक पालकांनी संतप्त तक्रारी पोलिसांकडे केल्या. या प्रकरणाची सीआयडी चौकशी गुजरात सरकारने घोषित केली. सात साधकांना पोलिसांनी अटक केली. आसारामबापू यांच्या आश्रमात काळीजादू, मंत्रतंत्र याचे अघोरी प्रयोग केले जातात, त्यासाठी बहुधा या मुलांच्या हत्या झाल्या असाव्यात असे पोलिसी तपासात म्हटले होते. या गूढ मृत्यूचे रहस्य आता आणखी गहिरे झाले आहे.बापूंचेच गुण वारसा हक्काने त्यांच्या चिंरजिवांच्या स्वाभावात उतरले. त्यामुळेच त्याच्याही प्रेमलीलाही बाहेर आल्या आहेत.  त्यांचा मुलगासुद्धा स्त्री लंपट निघाला. हेच यांचे संस्कार आहेत. कारण जे पेरले तेच उगवणार हा नियम आहे.  

- विकास वि. देशमुख  
करडा, रिसोड, वाशीम.

Vikas V. Deshmukh 
Karda, tq- Risod, dist- Washim


धर्मनिरपेक्ष शिवाजी महाराज


त्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या आदराचे आणि भक्तीचे उत्तुंग असे स्थान आहे. प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात शिवछत्रपतींबद्दल अतीव अभिमान भरलेला आहे. खरे तर शिवछत्रपती हे सा-या भारताचे अस्मिता स्थान आहे. त्यामुळे केवळ महाराष्ट्राने शिवाजी महाराजांच्या अभिमानावर  मालकी सांगू नये. शिवछत्रपती हे देशातील कोट्यवधी लोकांना आदर्श वाटतात, कारण त्यांच्याबद्दल जसा त्यांना अभिमान वाटतो तसाच आपलेपणाही वाटतो. शिवाजी राजांच्या युद्धनीतीमुळे त्यांना जागतिक पातळीवरही मान्यता मिळाली. जेव्हा शत्रू बलाढ्य असतो आणि तो त्याला फारशी माहिती नसलेल्या क्षेत्रात युद्धासाठी उतरतो तेव्हा त्याला नामोहरम करण्यासाठी गनिमी कावा कसा वापरावा याचा आदर्श छत्रपती शिवाजी  राजांनी आपल्या युद्धतंत्रामुळे निर्माण केला. म्हणूनच व्हिएतनाममध्ये अमेरिकेची बलाढ्य सेना उतरल्यावर तेथील जनतेचे लोकनेते हो चि मिन्ह यांनी शिवाजी राजांचे ‘गोरिला वॉरफेअरङ्क तंत्र वापरले. विश्वविजयी अमेरिकी सेनेला अखेर व्हिएतनाममधून नामुष्कीची माघार घ्यावी लागली. अनेक इंग्रज इतिहासकारांनी शिवछत्रपतींच्या युद्धतंत्राची तुलना  हानिबल, ज्युलियस सिझर, नेपोलियन यांच्याशी केली आहे. भारतात सागरी बळ वाढविण्याची दृष्टी शिवछत्रपतींकडे होती. त्यामुळेच त्यांनी कोकण किना-यावर सिंधुदूर्गसारखे सागरदुर्ग बांधले आणि पहिल्या भारतीय आरमाराची उभारणी केली होती. तत्कालीन ब्रिटिश राज्यकत्र्यांनी शिवछत्रपतींच्या या दूरदृष्टीची नोंद घेतल्याचे ठिकठिकाणच्या कागदपत्रांवरून दिसते. एक आदर्श प्रजाहितदक्ष राजा, उत्कृष्ट प्रशासक, राजकारणापासून धर्माला सुरक्षित अंतरावर ठेवणारा विचारी नेता असे अनेक गुण शिवछत्रपतींच्या व्यक्तिमत्त्वात दिसतात. त्यांच्या चरित्रात आणि चारित्र्यामध्ये शाश्वत जीवनमूल्ये आणि पुरोगामी आशय दिसतो. त्यामुळेच चारशे वर्षांनंतरही शिवछत्रपतींची सर्वसामान्य लोकमनावरील
जादू कधी कमी होणार नाही.अशी सर्वांना भावणारी व्यक्तिमत्त्वे अनेकदा समाजातील वरिष्ठ वर्गाला, राजकीय नेत्यांना सोयीची वाटतात आणि आपल्या विचाराप्रमाणे त्या लोकोत्तर पुरुषावर रंग चढविण्याचा प्रयत्न होतो. अनेकदा जनमानसातील शिवछत्रपतींचे स्थान आपल्या राजकीय किंवा सामाजिक, धार्मिक स्वार्थासाठी वापरण्याचा मोह अनेकांना होतो. त्यामध्ये निखळ आदरभाव, भक्ती किती आणि विविध प्रकारचे लाभ मिळविण्याचे प्रयत्न किती हे समजणेही अनेकदा खूप अवघड होते. आज राजकीय व सामाजिक क्षेत्रात गावोगावी उगवणा-या अनेक संस्था शिवछत्रपतींचे नाव वापरतात. बहुधा त्यांचे वर्तन मात्र शिवछत्रपतींच्या आदर्शांविरुद्धच असते. महाराष्ट्रात ठिकठिकाणी उभा राहिलेली शिवस्मारके ही अशा संमिश्र गोष्टींचे फलित आहे. काही लोकांना शिवाजीराजे ही आपल्या जातीची, समाजाची मिरासदारी वाटते. काही राजकारण्यांना शिवाजीराजांचा भगवा ध्वज सोयीचा वाटतो. काहींना राजांनी आदिलशहा  qकवा औरंगजेब यांच्याशी दिलेला ऐतिहासिक लढा हा धर्मगौरव वाटतो. पण राजांचा लढा हा धार्मिक कधीच नव्हता. तसे असते तर त्यांनी आपल्या सैन्यातील महत्त्वाची पदे मुस्लिम योद्धे किंवा सेनानी यांना बहाल केली नसती. केवळ हिंदवी स्वराज्य ही कल्पना त्यांनी आपली मानली नाही तर प्रजेचा न्यायप्रिय राजा होण्यात मोठेपणा मानला.

शुक्रवार, १५ मार्च, २०१३

बेंच


कॉलेज सुटतं. आयुष्यात स्थिरावण्याचा प्रयत्न सुरू होतो. तरीही कॉलजेच्या मोरपंखी आठवणी मनात रुंजी घालतात. आठवतो तो मित्रांसोबत शेअर केलेला बेंच. बोअर झालेल्या पिरिअडमध्ये उगाचच त्या बेंचवर गिरवलेल्या चारोळ्या. तिथेच मांडलेला फुल्ली-गोळ्य़ाचा डाव तर कधी आपल्याला आवडणा-या तिचं किंवा त्याचं नाव तर उगाचच खोडी म्हणून दिलच्या चिन्हात लिहिलंल त्या दोघांचं नाव. त्यावर प्राचार्यांकडे झालेली तक्रार अन् कानाचे पडदे फाटेस्तोर ऐकून घ्यावं लागलेलं लेक्चर. परीक्षेच्या काळात कोणत्या बेंचवर आपला नंबर येणार ते आदल्याच दिवशी हुडकून शिपायाला फूस लावून त्या बेंचवर लिहिलेले उत्तराचे मुद्दे असं बरंच काही.. काही.
कॉलेजच्या आयुष्यात प्रत्येकाचाच सख्खा मित्र असतो बेंच. कुणाचा अगदी पहिल्या रांगेत सर्वात पुढचा, कुणाचा मधल्या रांगेतला तर कुणाचा अगदी शेवटचा. कोण कुठल्या बेंचवर बसतं यावरून त्यांचा स्वभावसुद्धा लक्षात येतोे. अगदी पुढे बसणारे नम्र असतात. नाकाच्या दिशेनं चालणारे. दिलेलं होमवर्क करणारे. केवळ आपणच कसं टॉप राहू असाच विचार करणारे. स्वतःला जपणारे. या उलट शेवटच्या बेंचवर बसणा-यांच असतं. ‘अपनी तो पाठशाला मस्ती की पाठशाला’ म्हणत ते टरेलक्या करतात. कुणाचे केस ओढतात... कुणाला दगड-खडू मारतात... सरांची खिल्ली उडवतात... जणू हे सगळं करण्यासाठीच ते या जागेवर बसतात की काय असं वाटतं; पण वरकरणी ते जरी खोडकर असले तरी ते इतरांच्या मदतीला धावून जातात. आपण केलेल्या खोड्यातून आपल्या इतर मित्रांचं मनोरंजन कसं होईल, हे ते पाहत असतात. मधल्या रांगेत बसणारे बिच्चारे खरोखरच अधले- मधलेच असतात. कधी ते अभ्यास करतात तर कधी खोड्या. काही ठस्सही याच रांगेत असतात. एकूणच काय तर थोडेसे टवाळखोर, थोडेसे हुशार आणि काहिसे गाढव असं मिश्रण असणारी रांग म्हणजे मधली रांग. एकूणच काय तर बेंचचं अन् आपलं नातं अतुट असतं. दिवसा मागून दिवस जातात. कॉलेज तिथंच असतं. त्याच्या रस्त्यावरील गुलमोहराला दरवर्षी नवा बहर येतो. कॉजेलपूर्वीसारखंच फुलतं फक्त दरवर्षी त्या बेंचवर दुसरं कुणी तरी बसतं.

 
- विकास वि. देशमुख
 करडा, ता. रिसोड, जि. वाशीम.

‘हत्ती’ ला ‘गरूड’ गती मिळेल ?


राज्यातील फुले-आंबेडकरी चळवळ खिळखिळी झाली. प्रकाश आंबेडकर केवळ अकोला जिल्ह्यापुरतेच मर्यादित झाले. प्रा. जोगेंद्र कवाडे हे वादळही थंडावले. रामदास आठवले यांनी तर शिवसेना-भाजपच्या गोटात सामील होऊन स्वतःच आंबेडकरी चळवळीचा खून केला. रा. सु. गवई सध्या काय करीत आहेत हा संशोधनाचा विषय आहे. नामदेव ढसाळांचेही विचार, निष्ठा शिवसेनेच्या उपकाराखाली पूर्णतः ढासळली आहे. याचाच फायदा काँग्रेस, राकाँ, भाजप, शिवसेना या पक्षांना होत आहे. परिणामी सत्ताधारी जमात होण्याचे बाबासाहेबांचे स्वप्न धुळीस मिसळले आहे. अशा स्थितीत चळवळीत नव्याने आलेली पिढी सैरभैर झाली. राज्याच्या याच वर्तमान स्थितीचा अभ्यास करून बसपच्या सुप्रिमो मायवती यांनी गेल्या १७ फेब्रुवारीला उपराजधानी नागपूरच्या कस्तुरीचंद पार्कवर मेळावा घेतला. ‘न भूतो न भविष्यति’ असा प्रचंड जनसमुदाय राज्याच्या कानाकोप-यातून एकत्रित आला होता. एक प्रकारे आंबेडकरी चळवळ आता हत्तीवर स्वार होते की, काय असे चित्र या मेळाव्यामुळे निर्माण झाले आहे.बसपाने मधल्या काळात अनेक चढउतार पाहिले. गतवर्षी आपला बालेकिल्ला असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये त्यांचा सपाने सपाटून पराभव केला. पण राजकारणात असे चढउतार येत असतात, याच विचारातून पुन्हा नवी उभारी घेत दिल्ली काबीज करण्याची मोहीम आखली आहे. फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारधारेचे सरकार देशात सत्ता काबीज करू शकते, या मतावर ठाम असलेल्या कांशिराम यांनी बामसेफ, डी.एस.फोर असा प्रवास करीत १४ एप्रिल १९८४ ला पक्षाची स्थापना केली. पण दुर्दैवाने या पक्षाला महाराष्ट्रात यश प्राप्त झाले नाही. त्या तुलनेत उत्तर प्रदेशमध्ये या पक्षाने चारवेळा सरकारही स्थापन केले. त्यापाठोपाठ बिहार, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड, पंजाब, मध्य प्रदेश, छत्तीसगड आदी राज्यांमध्ये या पक्षाचे आमदार आणि खासदार जिंकून आल्याचा इतिहास आहे. कांशिराम यांनी त्यांच्या सामाजिक आणि राजकीय जीवनाची सुरुवात महाराष्ट्रातून केली. पण त्यांना त्यांच्या हयातीमध्ये राज्यात पक्षाचा निकाल आणता आला नाही. त्यांच्यानंतर पक्षाची सूत्रे मायावती यांच्या हाती आली. त्यांनी कांशिराम यांच्या तालमीत तयार झालेले विलास गरूड यांच्याकडे राज्यप्रमुखाची सूत्रे दिली. २००८ पासून त्यांनी राज्याचे नेतृत्व लिलया पेलले. नवतरुणांना साद घातली. राज्याच्या कानाकोप-यामध्ये फिरत एक नवी फळी राजकारणाच्या पटलावर निर्माण केली. कार्यकत्र्यांमध्ये आत्मविश्वास पेरून राज्यात सत्ता स्थापनेचा नवीन अजेंडा बहुजन समाजापर्यंत पोहोचविला. त्यांना संदीप ताजणेसारखे तरुण, तडफदार, आत्मविश्वासू आणि अभ्यास असलेले अनेक उच्चशिक्षित कार्यकर्ते भेटले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील पक्षाच्या जनाधाराचा आलेख बघता इतर बहुजन संघटनांपेक्षा बसपा अगदी सरस ठरल्याचे दिसते. राज्याच्या उपराजधानीमध्ये १२ नगरसेवक जिंकून आणण्याची भीम पराक्रमही त्यांनी साधला आहे. अमरावती, ठाणे, नगर, सोलापूर, मुंबई, उल्हासनगर आदी महापालिका आणि अनेक नगरपालिकांत सदस्य आहेत. शिवाय जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये पक्षाने खाते उघडून इतर राजकीय पक्षांना त्यांच्या उपस्थितींची दखल घेण्यास भाग पाडले. २००९ ला लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात बसपाला उतरतीकळा लागली होती. मात्र गरूडांच्या चिवटपणाने पक्षाला पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणामध्ये सक्रिय केल्याचे नागपुरातील मायावती यांच्या विशाल जनसभेवरून सिद्ध होते. त्यामुळे नक्कीच रिपाइं पक्षाच्या काळजात धस्स झाले. इतर रिपाइं पक्षाकडे भविष्याचे नियोजन नाही, ठोस कार्यक्रम नाही. प्रकाश आंबेडकर त्यादृष्टीने विचार करतात, बोलतात. मात्र त्यांनाही अकोल्याच्या बाहेर पडता येईनासे झाले. अशा स्थितीत बसप सशक्त पर्याय ठरू शकतो. तूर्तास इतकेच म्हणता येईल की, मायावती यांच्या सभेला जी लाखोची गर्दी जमली होती. त्यापैकी किती जण आपले मत हत्तीला देतील यावरून महाराष्ट्रात बहुजन समाज पक्षाचे स्थान ठरणार आहे.
- विकास वि. देशमुख
करडा, ता. रिसोड, जि. वाशीम.