रविवार, २२ एप्रिल, २०१८

बिलंदर अन् कलंदर


नितीन पगार ( Nitin Pagar )
जही आठवतं. जुलै २००२ मधील एक दिवस. मी राजस्थान महाविद्यालयात बीए फस्ट इयरला होतो. वाशीमला येऊन मला फार-फार तर आठवडा झाला होता. काॅलेजमध्ये सायकल पार्किंगच्या नावाखाली महिन्याकाठी ४० ते ५० रुपये उकळले जात होते. त्या काळात मापारीच्या टपरीवर चहाचा एक कट दोन रुपयांना तर एक प्लेट गरमा-गरमा पोहे तीन रुपयांना मिळत. एकूणच काय तर १५० रुपयांत पोरांचा महिन्याभराचा चहा-नाष्टा होत होता. त्यात सायकल पार्किंगचे ५० रुपये म्हणजे अतीच होते. या विरोधात सुरेंद्र गीते या विद्यार्थी नेत्याने काॅलेज प्रशासनाविरोधात आंदोलन केले. झाडून सगळे विद्यार्थी त्याच्या पाठीशी उभे राहिले. काॅलेज बंद पाडलं. पण, मालू सरांसमोर बोलणार कोण? सगळेच एकमेकांच्या चेहऱ्यांकडे पाहात होते. इतक्यात साउथच्या हिरोप्रमाणे नितीन पगार या युवा पत्रकाराची एमएटीवरून एंट्री झाली. सुसाट आलेल्या नितीनभाऊंची गाडी थेट मालूसरांच्या कक्षाबाहेर थांबली. जिथं खुद्द प्राचार्याची चारचाकी उभी होत नव्हती. तिथं या पठ्ठयानं आपली भंगार एमएटी मोठ्या स्टाइन उभी केली. सातशे-आठशे विद्यार्थी आवाक् झाले. नितीनभाऊनं नरजेच्या एका टापून विद्यार्थ्यांची गर्दी टिपली. गीते यांच्यावरही एक कटाक्ष टाकला अन् कवेलूच्या एका वर्गखोलीबाहेर गुलमोहराखाली बसलेल्या पाच ते सहा विद्यार्थ्यांकडे त्यांची पावलं वळली. हे विद्यार्थ्यांचं टोळकं म्हणजे माझ्याच वर्गात. (हे नंतर मला कळलं) त्यात एक किडकिडीत बांधा असलेला, काळा ठिक्कार मात्र चेहऱ्यावर तेज असलेल्या एका पोरासमोर नितीनभाऊ जाऊन थांबले. तो पोट्टा म्हणजे संदीपभाऊ ताजणे. भाऊच्या सोबत असलेल्यांनी लागलीच भाऊच्या हातात व्हिडिओ कॅमेरा दिला. टीव्ही पत्रकार आला, टीव्ही पत्रकार आला’ म्हणत आम्ही खेडवळ पोर त्यांच्या दिशेने पळालो. भाऊंनी संदीपभाऊंसमोर कॅमेरा धरला नि संदीपभाऊंनी आवेशात विद्यार्थ्यांची समस्या मांडली. कसलेल्या, मुरलेल्या नेत्यांप्रमाणे त्यांनी नितीनभाऊंना बाइट दिली. ते आवेशपूर्ण बोलणं ऐकून मालूसरही बाहेर आले अन् पार्किंग शुल्क रद्द केल्याची घोषणा केली. नितीनभाऊंच्या अनुभवी नजरेनं एवढ्या गर्दीतूनही खरा विद्यार्थी नेता हेरला. संदीपभाऊनंही अस्सल राजकारण्याप्रमाणे सुरेंद्रभाऊंचं आंदोलन हायजॅक केलं. (या कामी त्यांना नितीनभाऊंची मदत झालीच) पुढं-पुढं मी कविता लिहियला लागलो. ती कविता घेऊन झाडून सगळ्या वर्तमानपत्रांच्या पत्रपेट्यात टाकायला लागलो. लोकमतशिवाय कुणी माझी कविता छापेना. त्यामुळे स्वतः कार्यालयात जाऊन कविता देण्याचे ठरविले. थेट नितीनभाऊंच्या 'नवराष्ट्र'मध्ये गेलो. हा प्रसंग त्यांना आठवत नसेल किंवा असेल माहित नाही. पण, आॅफिसमध्ये नितीनभाऊ एकटेच बसलेले होते. त्यांनी माझी कविता घेतली. वाचली. छापू म्हणाले अन् एक ते दीड सात मला बसवून ठेवत वेगवेगळ्या कविता ऐकवत राहिले. त्यांची कवितेची आवड, कविता ऐकविण्याची स्टाइल पाहून मी त्यांचा फॅन झालो. गंमत म्हणजे त्यावेळी माझी ठेवून घेतलेली कविता नितीनभाऊनं अजूनही छापली नाही. पुढं अकोला दर्शनमध्ये मी, अतीशभाऊ आणि नितीनभाऊंनं तीन वर्षे सोबत काम केलं. आम्हा तिघांनाही त्यातून आर्थिक फायदा असा फारसा काही होत नव्हता. पण, काम करताना खूप मज्जा येत होती. नितीनभाऊंकडून खूप शिकायला मिळाले. दिवसभर आम्ही दर्शनमध्ये काम करत होते अन् रात्री मी आणि नितीनभाऊ सगळं वाशीम त्यांच्या एमएटीवरून फिरून पहाटे कधीतरी २ ते ३ वाजता आमच्या सिव्हिल लाइनच्या रुमवर झोपायला जात होतो. त्यावेळी वाशीममधील सगळे भिकारी, बेघर, मनोरुग्ण, निराश्रित, बसस्टॅण्ड, रेल्वेस्टेशनवर झोपणारे या सगळ्यांना नितीनभाऊ नावानीशी ओळखत होते अन् तेही नितीनभाऊंना ओळखत होते. काही भिकारी आपुलकीनं, मायनं नितीनभाऊंच्या हातावर चाराणे-आठाणेही ठेकवत असल्याचे मी स्वतः पाहिले. खरंच इतक्या शेवटच्या घटकापर्यंतही हा माणूस जनसंपर्क ठेवून आहे. एका भिकाऱ्याजवळ ते स्वतः बसून त्याच्यासोबत शोलेतले डाॅयलाॅग म्हणत. त्यातून भिकाऱ्याचे मनोरंजन तर होतेच होते. शिवाय त्यावेळी हा माणूस स्वतःलाही विसरून जात होता. इतका हा माणूस साधा आहे. अशातच एकदा नितीनभाऊंनं आमदार पाटणी यांच्या विरोधात 'आधुनिक मनू' या हेडिंगखाली दर्शनमध्ये बातमी छापली. त्यावेळी दर्शनमध्ये संपादक म्हणून अतीशभाऊचे नाव छापून येत होते. झालं खवळलेल्या पाटणी साहेबांनी अतीशभाऊंच्या नावानं तब्बल एक कोटी रुपयांच्या मानहानीची नोटिस पाठवली. त्याच वेळी एका आंबेडकरी कार्यकत्याच्या विरोधातही नितीनभाऊंनी झारीतील शुक्राचार्य या शीर्षकाखाली छापले. तोही दर्शन कार्यालयात आला नि इथूनच उडी मारून आत्महत्या करतो, अशी धमकी दिली. पण, याची कधी नितीनभाऊनं पर्वा केली ना आपली रोखठोक भूमिका बदलली. नितीनभाऊचं आणि माझं अनेकदा बिनसलं. भांडणही झालं. आजही अधून-मधून होतं. अनेक मुद्द्यावर आमचे मतभेद आहेत परंतु मनभेद नाही. हा माणूस मला खूप आवडतो. लहान मुलासारखं महात्मा फुले मार्केटमध्ये बसून अजूनही खोड्या करतो तर त्याच वेळी मोठ्या प्रगल्भतेने, जाबादारीनेही वागतो. असंच एकदा दर्शनमध्ये आम्ही बसलेलो असताना एक तृतीयपंथी पैसे मागायला आला. त्यावेळी नगरपालिका निवडणुका सुरू होत्या. नितीनभाऊनं त्याला बसवलं अन् तू राजकारणात का जात नाही हे त्याच्या डोक्यात घुसवलं. झालं त्या तृतीयपंथीने नितीनभाऊंच्या सल्ल्यानं दुसऱ्याच दिवशी निवडणूक अर्ज भरला नि निवडणूक लढविली. असा हा माणूस बसल्या बसल्याच राजकारणातील गणितं बललून टाकतो. नितीनभाऊंचे असे एक ना अनेक किस्से आहेत. 
या कलंदर अन् बिलंदर माणसाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!    

मंगळवार, १७ एप्रिल, २०१८

व्हॉट्‌सअॅपचे घोस्ट रायटर आहेत तरी कोण?

काहींकडे अफाट प्रतिभा असते. त्या बळावर ते उत्तोमत्तोम कथा, कविता लिहितात. त्यांच्या कथेवर चित्रपट निघतो. त्यांच्या कविता गाणं म्हणून हीट होतात. पण, या साहित्यकृतीच्या निर्मितीचे श्रेय तिच्या मूळ लेखक-कवीला मिळतच नाही. कुणी तरी बडा दिग्दर्शक, लेखक, निर्माता बक्कळ पैसे देऊन त्यांची ही कलाकृती विकत घेतो अन्‌ त्या खाली स्वतःचे नाव लावतो. हा प्रकार सिनेजगतात नवीन नाही. आपली कलाकृती विकणाऱ्या साहित्यिकाला चंदेरी दुनियेत घोस्ट रायटर म्हणतात. असेच घोस्ट रायटर सोशल मीडियामध्येही आहेत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फेसबुक, व्हॉट्‌सअॅपवर दिवसभरात नानाविविध विषयांची माहिती आपल्याला मिळते. त्यात कधी सुविचार असतात तर कधी आरोग्याबाबत काय काळजी घ्यावी, पाणी कसे प्यावे इथंपासून ते पार चीन अमेरिका, सीरियामधील घडामोडी, या सरकारमुळे अच्छे दिन कसे येणार ते अच्छे दिन येणारच नाहीत, अशा सगळ्याविषयांवर साधक-बाधक विचार, लेख आपल्याला चटक फू वाचायला मिळतात. शिवाय या लेखांच्या लेखकाला ना त्याचे श्रेय हवे असते ना ते कॉपी राइटचा दावा ठोकतात. पण कधी विचार केला का, की कुठल्याही विषयावर साधं पानभर लिहायचं तर किती संदर्भ जमा करावे लागतात, अभ्यास करावा लागतो, संबंधित विषयाच्या तज्ज्ञाला बोलून "कोट' करावा लागतो. मग कुठे त्या विषयाची मांडणी करायला सुरवात होते. परंतु, घटना घडते अन्‌ तास-दोन तासात तिचे संदर्भासहीत विश्‍लेषण फेसबुक, व्हॉट्‌सअॅपवर व्हायरल होते. हे कसं शक्‍य आहे? हे छोटे मोठे लेख लिहिते तरी कोण? कोण आहेत हे घोस्ट रायटर? त्यांचा हेतू काय आहे, याचा आपण शोध न घेताच आपल्याला आवडलेले लेख. माहिती शेअर-फॉरवर्ड करतो.

विशिष्ट हेतूने लेखन 
विविध राजकीय पक्ष, विचारधारेच्या संघटना, जनसंपर्क क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, कंपन्या, जाहिरात एजन्सी हे विशिष्ट हेतूने काम करतात. जन माणसांवर प्रभाव पाडून आपल्याला हवा तसा बदल घडवून आणणे हा त्यांचा मुख्य उद्देश असतो. त्यासाठी त्यांचे स्वतःचे आयटी सेल आहेत. कर्मचारी आहेत. या माध्यमातून आपल्या विचारांचा, कार्याचा आणि उत्पादनाचा प्रचार करण्यासाठी ते या अटी सेलमधील कर्मचाऱ्यांना कामाला लावतात. प्रसंगी विरोधकांच्या उणिवा शोधून त्यावरही लिहिले, दाखविले जाते. या सेलमधील कर्मचाऱ्यांना तत्काळ हवे ते संदर्भ मिळावेत यासाठी त्यांच्याकडे व्हिडिओ, ऑडिओ आणि ई पुस्तकांची लायब्ररी आहे. गरज पडल्यास ते यू ट्यूब, न्यूज पोर्टल यांचाही संदर्भ घेतात. विषयानुसार एक व्यक्ती संदर्भ उपलब्ध करून देते तर दुसरी व्यक्ती त्याच वेळी त्या विषयावर लेख लिहिते किंवा व्हिडिओ-ऑडिओ तयार करते. त्यामुळे कमी वेळात लेख तयार होतो. ट्विटरवरील टॉप 10 हॅशटॅग पाहिले तर त्यातील सात ते आठ हे एखाद्या राजकीय पक्षाने किंवा ऍड कंपनीने चालविले कॅम्पेन असते. त्यामुळे राजकीय विश्‍लेषण असो, की हलका फुलका विनोद त्यातून बहुतांश वेळा कुठल्या तरी एका विचारधारेचा प्रसारच केलेले दिसतो.

आपला वापर होऊ देऊ नका 
विशिष्ट विचारसरणीचे लोक आपले विचार लादण्यासाठी सोशल मीडियातून अफवा पसरवितात. त्यातून कधी निष्पाप मोहम्मद अखलाकचा जीव जातो तर कुणाची बदनामी होते. काही उत्पादक तर आपल्या प्रतिस्पर्धींना मात देण्यासाठी या एका कंपनीच्या शीतपेयात एचआयव्हीचे विषाणू आहेत तर पिठात प्लॅस्टिक आहे असेही मेसेज ऑडिओ, व्हिडिओ व टेक्‍समधून व्हायरल करतात. बऱ्याच वेळा त्याला टीव्ही, प्रिंट मीडियाही बळी पडतो. सोशल मीडियावरील अफवेला खरे मानून नोटाबंदीतच्या काळात दोन हजाराच्या नोटेत चीफ असल्याची बातमी सगळ्या टीव्ही चॅनल आणि वतर्मानपत्रांनी दिली होती. काही वाहिन्यांवर तर या विषयावर तास-तास भर चर्चाही झाली होती. एकूणच काय तर फुटतात मिळणाऱ्या मेसजचे सर्व घोस्ट रायटर हे एकाच विचारसरणीने प्रेरित झालेले असतात. त्यांची मते व्हायरल करण्यास आपणही कळत-नकळत हातभार लावतो. पण त्यातून समाजविघातक विचारांना बळ तर मिळत नाही ना याचा विचार कुठलीही पोस्ट फॉरवर्ड किंवा शेअर करताना करणे आवश्‍यक आहे.

                                                                                        - विकास वि. देशमुख 
                                                                                          करडा, ता. रिसोड, जि. वाशीम.
                                                                                         Vikas V. Deshmukh
                                                                                          Karda, Tq Risod,, Dist Washim