रविवार, २२ एप्रिल, २०१८

बिलंदर अन् कलंदर


नितीन पगार ( Nitin Pagar )
जही आठवतं. जुलै २००२ मधील एक दिवस. मी राजस्थान महाविद्यालयात बीए फस्ट इयरला होतो. वाशीमला येऊन मला फार-फार तर आठवडा झाला होता. काॅलेजमध्ये सायकल पार्किंगच्या नावाखाली महिन्याकाठी ४० ते ५० रुपये उकळले जात होते. त्या काळात मापारीच्या टपरीवर चहाचा एक कट दोन रुपयांना तर एक प्लेट गरमा-गरमा पोहे तीन रुपयांना मिळत. एकूणच काय तर १५० रुपयांत पोरांचा महिन्याभराचा चहा-नाष्टा होत होता. त्यात सायकल पार्किंगचे ५० रुपये म्हणजे अतीच होते. या विरोधात सुरेंद्र गीते या विद्यार्थी नेत्याने काॅलेज प्रशासनाविरोधात आंदोलन केले. झाडून सगळे विद्यार्थी त्याच्या पाठीशी उभे राहिले. काॅलेज बंद पाडलं. पण, मालू सरांसमोर बोलणार कोण? सगळेच एकमेकांच्या चेहऱ्यांकडे पाहात होते. इतक्यात साउथच्या हिरोप्रमाणे नितीन पगार या युवा पत्रकाराची एमएटीवरून एंट्री झाली. सुसाट आलेल्या नितीनभाऊंची गाडी थेट मालूसरांच्या कक्षाबाहेर थांबली. जिथं खुद्द प्राचार्याची चारचाकी उभी होत नव्हती. तिथं या पठ्ठयानं आपली भंगार एमएटी मोठ्या स्टाइन उभी केली. सातशे-आठशे विद्यार्थी आवाक् झाले. नितीनभाऊनं नरजेच्या एका टापून विद्यार्थ्यांची गर्दी टिपली. गीते यांच्यावरही एक कटाक्ष टाकला अन् कवेलूच्या एका वर्गखोलीबाहेर गुलमोहराखाली बसलेल्या पाच ते सहा विद्यार्थ्यांकडे त्यांची पावलं वळली. हे विद्यार्थ्यांचं टोळकं म्हणजे माझ्याच वर्गात. (हे नंतर मला कळलं) त्यात एक किडकिडीत बांधा असलेला, काळा ठिक्कार मात्र चेहऱ्यावर तेज असलेल्या एका पोरासमोर नितीनभाऊ जाऊन थांबले. तो पोट्टा म्हणजे संदीपभाऊ ताजणे. भाऊच्या सोबत असलेल्यांनी लागलीच भाऊच्या हातात व्हिडिओ कॅमेरा दिला. टीव्ही पत्रकार आला, टीव्ही पत्रकार आला’ म्हणत आम्ही खेडवळ पोर त्यांच्या दिशेने पळालो. भाऊंनी संदीपभाऊंसमोर कॅमेरा धरला नि संदीपभाऊंनी आवेशात विद्यार्थ्यांची समस्या मांडली. कसलेल्या, मुरलेल्या नेत्यांप्रमाणे त्यांनी नितीनभाऊंना बाइट दिली. ते आवेशपूर्ण बोलणं ऐकून मालूसरही बाहेर आले अन् पार्किंग शुल्क रद्द केल्याची घोषणा केली. नितीनभाऊंच्या अनुभवी नजरेनं एवढ्या गर्दीतूनही खरा विद्यार्थी नेता हेरला. संदीपभाऊनंही अस्सल राजकारण्याप्रमाणे सुरेंद्रभाऊंचं आंदोलन हायजॅक केलं. (या कामी त्यांना नितीनभाऊंची मदत झालीच) पुढं-पुढं मी कविता लिहियला लागलो. ती कविता घेऊन झाडून सगळ्या वर्तमानपत्रांच्या पत्रपेट्यात टाकायला लागलो. लोकमतशिवाय कुणी माझी कविता छापेना. त्यामुळे स्वतः कार्यालयात जाऊन कविता देण्याचे ठरविले. थेट नितीनभाऊंच्या 'नवराष्ट्र'मध्ये गेलो. हा प्रसंग त्यांना आठवत नसेल किंवा असेल माहित नाही. पण, आॅफिसमध्ये नितीनभाऊ एकटेच बसलेले होते. त्यांनी माझी कविता घेतली. वाचली. छापू म्हणाले अन् एक ते दीड सात मला बसवून ठेवत वेगवेगळ्या कविता ऐकवत राहिले. त्यांची कवितेची आवड, कविता ऐकविण्याची स्टाइल पाहून मी त्यांचा फॅन झालो. गंमत म्हणजे त्यावेळी माझी ठेवून घेतलेली कविता नितीनभाऊनं अजूनही छापली नाही. पुढं अकोला दर्शनमध्ये मी, अतीशभाऊ आणि नितीनभाऊंनं तीन वर्षे सोबत काम केलं. आम्हा तिघांनाही त्यातून आर्थिक फायदा असा फारसा काही होत नव्हता. पण, काम करताना खूप मज्जा येत होती. नितीनभाऊंकडून खूप शिकायला मिळाले. दिवसभर आम्ही दर्शनमध्ये काम करत होते अन् रात्री मी आणि नितीनभाऊ सगळं वाशीम त्यांच्या एमएटीवरून फिरून पहाटे कधीतरी २ ते ३ वाजता आमच्या सिव्हिल लाइनच्या रुमवर झोपायला जात होतो. त्यावेळी वाशीममधील सगळे भिकारी, बेघर, मनोरुग्ण, निराश्रित, बसस्टॅण्ड, रेल्वेस्टेशनवर झोपणारे या सगळ्यांना नितीनभाऊ नावानीशी ओळखत होते अन् तेही नितीनभाऊंना ओळखत होते. काही भिकारी आपुलकीनं, मायनं नितीनभाऊंच्या हातावर चाराणे-आठाणेही ठेकवत असल्याचे मी स्वतः पाहिले. खरंच इतक्या शेवटच्या घटकापर्यंतही हा माणूस जनसंपर्क ठेवून आहे. एका भिकाऱ्याजवळ ते स्वतः बसून त्याच्यासोबत शोलेतले डाॅयलाॅग म्हणत. त्यातून भिकाऱ्याचे मनोरंजन तर होतेच होते. शिवाय त्यावेळी हा माणूस स्वतःलाही विसरून जात होता. इतका हा माणूस साधा आहे. अशातच एकदा नितीनभाऊंनं आमदार पाटणी यांच्या विरोधात 'आधुनिक मनू' या हेडिंगखाली दर्शनमध्ये बातमी छापली. त्यावेळी दर्शनमध्ये संपादक म्हणून अतीशभाऊचे नाव छापून येत होते. झालं खवळलेल्या पाटणी साहेबांनी अतीशभाऊंच्या नावानं तब्बल एक कोटी रुपयांच्या मानहानीची नोटिस पाठवली. त्याच वेळी एका आंबेडकरी कार्यकत्याच्या विरोधातही नितीनभाऊंनी झारीतील शुक्राचार्य या शीर्षकाखाली छापले. तोही दर्शन कार्यालयात आला नि इथूनच उडी मारून आत्महत्या करतो, अशी धमकी दिली. पण, याची कधी नितीनभाऊनं पर्वा केली ना आपली रोखठोक भूमिका बदलली. नितीनभाऊचं आणि माझं अनेकदा बिनसलं. भांडणही झालं. आजही अधून-मधून होतं. अनेक मुद्द्यावर आमचे मतभेद आहेत परंतु मनभेद नाही. हा माणूस मला खूप आवडतो. लहान मुलासारखं महात्मा फुले मार्केटमध्ये बसून अजूनही खोड्या करतो तर त्याच वेळी मोठ्या प्रगल्भतेने, जाबादारीनेही वागतो. असंच एकदा दर्शनमध्ये आम्ही बसलेलो असताना एक तृतीयपंथी पैसे मागायला आला. त्यावेळी नगरपालिका निवडणुका सुरू होत्या. नितीनभाऊनं त्याला बसवलं अन् तू राजकारणात का जात नाही हे त्याच्या डोक्यात घुसवलं. झालं त्या तृतीयपंथीने नितीनभाऊंच्या सल्ल्यानं दुसऱ्याच दिवशी निवडणूक अर्ज भरला नि निवडणूक लढविली. असा हा माणूस बसल्या बसल्याच राजकारणातील गणितं बललून टाकतो. नितीनभाऊंचे असे एक ना अनेक किस्से आहेत. 
या कलंदर अन् बिलंदर माणसाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!    

५ टिप्पण्या:

  1. विकास नमस्कार खूप छान लिहिता नितीन भाऊ बद्दल खरंच वास्तविक लिहिले हा माणूस खरच वेगळा आहे तुमच्या लेखातून प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभा राहिला

    उत्तर द्याहटवा
  2. एकदा नव्हे तर तीनदा वाचले.
    लयच खास, भारी शब्दरचना.

    नितीनभाऊंना सलाम, अन, तुम्हालाही सलाम.

    नितीनभाऊ आणि तुमचे अजून इतर किस्से वाचण्यास आतुर आहो....

    उत्तर द्याहटवा
  3. नितिन पगार सारांची जेवडी तारीफ केली तेवडी कमी आहे कारण ते एकच अशे दिलखुलास वक्तिमत्व असणारे आमचे पगार सर कोणत्याही गोष्टीची अडचण असल्यास मला कॉल करा असे म्हणणारे लोक खूप कमी असतात.पण मला जेव्हापन अडचण आली तेव्हा सरांना फक्त एक कॉल केला आणि सर माझ्यासाठी धावून आले हे माझं खूप मोठं भाग्य समजतो जेव्हापन त्यांचा साठी काही करण्यासाठी संधी आली तर मी नक्कीच काही तरी करणार सरांना वाढदिवसाच्या खूप खप शुभेच्छा..👍🎂

    उत्तर द्याहटवा
  4. गोपाल व्यास मी माझं मत मांडले वरती

    उत्तर द्याहटवा