बुधवार, १५ फेब्रुवारी, २०१२

नाट्य़कलावंतांचा मेळावा की 'नाटकं'?

नुकताच कारंजा येथे अखिल भारतीय मराठी नाट्य़ परिषदेचा नाट्य़ कलावंताचा मेळावा पार पडला. उपेक्षित आणि ग्रामीण भागातील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी अशा प्रकारचे मेळावे होणे आवश्यकच आहे. पण, कारंजा येथील मेळावा या उद्दिष्टापासून भरकटल्याचे दिसले. यामध्ये नियोजनाचा अभाव तर होताच शिवाय हा नाट्य़कलावंत मेळावा आहे की स्त्रियांनी नटावं, पाककलेत निपूण व्हावं, चूल नि मूल याच द्रुष्टचक्रात गुरफटून राहावं याचा संदेश देणारा कार्यक्रम, असे एक ना अनेक प्रश्न मेळाव्यामुळे समोर आलेत. तसेच असे कार्यक्रम घेण्यासाठी नाट्य़कलावंताचे नाव समोर करून मेळाव्याचा फार्स कशाला असेही वाटून गेले.
कला अभिव्यक्तीचं सर्वात प्रभावी माध्यम आहे. कलेमुळे संस्कृती टिकून राहते. स्वाभाविकच प्रत्येक राजवटीत आणि हरेक संस्कृतीत कलाकारांना अनन्य साधारण महत्त्व आहे. पण, कला मनुष्याचं शोषण करणारी नसावी तर मनुष्याचे रंजन व प्रबोधन करून उन्नतीचा मार्ग दाखविणारी असावी. कलेतूनच अनेक चळवळी उभ्या राहिल्यात. अनेक हुकुमी राजवटी नष्ट झाल्या. गुलामाला गुलामीची जाणीव करून देण्यासाठी कलेसारखं दुसरं प्रभावी माध्यम नाही. कलेतून सांगितलेला विचार नेत्रापर्यंत वा कानापर्यंत पोहोचत नाही तर तो थेट काळजावर गोंदविला जातो. पण, याचे भान कारंजा येथील नाट्य़कलावंत मेळाव्यात आयोजकांना राहिले नाही. या नाट्य़कलावंताच्या मेळावात पहिल्या दिवशी महिलांसाठी पुष्पगुच्छ सजावट स्पर्धा, ढोकळा डीश सजावट स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. खरं तर या स्पर्धांचा आणि नाट्य़कलेचा काय संबंध हे आयोजकच जाणे. पण, परंपरेने आणि भारतीय संस्कृतीने स्त्रियांना दिलेलं दुय्यम स्थान कायम राहावं, याच विचाराचं यामधून संप्रेषन झालं. तसं तर सर्वच संस्कृतीत स्त्रीला दुय्यम आहे. भारतीय संस्कृतीत अधिक आहे. भारतामध्ये स्त्री कायमच दलित म्हणून दळल्या गेली. पुरुषप्रधान कुटुंब व्यवस्थेत तिला विचारस्वातंत्र दिलं गेलं नाही. क्रांतीज्योती सावित्रीबाई आणि महात्मा जोतिबांच्या दूरदृष्टीने आणि कार्याने आजची स्त्री उच्च शिक्षण घेत आहे. बाबासाहेबांमुळे राजकारण व शासकीय नौकरीत तिला आरक्षण मिळाले. पण, आजही स्त्रियांकडे चूल आणि मूल याच दृष्टीने पाहिले जाते. हेच चित्र बदलण्यासाठी नाट्य़कलेतून स्त्री उन्नतीबाबत जागृती करणार्‍या कार्यक्रमांचे आयोजन करणे अपेक्षित होते. प्रसंगी परिसरातील स्त्री कलाकारांचा शोध घेण्यासाठी इतरही कार्यक्रमांचा समावेश या मेळाव्यामध्ये करता आला असता. दुर्देवाने असे झाले नाही. स्त्रियांनी फॅन्सी ड्रेस घालून सुंदर दिसावं. पदार्थांच्या डीश सजवून पुरुषांसाठी स्वादिष्ट पक्वाóो करावीत आणि घराला सुंदर करण्यासाठी पुष्पांची आकर्षक मांडणी करावी, असा संदेश देण्यार्‍या स्पर्धा या मेळाव्याच्या व्यासपीठावर पार पडल्या. या स्पर्धांचा आणि नाट्य़कलेचा तीळमात्र संबंध नाही. शिवाय परिसरातील नव्या प्रतिभेचा शोध घेऊन त्यांना संधी देण्यास हा मेळावा अपयशी ठरला. हे पुरोगामी महाराष्ट्रच आणि सुसंस्कृत कारंजावासीयांचे दुर्देवच म्हणावं लागेल.
 -विकास देशमुख 
मु. करडा, ता. रिसोड, जि. वाशीम. 
(Vikas deshmuh
 at. karada, tq. risod, dist. washim) 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा