शनिवार, ३ नोव्हेंबर, २०१८

धोंडिबा रतन झोडापे


रात्रीचे दहा-साडेदहा वाजलेले. सगळीकडे निरव शांतता. नुकताच पाऊस पडून गेलेला. रस्त्यावर ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचलेले. शहरातील हिंदू-मुस्लिमबहूल भागातील एक मंदिर. पथदिव्यांच्या मिणमिणत्या प्रकाशात मंदिराच्या पायऱ्यांवर बसून तीन ते चार म्हातारे गप्पा करत असलेले. त्यातच मंदिराचा पुजारीही. काहीच अंतरावरील कट्ट्यावर तरुण मुलांचा एक ग्रुप बसलेला. त्यातील एक दोघं स्मार्टफोनवर काहीतरी गांभीर्यानं पाहत असलेले. कुणी कानात एअरफोन टाकून गाणं ऐकत असलेला तर कुणी चॅटिंगमध्ये व्यस्त.
""अबे, ही पाह्य चिखलीची क्‍लीप.'' एका तरुणानं आपला मोबाईल दुसऱ्याकडं देत म्हटलं.
""लै हॉट हय बे..!'' उत्सुकतेनं दुसऱ्या तरुणानं फोनमध्ये डोळे खुपसत प्रतिक्रिया दिली.
याच वेळी दिवसभर सायकल रिक्षा चालवून थकलेल्या अवस्थेत एक जळकटेलला, मळकटलेला पंचवीस-तिशीतला तरुण घराच्या दिशेनं पायडल मारत जात होता. एका हातात चिलीम. डोळे ताठरलेले. बहुधा गांजा ओढत असावा. हॅण्डलला एक काळी कॅरिबॅग लटकवलेली. समोरून कोण येतंय, किती वेळ झाली याचं काहीही घेणं-देणं त्याला नव्हतं. गांजाची झिंग आणि डबक्‍यात साचलेल्या पाण्यामुळं नेमकं मंदिरासमोर रस्त्यातील खड्डयाचा अंदाज त्याला आला नाही. कॅरिबॅग उसळली. खाली पडली. त्यात मांसाचे तुकडे होते. ते मंदिरासमोर पडले. रिक्षाचालकानंही अचानक ब्रेक लावले. मांसाचे तुकडे वेचण्यासाठी तो खाली उतरला. नेमकं हेच दृश्‍य एका म्हाताऱ्यानं आपल्या जाड भिंगाच्या चष्म्यातून नजरेत कैद केलं नि ""अरं मंदिरापुढं मांस'' म्हणत आरोळी ठोकली. पुजारीही खवळला, ""बाटवलं मंदिर बाटवलं'' म्हणत आरडा-ओरड सुरू केली. ""पकडा सायाच्याले'' म्हणत म्हातारे रिक्षाचालकाच्या अंगावर धावले. तो बिच्चारा गांगरून गेला. या गोंधळामुळं तरुणांचे लक्ष मंदिराकडे गेले.
""रमश्‍या काय झालं बे तिकडं?''
""मंदिर बाटवलं म्हंते ब्बा तात्या.''
""बाटवलं?''
""च्या मायले! कोण कशाले मंदिर बाटवलं''
तरुणांचा हा संवाद सुरू असतानाच पुजाऱ्यानं पुन्हा आरोळी ठोकली, ""ओ पोरोहो, या लांड्यानं मंदिरापुढं मांस आणून टाकलंऽऽऽ''
त्याच्या या आवाजानं मंदिराजवळ असलेल्या झाडांवरील पाखरंही घाबरून एकसाथ उडाली. ""मांस? अरं, चला!'' म्हणत पोरांनी मंदिराकडे धूम ठोकली. म्हाताऱ्यांनी रिक्षाचालकाला पकडून ठेवलं.
""जाऊ द्या राजा मले, बायको लेकरं वाट पाह्यले.'' म्हणत रिक्षाचालक त्यांच्या तावडीतून सुटण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत बोलला.
तरुणांच्या घोळक्‍यानं त्यांच्या जवळ येताच त्याला लाथाबुक्‍क्‍यांनी मारायला सुरवात केली.
""विज्या नक्कीच हे गोमांस हय'' एक जण बोलला.
""काय ह्यय बे हे.. कुठून आणलं?'' रिक्षाचालकाचे मानगूट पकडत दुसऱ्यानं इचारलं.
""नाई ह्यो गोमांस नाई.'' रिक्षाचालक विनवनी करीत पुन्हा बोलला.
""त्याले कायले इचारतं'' म्हणत अन्य एकाने पुन्हा त्याला लाथाबुक्‍या मारायला सुरवात केली.
""थांब मी राजूअण्णाले फोन लावतो'' म्हणत एकजण बाजूला झाला. त्यानं फोन लावला. ""अण्णा, पटकन गाडी घेऊन या! मंदिरापुढं एका लांड्यानं गोमांस टाकलं,'' असं सांगत त्यानं फोन कटही केला. रिक्षाचालक त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होता. पण, तरुणांचं टोळकं ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हतं. काहीच वेळात दहा-पंधरा मोटारसायकल आल्या. कुण्या गाडीवर तिघे तर कुण्या दोघे बसलेले होते. तिघा-चौघांनी रिक्षाचालकाचं बोंकाडं धरलं. त्याला जबरदस्तीने एका मोटारसायकलवर बसवून पोलिस ठाण्यात नेलं. "जय श्रीराम'चे नारे देत आताच्या आता गुन्हा दाखल करा म्हणून पोलिस ठाण्यात गोंधळ घातला. उगाच आफत नको म्हणून पोलिसांनी "एनसी' नोंदवली. कडक कारवाई केली जाईल, कत्तलखाना शोधाला जाईल, म्हणतं ठाणेदारानं त्यांची बोळवण केली. गांजाची चढलेली झिंग नि कार्यकर्त्यांचा रुद्र अवतार पाहून बिच्चारा रिक्षाचालकही आपलं म्हणणं ओरडून ओरडून सांगत अचानक गपगुमान झाला. प्रकरण पेट घेईल म्हणून पोलिसांनी रात्रभर त्याला ठाण्यातच ठेवलं. परीक्षणासाठी मांस लॅबमध्ये पाठवण्यात आलं. दुसऱ्या दिवशी अहवाल आला, "मांस हल्याचं आहे म्हणून.' लागलीच पोलिसांनी रात्रीच्या तरुणांना बोलावून घेतलं. सार्वजनिक ठिकाणी आरोग्यास घातक पदार्थ फेकल्याच्या आरोपाखाली रिक्षाचालकावर गुन्हा नोंदविला गेला. एव्हाना रिक्षाचालकाची झिंग उतरली. कुणीतरी नवसाला हल्या कापला तेच मांस दावत म्हणून तो घरी घेऊन जात होता. त्याच्यावर गुन्हा नोंदवून करून आपण खूप मोठं सामाजिक काम केल्याच्या आविर्भावात तरुण निघून गेले. दंगल होता होता थांबवली म्हणत पोलिसांनीही स्वतःची पाठ थोपटून घेतली. रिक्षाचालक भेदरलेल्या अवस्थेत ठाण्याच्या परिसरात बसून होता. काही वेळाने क्राइम रिपोर्टर आले. त्यांना त्याला नाव विचारलं. तो उत्तरला, ""धोंडिबा रतन झोडापे.''
 ■ विकास विनायकराव देशमुख
मु. करडा, पो. मोठेगाव, ता. रिसोड, जि. वाशीम.
हॅलो- 9850602275
vikas.535388@gmail.com

मंगळवार, २६ जून, २०१८

बहिणाबाई चौधरी : एक काल्पनिक कवयित्री


हिणाबाई चौधरी. मराठी साहित्यातील अजरामर नाव. धरतीले दंडवत या चौथीतील कवितेमुळे पहिल्यांदा त्यांची ओळख झाली. पुढे रेडिओ, डीडी टेनवर अधून-मधून बहिणाबाईंची गाणी ऐकायला मिळत. त्यावेळी फार काही कळत नव्हतं. तरीही त्यातील नाद, ग्रामीण बोलीतील हलके-फुलके शब्द, अगदी सहजतेनं कुठलीही जोर-जबरदस्ती न करता जुळवून आलेलं यमक. सारंच कसं कानाला मधुर वाटे. खरं सांगायच तर कवी म्हणून जर पहिल्यांदा कुणाचं नाव मला माहित झालं तर ते बहिणाबाईंचं. जसं-जसा मोठा होत गेलो तसं-तसं गावातील शिकलेल्यांकडून, शाळेतील शिक्षकांकडून कधीतरी बहिणाबाईंविषयी ऐकायला मिळे. याच काळात माझी बहीण आरतीताई कुठंही गेली तरी  माझ्यासाठी चाचा चौधरी, ‘चंपक, ‘अकबर-बिरबल अशी गोष्टींची पुस्तकं आणत होती. त्यातून वाचनाची आवड वृंद्धिगत झाली. पण, बहिणाबाई काही वाचायला मिळालीच नाही. पुढे आठवी, नववीत असताना रिसोड, अकोला आणि वाशीमला पुस्तकांच्या दुकानांत बहिणाबाईंच्या पुस्तकांचा शोध घेतला. कुठंच मिळालं नाही. पौंगाडवस्था आली तशी वाचनाची रुचीही बदलली. वि. स. खांडेकर, व. पु. काळे, गुरुनाथ नाईक यांच्यासारख्या लेखकांच्या रंजक कथा आवडायला लागल्या. सुरेश भट, ना. धों. महानोर, मंगेश पाडगावकर, प्रवीण दवणे रात्र-रात्र जागून वाचून काढले. स्वप्न पाहायचं ते वय होतं नि ही मंडळी वर्तमानाऐवजी स्वप्नच दाखवत होती. त्यामुळं त्यांच्या पुस्तकांसह ती भावत होती. शिक्षणासाठी गाव सोडलं. वाशीम गाठलं तसं मिशाबरोबरच मतंही फुटलं. स्वप्न दाखवणारं हे साहित्य फुटकळ वाटू लागलं. विज्ञानवादी साहित्यानं दृष्टीकोन बदलला. पणबहिणाबाई काही डोक्यातून जात नव्हती अन् आर. ए. काॅलेजची लायब्ररी, वाकाटक, रिसोडचं विवेकानंद इथं कुठं ती भेटतही नव्हती. अचानक एक दिवस विष्णू जोशीनं अनेक जुन्या नियतकालिकांची थप्पी रुममध्ये आणून टाकली. ती चाळता-चाळता एक जीर्ण, जागोजागी फाटलेलं पुस्तक सापडलं. ते बहिणाबाईंच्या गाण्याचं होतं. कोण आनंद झाला. अधाशासारखं वाचून काढलं. त्यातील उपमा, उपमेय, विचार यानं भारावून गेलो. त्यावर समीक्षक दृष्टीनं विचार केला तर  जाणवलं, बहिणाबाई चौधरी नावाची कुणी कवयित्रीच नाही. मग या नितांत सुंदर, इतक्या दर्जेदार कविता लिहिल्या तरी कुणी, हा प्रश्नही होताच. 


सोपानदेवांच्याच कविता 

प्रसिद्ध कवी तथा मराठीचे प्राध्यापक, अभ्यासक सोपानदेव चौधरी यांच्या बहिणाबाई या आई. सोपानदेव यांनीच त्यांच्या काही कविता बहिणाबाईंच्या नावावर खपवल्या हे माझं ठाम मत आहे.  ते कुणाला मान्य असो वा नसो. पण, बहिबाईंची गाणी या संग्रहाचे रचनाकार सोपानदेवच आहेत, असं मला वाटतं.


या आहेत शंका

बहिणाबाईंची सर्व गाणी ही देवीवर वृत्तात आहेत. यात प्रत्येक ओळीत फक्त आठच अक्षरं असतात.  मोठ्या सरावानं, कष्टानं आणि शब्द मोजून प्रसंगी कंजुसपणा करून यामध्ये लिहावं लागतं. हे काम सोपं नाही. त्यासाठी सरावाबरोबरच अभ्यासही हवा. आपण चिकित्सकपणे वाचलं तर लक्षात येईल की, भल्याभल्यांना देवीवर जमलं नाही. तिथे इतरांचं काय? मग अक्षर आेळख नसतानाही बहिणाबाईंनी देवीवरमध्ये अक्षर मोजून लिहिलंच कसं? एवढेच नाही तर बहिणाबाईंनी अनुष्टुपमध्येही लिहिण्याचा प्रयत्न केल्याचेही त्यांच्या कवितांवरून दिसते. माय ले माय म्हणता ओठले ओठ भिडे ही रचना तर फक्त भाषा विज्ञानाचा तज्ज्ञच लिहू शकतो. 
एक वेळ मान्य की या कविता बहिणाबाईंच्याच आहेत. पण, जर सोपानदेवांना (बहिणाबाईंचा प्राध्यापक मुलगा) माहिती होतं की आपल्या आईच्या कविता या खूप छान आहेत, आधुनिक आहेत (मर्ढेकरांच्या काळातच) तर त्यांनी तिच्या अगोदर स्वतःचा काव्यसंग्रह का प्रसिद्ध केला? बहिणाबाई हयात असतानाच सोपानदेवांना कवी म्हणून मान्यता मिळाली, त्यांचं नाव झालं. जेव्हा त्यांना प्रसद्धीची गरज राहिली नाही तेव्हा त्यांनी बहिणाबाईंच्या निधनानंतर आचार्य अत्रेंच्या मदतीने बहिणाबाईंच्या कवितांचा संग्रह प्रकाशित केला. तो बहिणाबाईंच्या जिवंतपणीच का प्रकाशित केला नाही. कारण त्या कविता वाचून, ऐकून बहिणाबाईंना भेटायला येणाऱ्यांची रीघ लागली असती आणि त्या कविता बहिणाबाईंच्या नाही तर सोपानदेवांच्या आहेत हे कळलं असतं, ही भीती सोपानदेवांना असू शकते. त्यामुळेच बहिणाबाई गेल्यानंतर त्यांनी तिची गाणी रसिकांसमोर आणली असावीत. 
विशेष म्हणजे बहिणाबाई या माहेर, सासर या परिसराच्या बाहेरही कधी गेल्या नाहीत. घर, शेती आणि गाव एवढंच त्यांचं अनुभवविश्व, तरीही त्यांच्या कवितेतील तत्तज्ञान थक्क करायला लावणारं आहे. एका कवितेत त्यांना गावकुसाबाहेरच्या व्यक्तींचा कळवळा येतो. तीही माणसंच आहेत, त्यांनाही हक्क आहेत, हे त्या ठामपणे सांगतात. ज्योतिष्या माझा हात पाहू नको असे सत्यशोधकी विचार मांडतात. तरीही त्या दिशेने त्यांची कृती शून्यच आहे. आपल्या गाण्यांतून चार-चौघांना समजावून सांगताना त्या व्यवस्थेवर हल्ला करत असतील तर त्यांनी अनिष्ठ रुढी, परंपरा नष्ट होण्यासाठी कृती का केली नाही; कारण हेच की ते विचार बहिणाबाईंचे नसून ते त्यांच्या शिकलेल्या मुलाचे होते. तेही गाव सोडल्यानंतर, पदवीनंतरचे. गंमत म्हणजे स्वतःच्या हातावर, कतृत्वावर विश्वास ठेवा असा उपदेश करणाऱ्या बहिणाबाईंची माझी माय सरसोतीही कविता वरील कवितेच्या विसंगत आहे. ज्योतिष्याला जे सांगितलं ते स्वतःचंच मत त्यांनी स्वतः क्राॅस केलं. ते यासाठीचं लिहिलं असावं की एक अडाणी बाई एवढं सारं कसं सांगू-लिहू शकते हे कुणी विचारलं तर त्याला गप्प करण्यासाठी माझी माय सरसोती, मले शिकवते बोली.. हे उत्तर आहेच. 
नाही म्हणायला बहिणाबाईंचं चरित्र जसं रंगवल्या गेलं तशा स्वभावानुसार संसार, घर, माहेर, सासर अशा कविताही संग्रहात आहेत. परंतु, त्यातील देवीवरची अचुकता सांभाळण्याची कसरत आणि तत्वज्ञान पाहिलं तर वाटतं की एका अशिक्षित व्यक्तीचं हे काम नाही. हे सोपानदेवांनीच लिहिलं हे नक्की. काहीही असो या कविता म्हणजे गावरान मेवाच आहेत. आचार्य अत्रेंच्या शब्दांत सांगायचं झालं तर जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल अशा बावनकशी सोन्याप्रमाणे बहिणाबाईंचे काव्य आहे, हा तर मोहोरांचा हंडा आहे.


- विकास वि. देशमुख Vikas V. Deshmukh 
करडा, रिसोड, वाशीम. Karda, Risod, Washim

रविवार, २२ एप्रिल, २०१८

बिलंदर अन् कलंदर


नितीन पगार ( Nitin Pagar )
जही आठवतं. जुलै २००२ मधील एक दिवस. मी राजस्थान महाविद्यालयात बीए फस्ट इयरला होतो. वाशीमला येऊन मला फार-फार तर आठवडा झाला होता. काॅलेजमध्ये सायकल पार्किंगच्या नावाखाली महिन्याकाठी ४० ते ५० रुपये उकळले जात होते. त्या काळात मापारीच्या टपरीवर चहाचा एक कट दोन रुपयांना तर एक प्लेट गरमा-गरमा पोहे तीन रुपयांना मिळत. एकूणच काय तर १५० रुपयांत पोरांचा महिन्याभराचा चहा-नाष्टा होत होता. त्यात सायकल पार्किंगचे ५० रुपये म्हणजे अतीच होते. या विरोधात सुरेंद्र गीते या विद्यार्थी नेत्याने काॅलेज प्रशासनाविरोधात आंदोलन केले. झाडून सगळे विद्यार्थी त्याच्या पाठीशी उभे राहिले. काॅलेज बंद पाडलं. पण, मालू सरांसमोर बोलणार कोण? सगळेच एकमेकांच्या चेहऱ्यांकडे पाहात होते. इतक्यात साउथच्या हिरोप्रमाणे नितीन पगार या युवा पत्रकाराची एमएटीवरून एंट्री झाली. सुसाट आलेल्या नितीनभाऊंची गाडी थेट मालूसरांच्या कक्षाबाहेर थांबली. जिथं खुद्द प्राचार्याची चारचाकी उभी होत नव्हती. तिथं या पठ्ठयानं आपली भंगार एमएटी मोठ्या स्टाइन उभी केली. सातशे-आठशे विद्यार्थी आवाक् झाले. नितीनभाऊनं नरजेच्या एका टापून विद्यार्थ्यांची गर्दी टिपली. गीते यांच्यावरही एक कटाक्ष टाकला अन् कवेलूच्या एका वर्गखोलीबाहेर गुलमोहराखाली बसलेल्या पाच ते सहा विद्यार्थ्यांकडे त्यांची पावलं वळली. हे विद्यार्थ्यांचं टोळकं म्हणजे माझ्याच वर्गात. (हे नंतर मला कळलं) त्यात एक किडकिडीत बांधा असलेला, काळा ठिक्कार मात्र चेहऱ्यावर तेज असलेल्या एका पोरासमोर नितीनभाऊ जाऊन थांबले. तो पोट्टा म्हणजे संदीपभाऊ ताजणे. भाऊच्या सोबत असलेल्यांनी लागलीच भाऊच्या हातात व्हिडिओ कॅमेरा दिला. टीव्ही पत्रकार आला, टीव्ही पत्रकार आला’ म्हणत आम्ही खेडवळ पोर त्यांच्या दिशेने पळालो. भाऊंनी संदीपभाऊंसमोर कॅमेरा धरला नि संदीपभाऊंनी आवेशात विद्यार्थ्यांची समस्या मांडली. कसलेल्या, मुरलेल्या नेत्यांप्रमाणे त्यांनी नितीनभाऊंना बाइट दिली. ते आवेशपूर्ण बोलणं ऐकून मालूसरही बाहेर आले अन् पार्किंग शुल्क रद्द केल्याची घोषणा केली. नितीनभाऊंच्या अनुभवी नजरेनं एवढ्या गर्दीतूनही खरा विद्यार्थी नेता हेरला. संदीपभाऊनंही अस्सल राजकारण्याप्रमाणे सुरेंद्रभाऊंचं आंदोलन हायजॅक केलं. (या कामी त्यांना नितीनभाऊंची मदत झालीच) पुढं-पुढं मी कविता लिहियला लागलो. ती कविता घेऊन झाडून सगळ्या वर्तमानपत्रांच्या पत्रपेट्यात टाकायला लागलो. लोकमतशिवाय कुणी माझी कविता छापेना. त्यामुळे स्वतः कार्यालयात जाऊन कविता देण्याचे ठरविले. थेट नितीनभाऊंच्या 'नवराष्ट्र'मध्ये गेलो. हा प्रसंग त्यांना आठवत नसेल किंवा असेल माहित नाही. पण, आॅफिसमध्ये नितीनभाऊ एकटेच बसलेले होते. त्यांनी माझी कविता घेतली. वाचली. छापू म्हणाले अन् एक ते दीड सात मला बसवून ठेवत वेगवेगळ्या कविता ऐकवत राहिले. त्यांची कवितेची आवड, कविता ऐकविण्याची स्टाइल पाहून मी त्यांचा फॅन झालो. गंमत म्हणजे त्यावेळी माझी ठेवून घेतलेली कविता नितीनभाऊनं अजूनही छापली नाही. पुढं अकोला दर्शनमध्ये मी, अतीशभाऊ आणि नितीनभाऊंनं तीन वर्षे सोबत काम केलं. आम्हा तिघांनाही त्यातून आर्थिक फायदा असा फारसा काही होत नव्हता. पण, काम करताना खूप मज्जा येत होती. नितीनभाऊंकडून खूप शिकायला मिळाले. दिवसभर आम्ही दर्शनमध्ये काम करत होते अन् रात्री मी आणि नितीनभाऊ सगळं वाशीम त्यांच्या एमएटीवरून फिरून पहाटे कधीतरी २ ते ३ वाजता आमच्या सिव्हिल लाइनच्या रुमवर झोपायला जात होतो. त्यावेळी वाशीममधील सगळे भिकारी, बेघर, मनोरुग्ण, निराश्रित, बसस्टॅण्ड, रेल्वेस्टेशनवर झोपणारे या सगळ्यांना नितीनभाऊ नावानीशी ओळखत होते अन् तेही नितीनभाऊंना ओळखत होते. काही भिकारी आपुलकीनं, मायनं नितीनभाऊंच्या हातावर चाराणे-आठाणेही ठेकवत असल्याचे मी स्वतः पाहिले. खरंच इतक्या शेवटच्या घटकापर्यंतही हा माणूस जनसंपर्क ठेवून आहे. एका भिकाऱ्याजवळ ते स्वतः बसून त्याच्यासोबत शोलेतले डाॅयलाॅग म्हणत. त्यातून भिकाऱ्याचे मनोरंजन तर होतेच होते. शिवाय त्यावेळी हा माणूस स्वतःलाही विसरून जात होता. इतका हा माणूस साधा आहे. अशातच एकदा नितीनभाऊंनं आमदार पाटणी यांच्या विरोधात 'आधुनिक मनू' या हेडिंगखाली दर्शनमध्ये बातमी छापली. त्यावेळी दर्शनमध्ये संपादक म्हणून अतीशभाऊचे नाव छापून येत होते. झालं खवळलेल्या पाटणी साहेबांनी अतीशभाऊंच्या नावानं तब्बल एक कोटी रुपयांच्या मानहानीची नोटिस पाठवली. त्याच वेळी एका आंबेडकरी कार्यकत्याच्या विरोधातही नितीनभाऊंनी झारीतील शुक्राचार्य या शीर्षकाखाली छापले. तोही दर्शन कार्यालयात आला नि इथूनच उडी मारून आत्महत्या करतो, अशी धमकी दिली. पण, याची कधी नितीनभाऊनं पर्वा केली ना आपली रोखठोक भूमिका बदलली. नितीनभाऊचं आणि माझं अनेकदा बिनसलं. भांडणही झालं. आजही अधून-मधून होतं. अनेक मुद्द्यावर आमचे मतभेद आहेत परंतु मनभेद नाही. हा माणूस मला खूप आवडतो. लहान मुलासारखं महात्मा फुले मार्केटमध्ये बसून अजूनही खोड्या करतो तर त्याच वेळी मोठ्या प्रगल्भतेने, जाबादारीनेही वागतो. असंच एकदा दर्शनमध्ये आम्ही बसलेलो असताना एक तृतीयपंथी पैसे मागायला आला. त्यावेळी नगरपालिका निवडणुका सुरू होत्या. नितीनभाऊनं त्याला बसवलं अन् तू राजकारणात का जात नाही हे त्याच्या डोक्यात घुसवलं. झालं त्या तृतीयपंथीने नितीनभाऊंच्या सल्ल्यानं दुसऱ्याच दिवशी निवडणूक अर्ज भरला नि निवडणूक लढविली. असा हा माणूस बसल्या बसल्याच राजकारणातील गणितं बललून टाकतो. नितीनभाऊंचे असे एक ना अनेक किस्से आहेत. 
या कलंदर अन् बिलंदर माणसाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!    

मंगळवार, १७ एप्रिल, २०१८

व्हॉट्‌सअॅपचे घोस्ट रायटर आहेत तरी कोण?

काहींकडे अफाट प्रतिभा असते. त्या बळावर ते उत्तोमत्तोम कथा, कविता लिहितात. त्यांच्या कथेवर चित्रपट निघतो. त्यांच्या कविता गाणं म्हणून हीट होतात. पण, या साहित्यकृतीच्या निर्मितीचे श्रेय तिच्या मूळ लेखक-कवीला मिळतच नाही. कुणी तरी बडा दिग्दर्शक, लेखक, निर्माता बक्कळ पैसे देऊन त्यांची ही कलाकृती विकत घेतो अन्‌ त्या खाली स्वतःचे नाव लावतो. हा प्रकार सिनेजगतात नवीन नाही. आपली कलाकृती विकणाऱ्या साहित्यिकाला चंदेरी दुनियेत घोस्ट रायटर म्हणतात. असेच घोस्ट रायटर सोशल मीडियामध्येही आहेत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फेसबुक, व्हॉट्‌सअॅपवर दिवसभरात नानाविविध विषयांची माहिती आपल्याला मिळते. त्यात कधी सुविचार असतात तर कधी आरोग्याबाबत काय काळजी घ्यावी, पाणी कसे प्यावे इथंपासून ते पार चीन अमेरिका, सीरियामधील घडामोडी, या सरकारमुळे अच्छे दिन कसे येणार ते अच्छे दिन येणारच नाहीत, अशा सगळ्याविषयांवर साधक-बाधक विचार, लेख आपल्याला चटक फू वाचायला मिळतात. शिवाय या लेखांच्या लेखकाला ना त्याचे श्रेय हवे असते ना ते कॉपी राइटचा दावा ठोकतात. पण कधी विचार केला का, की कुठल्याही विषयावर साधं पानभर लिहायचं तर किती संदर्भ जमा करावे लागतात, अभ्यास करावा लागतो, संबंधित विषयाच्या तज्ज्ञाला बोलून "कोट' करावा लागतो. मग कुठे त्या विषयाची मांडणी करायला सुरवात होते. परंतु, घटना घडते अन्‌ तास-दोन तासात तिचे संदर्भासहीत विश्‍लेषण फेसबुक, व्हॉट्‌सअॅपवर व्हायरल होते. हे कसं शक्‍य आहे? हे छोटे मोठे लेख लिहिते तरी कोण? कोण आहेत हे घोस्ट रायटर? त्यांचा हेतू काय आहे, याचा आपण शोध न घेताच आपल्याला आवडलेले लेख. माहिती शेअर-फॉरवर्ड करतो.

विशिष्ट हेतूने लेखन 
विविध राजकीय पक्ष, विचारधारेच्या संघटना, जनसंपर्क क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, कंपन्या, जाहिरात एजन्सी हे विशिष्ट हेतूने काम करतात. जन माणसांवर प्रभाव पाडून आपल्याला हवा तसा बदल घडवून आणणे हा त्यांचा मुख्य उद्देश असतो. त्यासाठी त्यांचे स्वतःचे आयटी सेल आहेत. कर्मचारी आहेत. या माध्यमातून आपल्या विचारांचा, कार्याचा आणि उत्पादनाचा प्रचार करण्यासाठी ते या अटी सेलमधील कर्मचाऱ्यांना कामाला लावतात. प्रसंगी विरोधकांच्या उणिवा शोधून त्यावरही लिहिले, दाखविले जाते. या सेलमधील कर्मचाऱ्यांना तत्काळ हवे ते संदर्भ मिळावेत यासाठी त्यांच्याकडे व्हिडिओ, ऑडिओ आणि ई पुस्तकांची लायब्ररी आहे. गरज पडल्यास ते यू ट्यूब, न्यूज पोर्टल यांचाही संदर्भ घेतात. विषयानुसार एक व्यक्ती संदर्भ उपलब्ध करून देते तर दुसरी व्यक्ती त्याच वेळी त्या विषयावर लेख लिहिते किंवा व्हिडिओ-ऑडिओ तयार करते. त्यामुळे कमी वेळात लेख तयार होतो. ट्विटरवरील टॉप 10 हॅशटॅग पाहिले तर त्यातील सात ते आठ हे एखाद्या राजकीय पक्षाने किंवा ऍड कंपनीने चालविले कॅम्पेन असते. त्यामुळे राजकीय विश्‍लेषण असो, की हलका फुलका विनोद त्यातून बहुतांश वेळा कुठल्या तरी एका विचारधारेचा प्रसारच केलेले दिसतो.

आपला वापर होऊ देऊ नका 
विशिष्ट विचारसरणीचे लोक आपले विचार लादण्यासाठी सोशल मीडियातून अफवा पसरवितात. त्यातून कधी निष्पाप मोहम्मद अखलाकचा जीव जातो तर कुणाची बदनामी होते. काही उत्पादक तर आपल्या प्रतिस्पर्धींना मात देण्यासाठी या एका कंपनीच्या शीतपेयात एचआयव्हीचे विषाणू आहेत तर पिठात प्लॅस्टिक आहे असेही मेसेज ऑडिओ, व्हिडिओ व टेक्‍समधून व्हायरल करतात. बऱ्याच वेळा त्याला टीव्ही, प्रिंट मीडियाही बळी पडतो. सोशल मीडियावरील अफवेला खरे मानून नोटाबंदीतच्या काळात दोन हजाराच्या नोटेत चीफ असल्याची बातमी सगळ्या टीव्ही चॅनल आणि वतर्मानपत्रांनी दिली होती. काही वाहिन्यांवर तर या विषयावर तास-तास भर चर्चाही झाली होती. एकूणच काय तर फुटतात मिळणाऱ्या मेसजचे सर्व घोस्ट रायटर हे एकाच विचारसरणीने प्रेरित झालेले असतात. त्यांची मते व्हायरल करण्यास आपणही कळत-नकळत हातभार लावतो. पण त्यातून समाजविघातक विचारांना बळ तर मिळत नाही ना याचा विचार कुठलीही पोस्ट फॉरवर्ड किंवा शेअर करताना करणे आवश्‍यक आहे.

                                                                                        - विकास वि. देशमुख 
                                                                                          करडा, ता. रिसोड, जि. वाशीम.
                                                                                         Vikas V. Deshmukh
                                                                                          Karda, Tq Risod,, Dist Washim

रविवार, २५ जून, २०१७

धन्य तो अभ्यासक्रम.. धन्य आपली शिक्षणव्यवस्था

दुसर्‍या वर्गात आम्हाला कविता होती, 'गोरी गोरी पान, फुलासारखी छान.. दादा मला एक वहिनी आण..' एका तालात सुरात गुरुजी आमच्याकडून ती म्हणून घेत. या कवितेमुळे आमच्या बालमनावर वर्णद्वेशाचे संस्कार झाले. मग आम्ही आमच्या काळ्या मित्र-मैत्रिणींना त्यांच्या रंगावरून चिडवत असू. पुढे चाैथीत गेलो. शिवाजीचा इतिहास अभ्यासाला आला. शिवाजी महाराज अफजल खानाचा कोथळा बाहेर काढतानाचा एक फोटो त्यात छापलेला होता. यासह मराठा आणि मोगलांच्या लढाईचे प्रसंग दाखविणारे इतर फोटोही होते. ते पाहून आम्हाला शत्रू म्हणजे केवळ अन् केवळ मुसलमान असंच वाटत होतं. मग काय फोटोतील दाढीवाल्यांचा चेहरा आम्ही पेनानं घोटून-घोटून फाडून टाकत असू. रिसोडला तालुक्याच्या ठिकाणी वडलांसोबत कधी गेलोच आणि तिथे तसा दाढीवाला दिसला की तोही शत्रूच वाटे. एकूणच काय तर शैक्षणिक पुस्तकांतून वर्णद्वेश, धर्मद्वेश, अंधश्रद्धा याचेच अप्रत्यक्ष 'धडे' मिळाले. धन्य तो अभ्यासक्रम आणि धन्य आपली शिक्षणव्यवस्था..

गुरुवार, २२ जून, २०१७

ज्ञानेश्वर माउली याचं उत्तर कुठे शोधू ?

ज्ञानदेवांनी विठूला स्पृश्य-अस्पृश्याच्या दलदलीतून मोकळं करण्यासाठी बंड केला. या दलदलित लोकशाहीचं बीज पेरण्याचं काम केलं. प्रसंगी लेखणीला तलवार करून अनिष्ट रुढी परंपरेवर आसूड आेढले. गवळणींच्या विरहातून जगण्याकडे रसिकेने पाहायला शिकवले. माउली प्रतिभेचे धनी होते. समाजातील विषमता, शोषण यांची त्यांना जाणीव होती. पण, एवढ्या प्रतिभासंपन्न प्रगल्भ, आशावादी, रसिक माणसानं एकाएकी अन् तेही एेन तारुण्यात खरंच समाधी घेतली असेल? की पानसरे-दाभोळकरांप्रमाणे त्यांचाही 'तुकाराम' केला गेला असेल? माउली तुमचा अतोनात छळ झाला, हे सांगितलं जातं. मात्र, त्यानंतर नेमकं काय झालं हा विचार अस्वस्थ करतो. निश्चितच ज्याला भाबडे वारकरी समाधी म्हणतात ती आत्महत्या करणारे पळपुटे तुम्ही नव्हता. तुम्ही निडर होता. याचे संदर्भ आजही तुमच्या आेवीत आहेत.

शनिवार, १७ जून, २०१७

शेतकरी संप

शेतकरी संपाच्या मागे विरोधक असल्याचा अारोप सत्ताधारी अाणि त्यांचे समर्थक करत होते. त्यात पूर्णत: नव्हे पण 'तत्वत:' तथ्य अाहे. पण, अाता सत्ताधार्‍यांनी केलेली कर्जमाफीची घोषणा अाणि शेतकर्‍यांप्रति यापूर्वी ओकलेली गरळ यामुळे अापसुकच कर्जमाफीचे श्रेय 'पूर्णत:' विरोधकांकडे जाते. पवारांनी शेतकरी संपाची गुगली टाकली, असे ओरडून अाणि पोस्टी फिरवून भाजपनेच महाराष्ट्रभर उर बदडवून घेतला. शिवाय ते तिला नो बाॅल नो बाॅलही म्हणत होते. परंतु, फडणवीसांना त्याच गुगलीवर तूर्त तरी बोल्ड व्हावे लागले. एकप्रकारे भाजपमुळेच कर्जमाफीचे श्रेय विरोधकांना मिळाले अाहे. मात्र, शेतकर्‍यांनी हुरहुरूळून जाण्याची गरज नाही. 'तत्वत:' या शब्दांअाड कायदेशीररीत्या असंख्य पळवाटा अाहेत. त्यामुळे पूर्णत: कर्जमाफी होईल की नाही याची शास्वती नाही. तोपर्यंत सरकारच्या विरोधात असेच जोरकसपणे लगे रहो! कारण विरोधक अाणि सत्ताधारी भाई-भाईच अाहेत. खरा विरोधी पक्ष सोशल मीडियाच अाहे.

जाहीर कबुली

र्ष २००० मध्ये गावातीलच शाळेतून ६५.२० टक्के घेऊन दहावी पास झालो. त्याचा ना अनंद झाला ना दुःख. बस आला दिवस गेला दिवस असेच होते; कारण यातील एकही गुण मनाने लिहून मिळवलेला नव्हता. सरसगट नवनित अपेक्षित मधून पाहून लिहिले. त्यातही नसले की काॅपीवर लक्ष ठेवण्यासाठी असलेले शिक्षकच फळ्यावर लिहून देत. पण, काॅपी करून गुण मिळविले हा माझा अवगुण नव्हता. आमच्या शाळेची, गावाची, परिसराची एवढेच नाही; तर तालुक्याची ती परंपरा होती. तिचा मी पाईक झालो. खुद्द आमच्या भागातील तत्कालीन आजी-माजी आमदार सुरळीतपणे काॅपी सुरू आहे का, हे पाहायला येत. काॅपी करू द्या, अशा सूचना केंद्रप्रमुखांना करत. कधी आलेच तर शिक्षण विभागाचे अधिकारी येत; तेही हाच कित्ता गिरवत पार्टी झोडून परत जात. पुढे तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्यातल्या नामांकित एका कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला. शाळा नावाजलेली. दरवर्षी ४ ते ५ विद्यार्थी मेरीट येत. (यात शिक्षकांची मुलं किंवा त्यांचे नातेवाईकच अधिक) परंतु, तिथेही तेच. फक्त काॅपी करण्याची पद्धत शिस्तबद्ध. या ठिकाणी ९० टक्के गैरमार्ग आणि १० टक्के मनाने लिहून बारावीची परीक्षा दिली. ५९ टक्के मिळाले. त्यानंतर पदवीसाठी जिल्हा ठिकाणी गेलो. काॅलेज एकदम कडक. आजूबाजूला शहरी मुलं. झालं आत्मविश्वास गमावला. बीएच्या पहिल्याच वर्षी नापास झालो. कशीतरी एटीकेटी मिळाली. मग 'चादडली' पदवी मिळविण्यासाठी तब्बल साडेपाच वर्षे लागले. ते केवळ अन् केवळ गावाकडे असलेल्या शिक्षणाच्या खेळखंडोब्यामुळेच. 

सोमवार, २९ जून, २०१५

प्रसंग दुसरा

अकोला शहरातील एक उच्चभ्रू वस्ती. त्या वस्तीतील एक पॉश घर. दारापुरे फाटक. फाटकाआड चारचाकी. घरातील सर्वच उच्चशिक्षित. बाजूलाच चहा टपरी. वेळ सकाळी ८ ते ९ च्या सुमाराची. टपरीवरील बाकावर कृषी विद्यापीठातील मुला-मुलींचा गलका सुरू. त्या घरापुढं एक गाय आली. तिनं फाटकाला डोकं घासलं. सुरुवातीला वाटलं तिच्या डोक्याला खाज सुटली असेल. पण, असंच तिनं दोन ते तीन वेळा केलं. बहुदा ती येथं रोजच येत असावी. बाहेर कुणी तरी आलंय याची चाहूल लागताच घरातील गृहिणीनं अर्धवट दार उघडून डोकावलं. लागलीच आत गेली. कडेवर दीड ते दोन वर्षांच्या मुलाला घेऊन बाहेर आली. हाती पोळी. फाटक उघडलं. चिमुलल्याचं डोकं गायीच्या डोक्यावर ठेवलं नि स्वत:ही तसाच नमस्कार केला. गायही लाडावली. त्या गृहिणीच्या हाताला चाटू लागली. तिनं तिच्या तोंडात पोळी भरवली. पोळी खाताच गायीनं चिमुकल्याच्या हातालाही चाटायला सुरुवात केली. तो घाबरला. परंतु, त्याची आजी की आणखी कोण असलेल्या त्या बाईंनी “काही नाही गो माताहे” म्हणत त्याचा हात ओढून गायीच्या तोंडापुढं नेला. चिमुकल्याला आता गुदगुदल्या होत होत्या. त्याला मज्जा वाटत होती. जनावर आणि मुनष्यातील हे प्रेम भारावणारचं होतं. पण, अचानक त्या ठिकाणी एक ७० ते ७५ वर्षांचा म्हातारा आला. दाढी वाढलेली. फाटके कपडे. डोळे खोपडीला भिडलेले. चालायचाही त्राण त्याच्या शरिरात नव्हता. तो गेट पुढं येऊन उभा राहिला तसे गृहिणीच्या चेहऱ्यावरील भाव बदलेले. “दान धरम करा काही तरी..” आपल्या हातातील मळकटलेली पिशवी पुढं करत अत्यंत विणवणीच्या स्वरात तो बोलला. गृहिणी काहीच बोलली नाही. पहिल्या वाक्याला जोडूनच म्हाताराच्या तोंडून दुसरं वाक्य बाहेर पडलं. “रातचं उरलेलं शियं-पाकं बी चालंल..” आता मात्र गृहिणी खवळली. “जा समोर, रोजच येतात मेल्ले ! काम करायचा कंटाळा आणि चालले भीक मागायला. चल निघ येथून.” असं म्हणत तिनं त्या वृद्धाला हाकलून दिलं. फाटक बंद करून आत गेली. वृद्ध चहा टपरी जवळ येऊन थांबला. पाच-दहा मिनिटं तिथंच रेंगाळला. त्याच्या मनातील घालमेल चहा पीत असलेल्या एका मुलानं ओळखली. “ओ संगीतबापू या बुढ्याले पोहे आन एक कटिंग दे जा.” असं म्हणत त्यानं आपल्या बिलासह त्या म्हाताऱ्याचेही बिल पे केलं नि मित्रांसोबत निघून गेला. गाय अजूनही फाटकाला डोक घासत होती. दरम्यान, पुढच्या घरातील एक गृहिणी हाती पोळी घेऊन बाहेर आली. तिला पाहाताच गायीनं आपला मोर्चा तिकडं वळवला…
- विकास विनायकराव देशमुख

मु. करडा, ता. रिसोड, जि. वाशीम 
Vikas Deshmukh Karda, Tq Risod, Distt Washim
   

प्रसंग पहिला

रात्रीची १० ते साडे दहाची वेळ. नुकताच पाऊस पडून गेलेला. रस्त्यावर ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचलेले. अकोला शहरातील हिंदू-मुस्लिमबहूल भागातील एक मंदिर. महापालिकेच्या पथदिव्यांचा मनमिणत्या प्रकाशात मंदिराच्या पायाऱ्यांवर बसून दोन ते तीन म्हातारे गप्पा करत असलेले. त्यातच मंदिराचा पूजारीही. दिवसभर सायकल रिक्षा चालवून थकलेल्या अवस्थेत एक जळकटेलला, मळकटलेला ५५ ते ६० वर्षांचा वृद्ध घराच्या दिशेनं पायडल मारत जात होता. एका हातात चिलम, डोळे रस्त्याच्या दिशेनं. बहुदा गांजा ओढत असावा. हॅण्डलला एक काळी कॅरीबॅग लटकवलेली. समोरून कोण येतंय, किती वाजलेत याचं काहीही देणं घेणं त्याला नव्हतं. गांजाची झिंग आणि डबक्यात साचलेल्या पाण्यामुळं नेमकं मंदिरासमोर रस्त्यातील खड्डयाचा अंदाज त्याला आला नाही. कॅरिबॅग उसळली. खाली पडली. त्यात मांस होते. रात्री मुला-बाळांची सोय म्हणून तो घेऊन जात असावा. पण, नेमकं हेच दृश्य मंदिरासमोरील एका म्हाताऱ्यानं आपल्या जाड भिंगाच्या चष्म्यातून नरजेत कैद केलं नि “अरं मंदिरापुढं गोमांस आणून टाकलया” म्हणत गलका केला. वातावरण टाईट झालं. पुजारीही खवळला. लागलीच हिंदूत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आले. त्यांनी रिक्षा चालकाचं बोंकाड धरलं. त्याला पोलिस ठाण्यात नेलं. जय श्रीरामचे नारे देत आताच्या आता गुन्हा दाखल करा म्हणून गोंधळ घातला. उगाच आफत नको म्हणून पोलिसांनी ‘एनसी’ नोंदवली. कडक कारवाई केली जाईल, कत्तलखाना शोधाला जाईल, असं म्हणतं कार्यकर्त्यांची बोळवण केली. गांजांची चढलेली झिंग नि कार्यकर्त्यांचा रुद्र अवतार पाहून बिच्चारा रिक्षाचालकही आपलं म्हणणं ओरडून ओरडून सांगत अचानक गप गुमान झाला. प्रकरण पेट घेईल म्हणून रात्रभर त्याला ठाण्यातच ठेवलं. मांस परीक्षणासाठी लॅबमध्ये पाठवण्यात आलं. दुसऱ्या दिवशी अहवाल आला, मांस कोंबडीचं आहे म्हणून. लागलीच कार्यकर्त्यांना बोलावून घेतलं. पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला. सार्वजनिक ठिकाणी आरोग्यास घातक पदार्थ फेकल्याच्या आरोपाखाली रिक्षा चालकावर गुन्हा दाखल केला. एव्हाणा त्याची झिंग उतरली. कुणीतरी नवसाचं कोंबडं कापलं तेच मांस तो घरी घेऊन जात होता. त्याच्यावर गुन्हा दाखल करून आपण खूप मोठं सामाजिक काम केल्याच्या अविर्भावात कार्यकर्ते निघून गेले. दंगल होता होता थांबवली त्यामुळं पोलिसांनीही पाठ थोपटून घेतली. रिक्षा चालक भेदरलेल्या अवस्थेत ठाण्यातच बसून होता. काही वेळाने क्राइम रिपोर्टर आले. त्यांनी रिक्षा चालकाला नाव विचारले. तो उत्तरला, “संपत दगडू इंगळे…”
 
-विकास विनायकराव देशमुख
Vikas Deshmukh
Karda, Tq Risod, Distt Washim

रविवार, २२ फेब्रुवारी, २०१५

प्रख्यात दिग्दर्शक राबतोय काळ्या मातीत! कलावंत लीलाधर सावंत करताहेत शेती


 ‘सागर’,‘सलाखे’, ‘क्रांतिवीर’, ‘शहंशाह’ ‘मैं खिलाडी तू अनाडी’, ‘अनाडी’, ‘१०० डे’ सारख्या चित्रपटांमधून बॉलीवूडमध्ये अधिराज्य गाजवणाऱ्या १७७ चित्रपटांसह हॉलीवूडच्या चार चित्रपटांचे कला दिग्दर्शक असलेले लीलाधर सावंत चित्रपटसृष्टीतील एक बडी आसामी. या क्षेत्रातील फिल्मफेअर सारखा उच्च पुरस्कार मिळवणारा हा अवलिया सध्या वाशीम जिल्ह्यातील जउळका रेल्वे (ता. मालेगाव) या एका छोट्याशा खेड्यात काळ्या मातीत राबत आहे. लख्ख चंदेरी दुनियेला सजवून राष्ट्रीय पुरस्कारावर आपले नाव कोरणारा हा कलावंत आता धरणीमातेला कोरत आपला आनंद शोधत आहे.

दैनिक दिव्य मराठीमध्ये आलेले वृत्त
177 हिंदी आणि हॉलीवूडमधील चार इंग्रजी चित्रपटांचे कला दिग्दर्शन करणाऱ्या लीलाधर सावंत (५८) यांचा वर्ष १९८८ मध्ये ‘हत्या’ या चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्काराने गौरव झाला. दरम्यान, ‘कामचोर’साठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. लखलखी चंदेरी दुनियेला सजवणारे सावंत यांचे हात आता शेतात राबत आहेत. कोणत्याही चित्रपटातील ‘आॅलराउंडर’ व्यक्ती म्हणजे कला दिग्दर्शक. वेशभूषा, कथा, प्रसंग, काळ, वेळ, दिग्दर्शन, अभिनय, संगीत या सर्वस्पर्शी कलेला एकरूप करून चित्रपटाला वास्तववादी बनवण्यासाठी ती राबत असते. सावंत यांनीही याच क्षेत्रासाठी आपले आयुष्य वाहून घेतले होते. ते मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील. बीएफए झाल्यानंतर कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी त्यांनी सैन्यदलात नोकरी पत्कारली. पाचच वर्षांत राजीनामा देऊन मुंबई येथील एका कंपनीत सुरक्षा अधिकारी म्हणून कामाला लागले. याच कंपनीत जउळका येथील पुष्पा देशमुख नोकरीला होत्या. ३७ वर्षांपूर्वी त्यांच्याशी त्यांंचा प्रेमविवाह झाला. सावंतांच्या घरची परिस्थिती बेताचीच तर पुष्पा यांच्या वडिलांकडे ‘देशमुखी’. त्यातल्या त्यात आंतरजातीय लग्न. त्यामुळे या लग्नाला तीव्र विरोध झाला. आपल्या चित्रकलेच्या आवडीतून त्यांनी ही नोकरीही सोडून अत्यंत कमी पैशात पोस्टर्स रंगवण्याचे काम सुरू केले. यातून त्यांना आर. बर्मन यांनी ‘बेताब’ची हवेली बनवण्याचे काम दिले. पुढे ते इप्टा नाट्य संस्थेचे सेट मोफत करून देत. या काळात सलग तीन वर्षे सहायक कला दिग्दर्शक म्हणून त्यांनी तब्बल ४०० हिंदी चित्रपटांत काम केले. पुढे त्यांना मुख्य कला दिग्दर्शक म्हणून ‘बॉक्सर’ हा चित्रपट मिळाला. तेव्हापासून ते वर्ष २००८ पर्यंत त्यांच्या अनेक चित्रपटातील कला दिग्दर्शनाचा आलेख वाढत राहिला. सैन्यदल, सुरक्षा अधिकारी, पोस्टर रंगवणे, सेट तयार करणे, सहायक कला दिग्दर्शक अशा वेगवेगळ्या भूमिका समर्थपणे वठवत कला दिग्दर्शक म्हणून उंची गाठलेल्या सावंतांना अचानक ही ‘भूमिका’ सोडावी लागली आणि अनपेक्षित एक्झिट घेत त्यांनी एक खेडं गाठून नवीन भूमिका स्वीकारली.
‘पनाह’ची केली निर्मिती
सावंत हे ‘पनाह’ या चित्रपटाचे निर्माता आहेत. या चित्रपटात नसरुद्दीन शहा मुख्य भूमिकेत आहेत. आता ‘वासुदेव’ या कलात्मक मराठी चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
..
मराठीसाठी काम करता आले नसल्याची खंत
आपण मराठी असूनही एकाही मराठी चित्रपटासाठी काम करता आले नसल्याचे शल्य सावंत यांना अजूनही बोचत आहे. हिंदीतील कला दिग्दर्शक जास्त खर्च करायला लावतात, याच एका कारणाने आपल्याला मराठी चित्रपटांचे काम मिळाले नसावे, असे ते सांगतात.
कॅन्सर रुग्णालय सुरू करणार
जउळका रेल्वे येथे सर्व अद्ययावत कॅन्सर रुग्णालय सुरू करण्याची योजना सावंत दाम्पत्याने आखली आहे. यात गरीब रुग्णांवर अत्यंत माफक दरात उपचार केले जातील. त्यासाठी जागासुद्धा निश्चित झाली असून, लवकरच या कामास सुरुवात होणार आहे.

का सोडली चंदेरी दुनिया?
विशालहा सावंत यांचा एकुलता एक मुलगा. त्याने अनेक चित्रपटांत बालकलाकार म्हणून काम केले. त्याचा कर्करोगाने मृत्यू झाला. हे दु:ख सावंत दाम्पत्य सहन करू शकल्याने त्यांनी चंदेरी दुनिया सोडून जउळका रेल्वे गाठत शेती कसणे सुरू केले.
यांचा स्वभाव लहरी
लीलाधरहे सतत नवीन काही तरी करत असतात. त्यांचा स्वभाव प्रचंड लहरी आहे. एकवेळ त्यांनी घरात विषारी साप पाळण्यासाठी आणले. पण, वन विभागाने परवानगी नाकारली. नंतर ते जंगलात सोडले.- पुष्पा सावंत
----


विकास वि. देशमुख
करडा, रिसोड, वाशीम

 (Vikas V. Deshmukh, Karda, tq. Risod, dist Washim)

बुधवार, १२ फेब्रुवारी, २०१४

साहित्य क्षेत्रातील ‘एकलव्य’च !

गाव -खेड्यात कसदार लिखाण करणारे अनेकजण आहेत, पण योग्य मार्गदर्शन, व्यासपीठाचा अभाव यामुळे त्यांचे साहित्य समाजासमोर येतच नाही. स्वाभाविकच फुलण्याआधीच त्यांच्यातला साहित्यिक कोमेजून जातो. हे टाळण्यासाठी वाशीम जिल्ह्यातील रिसोड या आडवळणाच्या गावात चाफेश्वर गांगवे या केवळ
साहित्यासाठी जगणाºया युवकाने जून 2000 मध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी साहित्य चळवळ उभी केली.
रिसोडच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय पहिल्या साहित्य
संमेलनाचे अध्यक्ष होते कवी कैलास भाले या चळवळीचे सदस्यसुद्धा चाफेश्वरप्रमाणेच काव्यवेडे,
साहित्य रसिक, कुणाचेही मार्गदर्शन नसलेले, ध्येयासक्त. या सगळ्यांनी मिळून आपल्या संघाला ‘एकलव्य’ हे दिले. आपल्यासारख्या समवयस्क साहित्यिकांचे कौतुक व्हावे, त्यांना प्रेरणा मिळावी, या हेतूने सलग पाच वर्षे राज्यस्तरीय काव्य स्पर्धा घेतली. त्यासाठी ‘एकलव्य’ला अश्व प्रकाशनाचे संचालक राजा वाठोरे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. या स्पर्धेला महाराष्टÑभरातून उदंड प्रतिसाद मिळाला. स्पर्धेतून पहिल्या येणाºया तीन कवींच्या कवितेला ‘एकलव्य राज्यस्तरीय काव्य पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. त्यासाठी रिसोड येथेच दोन दिवसीय राज्यस्तरीय साहित्य संमेलन घेण्यास सुरुवात केली. एकलव्यच्या पहिल्या
संमेलनाचे अध्यक्ष जालना येथील कवी कैलास भाले होते. अकोल्याचे साहित्यिक सुरेश पाचकवडे हे दुसºया
संमेलनाचे अध्यक्ष होते. पुढे भगवान ठग, शेषराव पिराजी धांडे, रा. मु. पगार यांसारख्या दिग्गजांना एकलव्यच्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान
मिळाला. 
यंदा पुन्हा एकलव्यला उभारी देणारी
दरम्यान, दोन प्रातिनिधिक काव्यसंग्रहसुद्धा प्रकाशित केले. हे करत असताना मुख्य अडचण होती ती आर्थिक. मात्र, शिवाजी शिक्षण संस्थेने प्रत्येक साहित्य संमेलनासाठी आपले सभागृह मोफत उपलब्ध करून दिले. शिवाय संमेलनाला लाभलेल्या स्वागताध्यक्षांनीही आर्थिक मदत केली. मागील दोन वर्षांपासून रिसोडमध्ये एकलव्यचे साहित्य संमेलन झाले नाही, परंतु या वर्षी पुन्हा नव्या जोमाने एकलव्यला उभारी देण्याचे या संघाच्या सदस्यांनी ठरवले आहे. येत्या काही महिन्यांतच आठवे राज्यस्तरीय साहित्य संमेलन भरवण्याचेही नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे. एकलव्यच्या जडणघडणीत विष्णू जोशी, ग. ना. कांबळे,
प्रमोद तुरेराव, केशव गरकळ, दत्ता शेळके, सतीश अवचार, वसंता जुमडे, प्रकाश धांडे, विठ्ठल सरनाईक यांचेही योगदान आहे. 
एकलव्यमधून ख्यातकीर्त झालेले नवोदित
एकलव्यला नवोदित आणि प्रस्थापित हा भेदच मान्य नसल्याचे या संघातील प्रत्येक सदस्य सांगतो. साहित्य लिहिण्यासाठी लिखाणाचा अनुभव नव्हे तर प्रखर सामाजिक जाणीव हवी असते हेच एकलव्य साहित्य संघाचे सूत्र आहे. आपल्या पहिल्याच काव्यसंग्रहाने नामदेव ढसाळ, नारायण कुळकर्णी कवठेकर हे कवी महाराष्टÑाचे लोकप्रिय साहित्यिक झालेत, हे जाणकारांना माहीत आहे. कवी अनिल कांबळे यांचा ‘झोपडी
नंबर बारा’ हा कवितासंग्रह येण्यापूर्वीच नियतकालिकांच्या माध्यमातून ख्यातकीर्त कवी म्हणून त्यांची ओळख झाली, अशी उदाहरणे एकलव्यचे सदस्य आवर्जून सांगतात. म्हणून त्यांना कुणी नवोदित साहित्यिक म्हटलेले आवडत नाही. या चळवळीमुळे केवळ रिसोड परिसरातच नव्हे तर वाशीम जिल्ह्यातील साहित्य चळवळीला गती आली. साहित्य क्षेत्रात एकलव्यचे योगदान मोठेच आहे.
- विकास देशमुख, वाशीम
Vikas Deshmukh, Karda, Risod, Washim

आदिम झाले आता ई-आदिम

रानटी अवस्था संपली. माणूस व्यक्त व्हायला लागला. उत्तरोत्तर प्रगत झाला. हा आदिम इतिहास आपल्याला माहिती आहे तो चित्र, शिल्प आणि साहित्य या आपल्या ‘आदिम’ कलेमुळेच. हाच धागा पकडून जागतिक कीर्तीचे ख्यातकीर्त चित्रकार श्रीधर अंभोरे यांनी अहमदनगर येथून वर्ष 1979 मध्ये ‘आदिम’ हे नियतकालिक सुरू केले होते. चित्र, काव्य, कथा आणि ललित यांचे मिश्रण आदिममध्ये होते. त्यामुळेच ‘आदिम’ मराठी साहित्यात माइल स्टोन ठरले. ऐंशीच्या दशकातील साहित्याला ऊर्जित करून 1982 मध्ये आदिम बंद झाले. मधल्या 30-35 वर्षांत माध्यमांत बदल झाला, पण आदिम कला आहेत त्याच आहेत. याच कला येणार्‍या कैक पिढ्यांसाठी संदर्भ ठराव्यात आणि सकस, अभिजात साहित्य लिहिणार्‍यांना प्रेरणा मिळावी, या उद्दात्त हेतूने मराठीतील सिद्धहस्त गझलकार डॉ. श्रीकृष्ण राऊत यांनी अकोला येथून जानेवारी 2014 पासून ‘ई-आदिम’ सुरू केले. या ई आदिमचे स्वरूप पूर्वी होते तसेच आहे. फक्त कागदांच्या जागी संगणकाची स्क्रीन आहे. त्यासाठी राऊत यांनी अथक परिश्रम घेऊन आकर्षक ब्लॉग तयार केला. अल्पावधीत त्याला उदंड प्रतिसाद मिळत आहे. आता डॉ. राऊत त्याचे कार्यकारी संपादक आहेत. राजन खान यांच्या हस्ते लोकार्पण झाले.

‘आदिम’चा इतिहास

चित्रकार अंभोरे यांनी 1979 मध्ये ‘आदिम’ची सुरुवात केली. त्यावेळी ते आदिमचे कार्यकारी संपादक होते. सदशिव अमरापूरकर, प्रा. वसंत दीक्षित, चंद्रकांत पालवे आणि प्रा. वि.रा. दीक्षित यांचा संपादकीय मंडळांत समावेश होता. प्रसिद्ध कादंबरीकार भालचंद्र नेमाडे हे आदिमचे पहिले वर्गणीदार. पुढे अमरापूरकर यांनी नाट्यक्षेत्रातील अनेकांना आदिमचे वर्गणीदार करून घेतले. 1979-82 या काळात आदिमचे एकूण 33 अंक निघाले. त्यामध्ये तीन दिवाळी अंकांचाही समावेश आहे. अंभोरे हे त्या काळात -चक्रमद्रांकित (सायक्लोस्टाइल) : स्वरुपात आदिम काढायचे. पूर्ण अंक पेन्सिलवर हाताने लिहून अंक काढावा लागे. हे काम प्रचंड मेहनतीचे होते. ऑफिसमध्ये कागदांना टॅग बांधण्याकरिता छिद्र पाडण्यासाठी टोच्या असतो. त्या टोच्याचा उपयोग करून अंभोरे पेन्सिलवर लिहित आणि रेखाचित्रही काढत. असे काही अंक काढल्यानंतर खिळे जुळवून मॅटर कंपोज करणार्‍या मशीनवर छापील अंक काढायला सुरुवात केली.

आता ‘ई- आदिम’
पुढे काही अंकानंतर जे अनेक अनियतकालिकांचं होतं तेच आदिमचंही झालं आणि ते बंद पडलं. आता पुन्हा एकदा ‘फेसबुक’ आणि ब्लॉगच्या माध्यमातून ‘आदिम’ सुरू करू म्हणून गझलकार डॉ. राऊत हे अंभोरे यांच्याशी बोलले. त्यांनाही ही कल्पना आवडली. गेल्या सहा वर्षांपासून राऊत हे ‘गझलकार’ या ब्लॉगचा सीमोल्लंघन ई-विशेषांक प्रकाशित करतात. अंभोरे यांच्या भाषेत म्हणजे त्यासाठी लागणारा ‘कुटाणा’ करतात. आता राऊत हा कुटाणा आदिमसाठी करीत आहेत.

असे आहे ‘ई- आदिम’चे स्वरूप
http://eaadim.blogspot.in/ या लिंकवर ई-आदिम उपलब्ध आहे. कथा, कविता, पुस्तक परीक्षण आणि रेखाचित्र, रसग्रहणे, आपण टिपलेली आगळी-वेगळी छायाचित्रे यांचा यामध्ये समावेश आहे. सकस लिहिणार्‍या साहित्यांनी आपले साहित्य याद्वारे प्रकाशित केले जाणार आहे. सुरुवातीला ई आदिम हे द्वैमासिक स्वरुपात असणार. जाने-फेब्रुवारी, मार्च-एप्रिल, मे-जून, जुलै-ऑगस्ट आणि सप्टेंबर-ऑक्टोबर, नोव्हेंबर-डिसेंबर असे त्याचे अंक निघणार आहेत. यामध्येच दिवाळी अंकाचाही समावेश राहणार आहे. आदिमचे फेसबुक पेजसुद्धा आहे.

असे पाठवा आपले साहित्य
आदिमला लिहू इच्छिणार्‍यांनी त्यांचे साहित्य युनिकोड फाँटमध्ये पाठवावे. ज्यांच्याकडे युनिकोड फाँट नाही त्यांनी श्रीलिपी, कृतीदेव, एपीएस प्रकाश, आएसएम-डीव्हीबी यापैकी कुठल्याही एका फाँटमध्ये वर्ड फाइलने साहित्य पाठवता येते. त्यासाठी साहित्यिकांनी ‘aadimambhore@gmail.com’ किंवा आदिमचे फेसबुक पेज किंवा श्रीकृष्ण राऊत यांच्या फेसबुक पेजवरील मेसेजबॉक्समध्येसुद्धा साहित्य पाठवता येऊ शकते, पण फेसबुकवर मॅसेज करताना मजकूर कोणत्या फाँटमध्ये आहे याचा अगोदर इंग्रजीतून उल्लेख करणे आवश्यक आहे.
( दिव्य मराठी- 12 फेब्रु.14-अक्षरा )

-विकास वि. देशमुख, वाशीम
Vikas Deshmukh, Karda, Risod, Washim 

गुरुवार, ९ जानेवारी, २०१४

‘आर्त’ कादंबरीमधून उलगडली बंगालमधील स्त्री शोषणाची समस्या


 

























































बाबाराव मुसळे हे मागील तीन दशकांपासून मराठी रसिकांना परिचित असलेले नाव. मुसळ्यांनी आजवर मराठी साहित्याला ‘हाल्या हाल्या दुधू दे’, ‘पखाल’, ‘वारूळ’, ‘पाटिलकी’, ‘दंश’, ‘स्मशानभोग’ या गाजलेल्या कादंब-या दिल्यात. त्यांच्या साहित्यकृतीला अनेक मानाचे पुरस्कारसुद्धा मिळाले. वेगवेगळ्या विद्यापीठांत त्यांच्या साहित्यकृतींचा अभ्यासक्रमात समावेश आहे.
आता मुंबईच्या मॅजेस्टिक प्रकाशनाकडून मुसळ्यांची ‘आर्त’ ही सातवी कादंबरी यावर्षाच्या शेवटी प्रकाशित होत आहे. या कादंबरीविषयी सांगताना मुसळे म्हणाले, ‘‘कादंबरीचे कथानक हे पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगना या जिल्ह्यातील आहे. या जिल्ह्यातील काकद्वीप परिसरातून दरवर्षी गंगासागर यात्रेच्या काळात पंधरा वर्षांखालील मुली गायब होण्याचे प्रकार घडतात. या मुलींना कोण पळतीत असावं? या मागे आंतरराष्‍ट्रीय स्वरुपाचं एखादं रॅकेट कार्यरत असावं का? या घटना दरवर्षी होतात तरी या काळात या मुलींचे पालक विशेष काळजी घेत नसावेत का? गंगासागर यात्रेच्या वेळी मला भेटलेले एक सज्जन या बाबत म्हणाले, ‘शाब, हमारे इधर घर घर में औरत का शोषण होता है. उनकी सुरक्षा, खानपान, घरगृहस्थी के बारे में घर के शासक ज्यादा ध्यान नहीं देते. औरत काम में रात-दिन में लगी रहती. बेटी-लोगो का भी वही हाल’ घरात पुरुष मंडळीचे दुर्लक्ष म्हणजे मुली   पळविणा-यांसाठी पर्वणीच नाही काय? या कादंबरीतील निम्नस्तरातील भोई जनजातीची नायिका दामाय हिची चित्रांशी नावाची सातव्या वर्गात शिकणारी मुलगी याच काळात हरवते. या घटनेने दामाय हादरते. आपल्या हरवलेल्या चित्रांशीचा शोध घेताना ती आत्यंतिक आर्त, व्याकुळ, व्यथित, दु:खी-कष्टी होते. मात्र, असहाय्य होत नाही, कारण पश्चिम बंगालची प्रत्येक नारी म्हणजे दुर्गा-महाकाली, याचं प्रत्यंतर ती जागोजागी देते.  कुटुंबप्रखानं दुर्लक्ष केल्यावर जाणीवपूर्वक तिनं नवरा, नातेवाईक, गावप्रमुख, पोलिस यांच्याविरुद्ध दिलेला उग्र  लढा म्हणजे ही ‘आर्त’ कादंबरी.’’
या कादंबरी लेखनासाठी मुसळे हे वर्ष 2008 मध्ये स्वत: गंगासागर यात्रेच्या निमित्ताने त्या भागात गेले. तेथे जावून त्यांनी या समस्येचा अभ्यास केला. प्रसंगी बंगाली भाषासुद्धा शिकली. कादंबरीमध्ये काही ठिकाणी बंगाली संवाद आलेले आहेत. ते घेणे अपरिहार्य होते, असेही मुसळे यांनी सांगितले. मुसळ्यांच्या आजवरच्या कादंबरीतील नायक-नायिका या शोषित, पीडित समाजातीलच आहेच. हाच धागा त्यांनी या कादंबरीतसुद्धा कायम ठेवला आहे.
-
विकास वि. देशमुख
करडा, ता. रिसोड, जि. वाशिम
(सौजन्य : दै. दिव्य मराठी Divya marathi)
Vikas Deshmukh, Karda, Risod, Washim
  

रा. मु. पगार : भावोत्कट मुखपृष्ठाचा राजा























































विकास वि. देशमुख
करडा, ता. रिसोड, जि. वाशिम
Vikas  Deshmukh, Karda, Tq. Risod, dist. Washim
(सौजन्य : दै. दिव्य मराठी Divy marathi)

काव्याग्रह : केवळ काव्याचाच आग्रह



































विकास वि. देशमुख
करडा, ता. रिसोड, जि. वाशिम

Vikas V. Deshmukh, Karda, Tq. Risod, Dist Washim

(सौजन्य : दै. दिव्य मराठी Divya Marathi)

डॉ. पंजाबराव देशमुख आणि कारंजालाड (जि. वाशीम)


विकास वि. देशमुख
करडा, ता. रिसोड, जि. वाशिम
(सौजन्य : दै. दिव्य मराठी divya marath)
Vikas V. Deshmukh
Karda, tq, Risod, distt Washim

मोझरी येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय सत्यशोधकी साहित्य संमलेनाचे अध्यक्ष नागेश चौधरी यांची ‘दै. दिव्य मराठी’च्या ‘अक्षरा’ पानासाठी घेतलेली विशेष मुलाखत














विकास वि. देशमुख
करडा, ता. रिसोड, जि. वाशिम
(सौजन्य : दै. दिव्य मराठी divyamarath)
Vikas Desshmukh, At. Karda, tq. Risod, distt. Washim

प्रख्यात मराठी कवी अजीम नवाज राही यांचा संघर्षमय प्रवास :



















(सौजन्य : दै. दिव्य मराठी divya marath)

विकास वि. देशमुख
करडा, ता. रिसोड, जि. वाशिम
Vikas V. Deshmukh, at Karda, tq, risod, dist Washim

शुक्रवार, १७ मे, २०१३

डाव



विकास वि. देशमुख,   
करडा, ता. रिसोड, जि. वाशिम
(Vikas Deshmukh
Karda, tq, Risod, dist. Washim)